Skip to main content

स्मृतिगंध लिसनर्स क्लब- 'अनोखे बोल'




'स्मृतिगंध लिसनर्स क्लब' म्हंटल्यावर दर्दी संगीत प्रेमींसाठी पर्वणीच असते. या महिन्याच्या कार्यक्रमाची थीम ही अगदी अनोखी होती. 'अनोखे बोल'!! काही गाण्यातले काही शब्द खूप वेगळेच असतात, बऱ्याचदा त्यांचे अर्थ, प्रयोजनही आपल्याला ठाऊक नसते, तर कधी कधी त्यांना अर्थ असतंच नाही. पण तरीही ते गाण्याला मजा आणत  असतात. तर असे 'अनोखे बोल' असणारे रेकॉर्डस यावेळी वाजवण्यात आल्या. या आयोजकांचा संग्रह आणि अभ्यास आपल्याला पुन्हा-पुन्हा थक्क करून सोडतो. कुठून कुठून या रेकॉर्डस् मिळवल्या आणि त्याचा इतका डिटेल अभ्यास या मंडळींनी केला आहे, आश्चर्यचकित करून सोडतो. 

यावेळचे पहिले गाणे होते राज कपूर च्या श्री ४२० मधले, 'रमैय्या वस्तावैय्या'. या गाण्याची कथा अशी की गीतकार शैलेंद्र एकदा एका अर्धवट बांधलेल्या इमारतीजवळून जात असताना तिथले आंध्र कामगार 'रमैया वस्तावैय्या' या बोलांचे तेलगू लोकगीत गात होते. शैलेंद्र च्या मनात हे शब्द पक्के बसले आणि ते त्यांनी आपल्या गाण्यात बसवायचे ठरवले. या किश्श्यासोबतच अजून एक योगायोग म्हणता येईल असा किस्सा की संगीतकार शंकर, यांनी बऱ्याच चाली आगाऊ च बांधलेल्या होत्या, कारण आर.के सोबत काम करताना एका थीम सॉंग च्या किमान ५ चाली ऐकवाव्या लागत आणि  त्यातली एखादी निवडली जाई. शंकर यांनी  ते हैदराबाद मध्ये काम करताना  या गाण्याची चाल आधीच बनवून ठेवली होती. तीची प्रेरणाही आंध्र लोकगीतच होतं. शंकर, शैलेंद्र, राज कपूर तिघांनाही माहित नव्हते, की  पुढे जाऊन हे गाणं एकत्र बांधलं जाणार आहे. या अनोख्या बोलांचा अर्थ आहे "Ramaiyya, will you come back ?"

दुसरे गाणे होते 'भाई-भाई' चित्रपटातले. यात अशोककुमार, किशोरकुमार या वास्तवातल्या भावांच्या जोडीने काम केले आहे. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे मदनमोहन यांनी एकाच चित्रपटात एकाच रागात २-२ गाणी बांधली आहेत. यातले अनोखे बोल असलेले गीत जे सादर झाले ते होते. 'मेरा नाम अब्दूल रेहमान', किशोरकुमार आणि निम्मी या जोडीवर चित्रित झालेले हे गीत गायले आहे किशोरकुमार आणि लता मंगेशकर यांनी. मी घरी येताच या गाण्याचा व्हिडीओ पाहिला आणि किशोरकुमार ने या अनोख्या बोलांवर त्याच्या नेहमीच्या अंदाजाने त्याला साजेसा एफर्टलेस दंगाही  पाहिला. म्हणजे ही उछलकूद करण्यासाठीच जणू हे गाणे रचले होते. 

