Skip to main content

स्मृतिगंध लिसनर्स क्लब - वर्धापन दिन (२०१७)



कोल्हापुरातील संगीत रसिकांसाठी गाणी आणि आठवणी यांचा खजिना उलगडणाऱ्या 'स्मृतिगंध लिसनर्स क्लबचा' १७ वा वर्धापन दिन काल झाला. प्रा.श्रीकृष्ण कालगावकर, श्री.धनंजय कुरणे आणि श्री.प्रभाकर तांबट या कोल्हापुरातील अभ्यासू संगीतप्रेमींनी, रसिकांसाठी चालू केलेला हा क्लब. जुन्या व सुरस गाण्यांच्या ध्वनिमुद्रिका ऐकण्याआधी गाण्यातील सौंदर्यस्थळे समजावून घेऊन नंतर ते गाणे ऐकवतात. त्यामुळे या गाण्यांचा आस्वाद अधिक चांगल्या पद्धतीने घेता येतो या कार्यक्रमात. संगीतावरील निस्सीम प्रेम आणि अभ्यास हाच या कार्यक्रमाचा केंद्रबिंदू आहे.

कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक वाद्य सनई वादनाने झाली. प्रसिद्ध सनईवादक शंकरराव गायकवाड यांनी वाजवलेले मानापमान नाटकातील 'चंद्रिका ही जणू' हे पद ऐकवले. कर्नाटक संगीत शैलीचा त्यावर प्रभाव त्यांनी स्पष्ट केला. 

यानंतरचे गीत होते चित्रपट 'शारदा' मधील हंसध्वनी या रागातील गीत 'ओ चाँद जहाँ वो जाए' हे गीत. लता मंगेशकर आणि आशा भोसले यांनी हे ऐकलेलं हे गीत मीनाकुमारी आणि श्यामा यांच्यावर चित्रित झालेलं. लता व आशा त्या काळात एकमेकांशी बोलत नव्हत्या हे त्यांनी सांगितलं. अभिनेत्री श्यामा यांचं नुकतंच निधन झालं, त्यांच्या स्मृतीला हे गाणं अर्पण केलं. या गाण्यात बासरी, सतार, ढोलकी या वाद्यांचा अप्रतिम वापर झाला आहे. 

पुढील गाणे 'आवारा' मधील 'एक बेवफासे प्यार किया'. हनी ओब्रायन यांच्यावर चित्रित झालेलं, हसरत जयपुरी यांच्या शब्दातले. दत्ताराम वाडकर यांनी हिंदीत पहिली ढोलकी वाजवलेली आणि या चित्रपटातील प्रसिद्ध ड्रीम सिक्वेन्स याबद्दल माहिती सांगितली. 

पुढचे गाणे आणि त्याची माहिती दोन्हीही इतकी सुरेख होती. 'दिल दिया, दर्द लिया' मधील 'सावन आए, या ना आए' हे गीत. नौशाद यांची संगीत देताना राग निवडण्याची सूक्ष्म दृष्टी दाखवली आहे. पात्र आणि प्रसंग या साऱ्याचा अभ्यास करून त्यांनी काफी थाटातला वृंदावनी सारंग या गाण्यासाठी वापरला आहे. नौशादांचे हे वैशिष्टय त्यांनी अधोरेखित केलं. 

'सीमा' चित्रपटातले शंकर जयकिशन यांनी संगीत दिलेले, शुभा खोटे यांच्यावर चित्रित 'बात बातपर रुठो ना' हे गाणे. शुभा खोटे रुसलेल्या नूतनची समजूत काढून जेवण्यासाठी मनवतात असे हे खेळकर गाणे. सांगितल्याप्रमाणे यातले अकोर्डीअनचे पीसेसकडे लक्ष देऊन ऐकले.. खूप गोड. 

'काली टोपी लाल रुमाल' या चित्रपटातील 'दगा दगा वै वै वै'  हे नृत्यगीत संगीतकार चित्रगुप्त श्रीवास्तव यांच्या जन्मशताब्दीनिमित्त वाजवण्यात आले. तर नुकतेच निधन झालेल्या जुन्या काळातील अभिनेत्री शकीला यांच्या कारकिर्दीचा आढावा घेत त्यांचे 'हूँ अभी मै जवाँ' हे गाणे त्यांच्या स्मृतीला अर्पण करण्यात आलं. 

यानंतर होती एक ट्रीट जी खास वर्धापन दिनानिमित्त होती. जुन्या अनालॉग ग्रामोफोनवर ध्वनिमुद्रिकांचं मेकॅनीजम कसे असते हे समजावून सांगितले. आणि रफीच्या आवाजातले 'कोहिनूर' चित्रपटातील 'ढल  चुकी शामे गम' ऐकवले. हा एक अत्यंत मोहक अनुभव होता. म्हणजे असा आवाज नवीन कुठल्याच यंत्राद्वारे निर्माण होऊ शकत नाही हे खरे. 

