Skip to main content

प्रिय सावित्री


प्रिय सावित्री, 

अज्ञान, कर्मकांड, वर्णभेद, जात-पात, बालविवाह, केशवपन,सतीप्रथा या कुप्रथांनी आणि समाजव्यवस्थेत पिचल्या जाणार्‍या बाईला, पुरुषाच्या आधाराशिवायही तिचं काही अस्तित्व आहे, हे तुझ्याकडे बघून वाटलं बघ..स्त्रिया आणि दलित यांच्या सामाजिक स्वातंत्र्यासाठी नवे कार्य तू सुरु केलेस. या सामाजिक परीवर्तनाच्या लढाईत आयुष्याची पन्नासहून अधिक वर्षे खर्च केलीस..अनेक आघात, छळ सहन करून विवाहोत्तर शिक्षण घेतलेस..देशाची पहिली महिला शिक्षिका तू, तू स्त्रियांना फक्त शिक्षण नाही ज्ञान दिलेस..असंख्य स्त्रियांना प्रेरणा देऊन शिक्षणक्षेत्रात आणलेस, तुझ्या वाड्यातली विहीर दलितांना खुली करून दिलीस, बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केलीस, शोषण आणि असमानता या विरोधात अनेक विवेकनिष्ठ चळवळींचा पाया रचलास. सत्यशोधनाचा आग्रह धरलास..आज तुझ्या स्मृतीदिनी  मला सांग, एकोणीसाव्या शतकात, अस्पृश्यता, सतीप्रथा, वर्ण, लिंग,वंश, धर्म यांच्या आधारवर समाजात विषमता पोसणार्‍या समाजव्यवस्थेला छेद देणारी तू..कुठून आली तुझ्यात ही शक्ती?"ढोल, गवार, शुद्र, पशू, नारी, ये सब ताडन के अधिकारी" असे बेलाशक समजणार्‍या या संस्कृतीला तू आव्हान दिले तरी कसे? शोषितांच्या उद्धाराला स्वतःला वाहून घेतलेल्या त्या जोतीरावाची तू ज्योत, केवळ अर्धांगिनी नाही, तर पूर्णपणे त्यांच्या कार्याला साथ देण्याची प्रेरणा तुझ्यात आली कुठून? आज निव्वळ तुझ्यामुळे हे विचार शब्दरुपात मांडण्याचे सामर्थ्य आणि सवलत माझ्यासारख्या भारतीय स्त्रियांमध्ये आहे. आजही गर्भातच स्त्रीला संपवणार्‍या या समाजाशी लढायचे बळ मला दे, आत्मसन्मानाने जगण्याचे भान दे, समाजाचे ॠण फेडायचे मार्ग दे..


कोटी प्रणाम तुला..

तुझी,एक सावित्री


----------------------------------------------------------------------------------------------------------------


प्रिय सावित्री,

कुठल्याशा क्षुल्लक कारणावरून नवर्याने हात उगारला आज माझ्यावर. "हीच मुक्ती अपेक्षित होती का? हाच विकास व्हावा म्हणून आयुष्यभर झटलीस तू? आमच्या उद्धारासाठी परत तूच का येत नाहीस जन्माला??" या सगळ्या विचारांनी अगदी खिन्न झालं माझं मन..पण मग म्हंटलं हे शोषण आपण डिसर्व करत नाही निदान इतका तरी दृष्टीकोन बदलला माझा. शिक्षणाने अनेक पर्यायी मार्ग आज माझ्यासमोर उपलब्ध आहेत. हे ही नसे थोडके..कुणी दुसरे माझ्या मदतीला यावे यापेक्षा मीच स्वतःला मदत करावी हा संदेश नकळत तुझ्या आठवणीतून माझ्यापर्यंत पोहोचला.. 