यानंतरचे गाणे एक प्रसिद्ध 'Circumstantial Tragedy' , 'जादू' या चित्रपटातले. अनोखे बोल 'लारा लू, लारा लू', नलिनी जयवंत वर चित्रित हे गाणं, यातला तिचा डान्स अतिशय सुंदर आहे, नौशादने संगीतबद्ध केलेलं हे गाणं काहीसं स्पॅनिश म्युजिक ची आठवण करून देतं. यात त्यांनी चायनीज ब्लॉक्स या वाद्याचा इतका छान वापर केला आहे, आणि आयोजकांनी सांगितल्याप्रमाणे गाण्याच्या शेवटाला चायनीज ब्लॉक्स असे वाजलेत की बस्स!! निव्वळ कम्माल!!

फूटपाथ सिनेमातील 'आरारारारम.. सुहाना है ये मौसम, सलोना मोरा बालम ' हे आशा भोसले च्या आवाजातले, खैय्याम ने संगीतबद्ध केलेले, मजरुह सुलतानपुरी लिखित गाणं, त्यातल्या तरल अकॉर्डीअन च्या वापरामुळे चांगलेच लक्षात राहिलं. यानंतर 'लाजवाब' पिक्चर मधले 'डिंगु, नाचे रे गोरी डिंगु' हे लता मंगेशकर, बिनापनी मुखर्जी यांच्या अवजातलं हे गीत. अनिल बिश्वास यांचाही यात बॅकग्राऊंडला आवाज आहे. अनिल बिश्वास यांनी लता मंगेशकर याना Voice modulation व श्वासोच्छ्वासाचं तंत्र शिकवलं, हे लता मंगेशकर आवर्जून सांगतात. जलद लयीच्या या गाण्यातही लताबाई कधी श्वास घेतात आज्जीबात कळून येत नाही..

 नंतर नागीन सिनेमातील 'ओ, जिंदगी देनेवाले' हे गाणे ऐकवले, हेमंतकुमार गायक आणि संगीतकार दोन्ही रूपात आपल्याला चकित करतात. यातले अनोखे बोल, इतके अनोखे आहेत की ते लिहिता येणंही अवघड आहे. लोकगीतातले इतके अस्सल शब्द आहेत ते, त्या गाण्याला वेगळीच उभारी देतात. यातला कोरस जो आहे, तो बॅकड्रॉपला शेवटपर्यंत तसाच राहतो, ही अजून एक खासियत. सूर अविनाशी, निर्गुण आहे, पण जसे अमर्त्य, निराकार आत्म्याला कार्य करण्यासाठी मर्त्य शरीराची गरज असते, तसेच स्वर हा 'स्वयं राजयति स: स्वर:' असा असूनही त्याला शारीर व्यंजनाची कशी गरज असते ते या गाण्याच्या दाखल्याने समजावून दिले. एक वेगळीच 'झिंग' या नागिन मधील गीताने दिली. 

यानंतर 'सजा' या फिल्म मधल्या 'गुचूप, गुपचूप प्यार करे' हे गाणे, निम्मी' आणि देव आनंद यांच्यावर चित्रित, संध्या मुखर्जी आणि हेमंतकुमार यांच्या आवाजातले गाणे. यातल्या कोरस चेही बोल 'आदिवासी भाषेतले' अनोखे असे काहीसे होते. संध्या मुखर्जी चा आवाज 'Voice of Suchitra Sen' म्हणून का लोकप्रिय झाला असावा याची प्रचिती येते. पण खरंच त्यापेक्षाही खूप मोठ्या रेंज चा असा हा आवाज आहे. खूपच सुंदर.आणि हेमंतकुमारांविषयी वेगळे काय सांगावे? गाण्याला संगीत आहे एस.डी. बर्मन यांचे. 

गीतकार, संगीतकार, कथा, पटकथाकार असे बहुआयामी प्रतिभावान सलील चौधरी यांनी संगीतबद्ध केलेले, बिमल रॉय यांच्या क्लासिक  'दो बिघा जमीन' मधले 'हरियाल सावन ढोल बजाता' हे मन्नाडे यांच्या आवाजातले गाणे ऐकवले . 'तगतग तगतग तगीनतागीन रे' असे अनोखे बोल या गाण्यात आहेत. आसामी, बिहू, बंगाली लोकसंगीताला पाश्चात्य सिम्फनीची जोड द्यायची कल्पना सलीलदांनाच सुचू शकली. 

