Skip to main content

अस्तु: So be it !



अस्तु पहिला!! आणि खूप काही देऊन गेला मला हा चित्रपट...

अस्तु कथा आहे प्राध्यापक शास्रींची. संस्कृतचा गाढा अभ्यास असलेला, अनेक संस्कृत वचने, सुभाषिते ज्यांना मुखोद्गत आहेत, ज्याला ताओचे तत्वज्ञान ज्ञात आहे असा , एकेकाळी शब्दप्रभु म्हणून नावाजला जाणारा मोठा पंडित, 'मी कोण' याचेही उत्तर विसरतो.


अस्तु कथा आहे अल्झायमर्स या व्याधीनं व उतारवयानं ग्रासलेल्या त्या प्राध्यापक शास्त्रींची उर्फ आप्पांची...ज्याच्या स्मृती फिक्या फिक्या होऊन आता स्मृतिपटल म्हणजे निव्वळ कोरा कॅनव्हास उरला आहे..ही कथा आहे त्यांच्या कुटुंबियांची, प्रियजनांची जे या रुग्ण वृद्ध बापाला सांभाळण्याच्या वेगळ्याच विचाराच्या गर्तेत आहेत.. त्यांना एखाद्या रुग्णालयात किंवा संस्थेत ठेवावं का, या डायलेमा मध्ये अडकले आहेत.. त्यांच्यातला कितीसा अंश त्यांचा स्वतःचा उरलेला आहे आणि किती एखाद्या पूर्णपणे अनोळख्या व्यक्तीचा आहे या संभ्रमात आहेत.


अप्पा एक दिवस रस्त्यात गर्दीत हरवतात, एका हत्तीला पाहून उत्सुकतेने त्याच्या मागोमाग फिरायला लागतात. हत्ती, जो आपल्या स्मरणशक्तीसाठी प्रसिद्ध आहे त्याच्या पाठीमागे हा ओळख हरवलेला माणूस भटकत राहतो यात बरेच काही उमजते.


कथेचा गाभा अल्झायमर्स हा आजार असला तरी तो अनेक आठवणींच्या पायावर उभा आहे. अनेक आठवणींच्या स्मृतीतून उलगडत जाणारा भूतकाळ, आणि त्यात उलगडत जाणारे शास्त्री ..नात्यांची बंधने, दडपणे त्यात जीवाची होणारी घुसमट, शंका, पूर्वग्रह याने पिचलेली मनस्थिती अशा सर्वसाधारण कुटुंबासारख्याच समस्या..


या हत्तीमागे जात जात हत्तीचा माहूत(नचिकेत पूर्णपात्रे), त्याला घरी आणतो..त्याची बायको चन्नम्मा(अमृता सुभाष) त्यांच्यात देवही पाहते आणि लेकरूही..आणि गरीब असून आपल्या घासातला घास देते, प्रेमाचा वर्षाव करते. लहानपणीच आई-बापाचे छत्र हरवलेल्या शास्त्रींना आपल्या मुलींच्या वयाच्या चन्नम्मात 'आई' दिसते..


आता या सर्वांत 'आप्पांचा शोध' अशी ही कथा. डॉ. मोहन आगाशे स्वतः मानासोपचार तज्ज्ञ असल्याने त्यांनी आपल्या भूमिकेला खूप बारीक अभ्यासपूर्वक न्याय दिला आहे. मोठी मुलगी इरा (इरावती हर्षे) साकारताना वडिलांची काळजी घेताना होणारी ओढाताण, फरपट, बहिणीबद्दल सूक्ष्म असूया, गैरसमजाने वडिलांबद्दल अढी, आपल्यामुळे ते हरवले याचा भयानक गिल्ट तिने सुंदर साकारला आहे. तिच्या संयमी नवऱ्याच्या भूमिकेत मिलिंद सोमण, रॅशनल बहीण देविका दफ़्तरदार, अप्पांचा केअरटेकर(ओम भूतकर) व कलीग (इला भाटे) यांनीही छोट्या छोट्या भूमिकेतून खूप काही साकारले आहे..


अत्यंत सुंदर दिग्दर्शन, पटकथा, संवाद, अभिनय यासोबतच 2 राष्ट्रीय पुरस्कर असूनही अस्तुला कोल्हापुरात एकाच थिएटरात, केवळ एकच खेळ मिळतो?? वाईट आहे हे...पण मग हा चित्रपटच सांगतो!! अस्तु! So be it....