तुझी,
आणखी एक सावित्री

Comments

Popular posts from this blog

शांतनू मॉइत्रा: बहती हवासा बावरा मन

प्रसिद्ध पार्श्वसंगीतकार, संगीतकार शांतनू मॉइत्राचा जन्म 22 जानेवारी 1968 मध्ये लखनौ इथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण (स्प्रिंगडेल स्कूल) येथे झाले. " इथे गाता गाता माझ्यातल्या संगीताला वाव मिळाला. आत्मविश्वास मिळाला " असे ते सांगतात. त्यांच्याच स्प्रिंगडेल स्कूलचे माजी विद्यार्थी सुश्मित बोस या अर्बन-लोकगीत गायककडून त्यांनी संगीताचे धडे घेतले. इकॉनॉमिक्स मध्ये डिग्री पूर्ण केल्यानंतर ते एका ऍड एजन्सी मध्ये क्लायंट सर्व्हिस एक्सिक्यूटिव्ह म्हणून रुजू झाले, आणि संगीत केवळ छंद बनून राहिला होता.  एकदा अगदी लास्ट मिनिटाला जिंगल बनवायची आहे असे प्रदीप सरकार यांनी शांतनुना सांगितले. त्यांनी ते जिंगल बनवलं. ते होतं " बोले मेरे लिप्स, आय लव्ह अंकल चिप्स ". यानंतर त्यांनी अनेक कंपनींसाठी जिंगल्स बनवले. नंतर त्यांनी त्यावेळी प्रसिद्ध अशा इंडी-पॉप अल्बम्स साठी संगीत दिले. शुभा मूदगल यांनी गायलेली " अब के सावन ऐसे बरसे " आणि '' सपना देखा है मैने "  ही त्यातली काही गाजलेली गीते. 2002 मध्ये मुंबईला शिफ्ट झाल्यानंतर त्यांना सुधीर मिश्रांच्या ...

दशक्रिया

मेलेल्या व्यक्तीचे दहन झाल्यानंतर, पुढील काही दिवस 'दशक्रिया विधी' केले जातात. असे समजतात की याने आत्म्याला शांती मिळते, जन्म-मरणाच्या चक्रातून सुटका होते आणि मोक्ष प्राप्त होतो. तिसऱ्या दिवशी राख नदीत सोडण्यापासून ते तेराव्यापर्यंत या विधी चालतात. पवित्र गंगेच्या तीरावर या विधी करतात. महाराष्ट्रातल्या पैठणला दक्षिण काशी मानतात त्यामुळे इथली गोदावरीही गंगेसारखीच पवित्र (आणि प्रदूषित) आहे. हिच्या घाटावरही हे क्रियाकर्म चालते. ब्राह्मणातील किरवंत या पोटजातीचे लोक हे विधी करतात. आणि तेच त्यांचे उपजीविकेचे साधन असते. यांना ब्राह्मणातील इतर पोटजातीहून कमी लेखले जाते. त्यांना शुभ सभारंभाला न बोलावणे, मंदिरात गंध-पूजेचा मान न देणे अशा प्रकारे अवहेलना करून केवळ मर्तिकालाच त्यांचे स्मरण होते. पण यांच्यातील काही लोकही 'दशक्रिया विधींचं' व्यावसायिकरण करून, मृत व्यक्तीच्या आधीच दुःखी-कष्टी नातेवाईकांना अमूक अमूक विधी न केल्यास आत्म्यास शांती मिळणार नाही अशी भीती घालून समाजातील इतर लोकांचे शोषण करतात. काहीजण निर्ढावून अक्षरशः आपले दुकान मांडून लोकांना गिऱ्हाईक बनवून, इतकेच नव्हे त...

"न्यूड : नग्नतेतील मुक्त कलाविष्कार"

आत्ता 'न्यूड' पाहिला. एखाद्या कथेचं चित्रात रूपांतर व्हावं आणि प्रत्येक ब्रशस्ट्रोक सोबत तयार व्हावी एक एक अप्रतिम फ्रेम आणि त्यांची एक बनावी चित्रमालिका या साऱ्यांनी बनला आहे 'न्यूड'. गावातून मुंबईला आलेली यमुना 'न्यूड मॉडेल' बनते. का? कशी? त्याचे होणारे परिणाम, पात्रांची आणि शेवटी आपलीही बदलत जाणारी विचारसरणी याची गोष्ट आहे न्यूड मध्ये.  चित्रपटाची कथा नग्नतेवर बेतली असली तरी कुठेही भडक होत नाही. अश्लीलतेचा लवलेश नाही. मॉडेल म्हणून तयार होताना आधी यमुनेची होणारी तडफड, तगमग, अगतिकता आपल्याला अस्वस्थ करून सोडते.  चित्रपटात एक मोठा कलाकार (एम.एफ.हुसेन वर बेतलेला)  मलिक (नसिरुद्दीन शाह) नायिकेचं न्यूड काढता काढता तिच्याशी आणि आपल्याशीही गप्पा मारतो. "मी घोड्यांची चित्रं काढली तर कुणाला हरकत नाही, पारव्यांची चित्र काढली कुणी बोलत नाही, मग मी माणसांची चित्रं काढली तर इतका हंगामा कशासाठी?", कलाकार 'रुह' पाहत असतो. तीच चितारत असतो.  चित्रपटाची कथा नग्नतेवर भाष्य करत असली तरी कुठेही भडकपणा नाही. काही प्रसंग अंगावर येतात पण ते त्य...