दास्तान चित्रपटातले 'तरारी अरारी अरारी' या अनोख्या बोलातले गाणे  मोहम्मद रफी आणि सुरेय्याच्या सुरेल आवाजातले. नौशादने हिंदी चित्रपट संगीतात पाश्चात्य वाद्यांचा अनोखा मेळ साधलेला आहे तो या गाण्यात सुरेख आढळतो.  

पुढचे गाणे होते 'एक थी लाडकी' मधले 'लारा लप्पा, लारा लप्पा लाई रखदा', पंजाबी ढंगातले हे एक उडत्या चालीचे मोहम्मद रफी, लता यांच्या आवाजत अतिशय प्रसिद्ध  असे हे गाणे. मीना शौरी वर चित्रित. 

यापुढे आले 'काली घटा' चित्रपटातले 'ई ला बेली ला आरे, दिन है प्यारे प्यारे' हे गाणे. शैलेंद्र आणि हसरत जयपुरी यांनी लिहिलेले हे गाणं, शंकर जयकिशन यांनी संगीत दिलेलं.

 तर कार्यक्रमाची सांगता झाली 'बाबूल' सिनेमातील 'नदी किनारे, साथ हमारे' हे गाणं, नौशाद यांचं संगीत, कोळीगीतात हे गाणं गुंफलं आहे. शमशाद बेगम, तलत आणि रफी यांच्या आवाजातलं असं हे गाणं आहे. 'झिंगोडा, झिंगोडा, झिंग हो, नदियामें उठा है सोर' असे अनोखे बोल असलेले हे गीत. 
याच गाण्यात पुढे ओळी  आहेत त्याप्रमाणेच, 


"धरती पर आकाश है जबतक,
दिल का नगर आबाद रहेगा 
ढलता सूरज, धूप सुनहरी 
आजका मौसम याद रहेगा"

अगदी तस्साच हा स्मृतिगंध लिसनर्स क्लब चा 'अनोखे बोल' थीम वाला कार्यक्रम नक्कीच रसिकांना 'याद रहेगा'

२६ फेब्रुवारी २०१७
स्मृतिगंध लिसनर्स क्लब- Episode 2

Comments

Popular posts from this blog

शांतनू मॉइत्रा: बहती हवासा बावरा मन

प्रसिद्ध पार्श्वसंगीतकार, संगीतकार शांतनू मॉइत्राचा जन्म 22 जानेवारी 1968 मध्ये लखनौ इथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण (स्प्रिंगडेल स्कूल) येथे झाले. " इथे गाता गाता माझ्यातल्या संगीताला वाव मिळाला. आत्मविश्वास मिळाला " असे ते सांगतात. त्यांच्याच स्प्रिंगडेल स्कूलचे माजी विद्यार्थी सुश्मित बोस या अर्बन-लोकगीत गायककडून त्यांनी संगीताचे धडे घेतले. इकॉनॉमिक्स मध्ये डिग्री पूर्ण केल्यानंतर ते एका ऍड एजन्सी मध्ये क्लायंट सर्व्हिस एक्सिक्यूटिव्ह म्हणून रुजू झाले, आणि संगीत केवळ छंद बनून राहिला होता.  एकदा अगदी लास्ट मिनिटाला जिंगल बनवायची आहे असे प्रदीप सरकार यांनी शांतनुना सांगितले. त्यांनी ते जिंगल बनवलं. ते होतं " बोले मेरे लिप्स, आय लव्ह अंकल चिप्स ". यानंतर त्यांनी अनेक कंपनींसाठी जिंगल्स बनवले. नंतर त्यांनी त्यावेळी प्रसिद्ध अशा इंडी-पॉप अल्बम्स साठी संगीत दिले. शुभा मूदगल यांनी गायलेली " अब के सावन ऐसे बरसे " आणि '' सपना देखा है मैने "  ही त्यातली काही गाजलेली गीते. 2002 मध्ये मुंबईला शिफ्ट झाल्यानंतर त्यांना सुधीर मिश्रांच्या ...