- रमा

Comments

Popular posts from this blog

शांतनू मॉइत्रा: बहती हवासा बावरा मन

प्रसिद्ध पार्श्वसंगीतकार, संगीतकार शांतनू मॉइत्राचा जन्म 22 जानेवारी 1968 मध्ये लखनौ इथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण (स्प्रिंगडेल स्कूल) येथे झाले. " इथे गाता गाता माझ्यातल्या संगीताला वाव मिळाला. आत्मविश्वास मिळाला " असे ते सांगतात. त्यांच्याच स्प्रिंगडेल स्कूलचे माजी विद्यार्थी सुश्मित बोस या अर्बन-लोकगीत गायककडून त्यांनी संगीताचे धडे घेतले. इकॉनॉमिक्स मध्ये डिग्री पूर्ण केल्यानंतर ते एका ऍड एजन्सी मध्ये क्लायंट सर्व्हिस एक्सिक्यूटिव्ह म्हणून रुजू झाले, आणि संगीत केवळ छंद बनून राहिला होता.  एकदा अगदी लास्ट मिनिटाला जिंगल बनवायची आहे असे प्रदीप सरकार यांनी शांतनुना सांगितले. त्यांनी ते जिंगल बनवलं. ते होतं " बोले मेरे लिप्स, आय लव्ह अंकल चिप्स ". यानंतर त्यांनी अनेक कंपनींसाठी जिंगल्स बनवले. नंतर त्यांनी त्यावेळी प्रसिद्ध अशा इंडी-पॉप अल्बम्स साठी संगीत दिले. शुभा मूदगल यांनी गायलेली " अब के सावन ऐसे बरसे " आणि '' सपना देखा है मैने "  ही त्यातली काही गाजलेली गीते. 2002 मध्ये मुंबईला शिफ्ट झाल्यानंतर त्यांना सुधीर मिश्रांच्या ...

दशक्रिया

मेलेल्या व्यक्तीचे दहन झाल्यानंतर, पुढील काही दिवस 'दशक्रिया विधी' केले जातात. असे समजतात की याने आत्म्याला शांती मिळते, जन्म-मरणाच्या चक्रातून सुटका होते आणि मोक्ष प्राप्त होतो. तिसऱ्या दिवशी राख नदीत सोडण्यापासून ते तेराव्यापर्यंत या विधी चालतात. पवित्र गंगेच्या तीरावर या विधी करतात. महाराष्ट्रातल्या पैठणला दक्षिण काशी मानतात त्यामुळे इथली गोदावरीही गंगेसारखीच पवित्र (आणि प्रदूषित) आहे. हिच्या घाटावरही हे क्रियाकर्म चालते. ब्राह्मणातील किरवंत या पोटजातीचे लोक हे विधी करतात. आणि तेच त्यांचे उपजीविकेचे साधन असते. यांना ब्राह्मणातील इतर पोटजातीहून कमी लेखले जाते. त्यांना शुभ सभारंभाला न बोलावणे, मंदिरात गंध-पूजेचा मान न देणे अशा प्रकारे अवहेलना करून केवळ मर्तिकालाच त्यांचे स्मरण होते. पण यांच्यातील काही लोकही 'दशक्रिया विधींचं' व्यावसायिकरण करून, मृत व्यक्तीच्या आधीच दुःखी-कष्टी नातेवाईकांना अमूक अमूक विधी न केल्यास आत्म्यास शांती मिळणार नाही अशी भीती घालून समाजातील इतर लोकांचे शोषण करतात. काहीजण निर्ढावून अक्षरशः आपले दुकान मांडून लोकांना गिऱ्हाईक बनवून, इतकेच नव्हे त...

"न्यूड : नग्नतेतील मुक्त कलाविष्कार"

आत्ता 'न्यूड' पाहिला. एखाद्या कथेचं चित्रात रूपांतर व्हावं आणि प्रत्येक ब्रशस्ट्रोक सोबत तयार व्हावी एक एक अप्रतिम फ्रेम आणि त्यांची एक बनावी चित्रमालिका या साऱ्यांनी बनला आहे 'न्यूड'. गावातून मुंबईला आलेली यमुना 'न्यूड मॉडेल' बनते. का? कशी? त्याचे होणारे परिणाम, पात्रांची आणि शेवटी आपलीही बदलत जाणारी विचारसरणी याची गोष्ट आहे न्यूड मध्ये.  चित्रपटाची कथा नग्नतेवर बेतली असली तरी कुठेही भडक होत नाही. अश्लीलतेचा लवलेश नाही. मॉडेल म्हणून तयार होताना आधी यमुनेची होणारी तडफड, तगमग, अगतिकता आपल्याला अस्वस्थ करून सोडते.  चित्रपटात एक मोठा कलाकार (एम.एफ.हुसेन वर बेतलेला)  मलिक (नसिरुद्दीन शाह) नायिकेचं न्यूड काढता काढता तिच्याशी आणि आपल्याशीही गप्पा मारतो. "मी घोड्यांची चित्रं काढली तर कुणाला हरकत नाही, पारव्यांची चित्र काढली कुणी बोलत नाही, मग मी माणसांची चित्रं काढली तर इतका हंगामा कशासाठी?", कलाकार 'रुह' पाहत असतो. तीच चितारत असतो.  चित्रपटाची कथा नग्नतेवर भाष्य करत असली तरी कुठेही भडकपणा नाही. काही प्रसंग अंगावर येतात पण ते त्य...