दशक्रिया

मेलेल्या व्यक्तीचे दहन झाल्यानंतर, पुढील काही दिवस 'दशक्रिया विधी' केले जातात. असे समजतात की याने आत्म्याला शांती मिळते, जन्म-मरणाच्या चक्रातून सुटका होते आणि मोक्ष प्राप्त होतो. तिसऱ्या दिवशी राख नदीत सोडण्यापासून ते तेराव्यापर्यंत या विधी चालतात. पवित्र गंगेच्या तीरावर या विधी करतात. महाराष्ट्रातल्या पैठणला दक्षिण काशी मानतात त्यामुळे इथली गोदावरीही गंगेसारखीच पवित्र (आणि प्रदूषित) आहे. हिच्या घाटावरही हे क्रियाकर्म चालते. ब्राह्मणातील किरवंत या पोटजातीचे लोक हे विधी करतात. आणि तेच त्यांचे उपजीविकेचे साधन असते. यांना ब्राह्मणातील इतर पोटजातीहून कमी लेखले जाते. त्यांना शुभ सभारंभाला न बोलावणे, मंदिरात गंध-पूजेचा मान न देणे अशा प्रकारे अवहेलना करून केवळ मर्तिकालाच त्यांचे स्मरण होते. पण यांच्यातील काही लोकही 'दशक्रिया विधींचं' व्यावसायिकरण करून, मृत व्यक्तीच्या आधीच दुःखी-कष्टी नातेवाईकांना अमूक अमूक विधी न केल्यास आत्म्यास शांती मिळणार नाही अशी भीती घालून समाजातील इतर लोकांचे शोषण करतात. काहीजण निर्ढावून अक्षरशः आपले दुकान मांडून लोकांना गिऱ्हाईक बनवून, इतकेच नव्हे त...

"न्यूड : नग्नतेतील मुक्त कलाविष्कार"

आत्ता 'न्यूड' पाहिला. एखाद्या कथेचं चित्रात रूपांतर व्हावं आणि प्रत्येक ब्रशस्ट्रोक सोबत तयार व्हावी एक एक अप्रतिम फ्रेम आणि त्यांची एक बनावी चित्रमालिका या साऱ्यांनी बनला आहे 'न्यूड'. गावातून मुंबईला आलेली यमुना 'न्यूड मॉडेल' बनते. का? कशी? त्याचे होणारे परिणाम, पात्रांची आणि शेवटी आपलीही बदलत जाणारी विचारसरणी याची गोष्ट आहे न्यूड मध्ये.  चित्रपटाची कथा नग्नतेवर बेतली असली तरी कुठेही भडक होत नाही. अश्लीलतेचा लवलेश नाही. मॉडेल म्हणून तयार होताना आधी यमुनेची होणारी तडफड, तगमग, अगतिकता आपल्याला अस्वस्थ करून सोडते.  चित्रपटात एक मोठा कलाकार (एम.एफ.हुसेन वर बेतलेला)  मलिक (नसिरुद्दीन शाह) नायिकेचं न्यूड काढता काढता तिच्याशी आणि आपल्याशीही गप्पा मारतो. "मी घोड्यांची चित्रं काढली तर कुणाला हरकत नाही, पारव्यांची चित्र काढली कुणी बोलत नाही, मग मी माणसांची चित्रं काढली तर इतका हंगामा कशासाठी?", कलाकार 'रुह' पाहत असतो. तीच चितारत असतो.  चित्रपटाची कथा नग्नतेवर भाष्य करत असली तरी कुठेही भडकपणा नाही. काही प्रसंग अंगावर येतात पण ते त्य...