या नंतरचे गाणे रेकॉर्ड मध्ये गाणे ऐकण्याचा अनुभव शब्दातीत होता. मलाव्य म्हणजेच महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पुलं यांच्या आवाजातले 'वाहिनी' नाटकातले 'ललना कुसुम कोमला' हे गीत. हा मनुष्य लेखक, गीतकार, संगीतकार, वादक, अभिनेता यासाऱ्याबरोबरच उत्तम गायक होता, याचे हे गाणे म्हणजे सर्वोत्कृष्ट उदाहरण असेल. This song just made my day. 

'दहेज' चित्रपटातील गाणे 'अंबुवाकी डालीपे बोले रे कोयलिया' हे गाणे अभिनेत्री जयश्री वर चित्रित झालेले व त्यांनीच गायलेले. यातील बासरीचा गोड वापर दाखवतच, जयश्री यांचा वेगळ्या धाटणीचा आवाज गाण्याला कसा शोभून दिसतो हे सांगितले. 

त्यानंतर  बड़े ग़ुलाम अली ख़ाँविषयी थोड्या गप्पा आणि मग कार्यक्रमाचा शेवट हा अत्यंत सुंदर, आर्त गाणे बड़े ग़ुलाम अली ख़ाँचे 'का करू सजनी.. आए ना बालम' ने झाला. ग्रामोफोनवरच्या तबकडीवर वाजली जाणारी मोजकी गीते, अतिशय अभ्यासपूर्ण आणि रंजक निवेदन यांनी हा वर्धापन दिन सजला होता. येणाऱ्या कार्यक्रमातही असेच मनोरंजन 'स्मृतिगंध लिसनर्स क्लब' करत राहील यात काहीच शंका नाही. 

Comments

Popular posts from this blog

शांतनू मॉइत्रा: बहती हवासा बावरा मन

प्रसिद्ध पार्श्वसंगीतकार, संगीतकार शांतनू मॉइत्राचा जन्म 22 जानेवारी 1968 मध्ये लखनौ इथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण (स्प्रिंगडेल स्कूल) येथे झाले. " इथे गाता गाता माझ्यातल्या संगीताला वाव मिळाला. आत्मविश्वास मिळाला " असे ते सांगतात. त्यांच्याच स्प्रिंगडेल स्कूलचे माजी विद्यार्थी सुश्मित बोस या अर्बन-लोकगीत गायककडून त्यांनी संगीताचे धडे घेतले. इकॉनॉमिक्स मध्ये डिग्री पूर्ण केल्यानंतर ते एका ऍड एजन्सी मध्ये क्लायंट सर्व्हिस एक्सिक्यूटिव्ह म्हणून रुजू झाले, आणि संगीत केवळ छंद बनून राहिला होता.  एकदा अगदी लास्ट मिनिटाला जिंगल बनवायची आहे असे प्रदीप सरकार यांनी शांतनुना सांगितले. त्यांनी ते जिंगल बनवलं. ते होतं " बोले मेरे लिप्स, आय लव्ह अंकल चिप्स ". यानंतर त्यांनी अनेक कंपनींसाठी जिंगल्स बनवले. नंतर त्यांनी त्यावेळी प्रसिद्ध अशा इंडी-पॉप अल्बम्स साठी संगीत दिले. शुभा मूदगल यांनी गायलेली " अब के सावन ऐसे बरसे " आणि '' सपना देखा है मैने "  ही त्यातली काही गाजलेली गीते. 2002 मध्ये मुंबईला शिफ्ट झाल्यानंतर त्यांना सुधीर मिश्रांच्या ...

दशक्रिया

मेलेल्या व्यक्तीचे दहन झाल्यानंतर, पुढील काही दिवस 'दशक्रिया विधी' केले जातात. असे समजतात की याने आत्म्याला शांती मिळते, जन्म-मरणाच्या चक्रातून सुटका होते आणि मोक्ष प्राप्त होतो. तिसऱ्या दिवशी राख नदीत सोडण्यापासून ते तेराव्यापर्यंत या विधी चालतात. पवित्र गंगेच्या तीरावर या विधी करतात. महाराष्ट्रातल्या पैठणला दक्षिण काशी मानतात त्यामुळे इथली गोदावरीही गंगेसारखीच पवित्र (आणि प्रदूषित) आहे. हिच्या घाटावरही हे क्रियाकर्म चालते. ब्राह्मणातील किरवंत या पोटजातीचे लोक हे विधी करतात. आणि तेच त्यांचे उपजीविकेचे साधन असते. यांना ब्राह्मणातील इतर पोटजातीहून कमी लेखले जाते. त्यांना शुभ सभारंभाला न बोलावणे, मंदिरात गंध-पूजेचा मान न देणे अशा प्रकारे अवहेलना करून केवळ मर्तिकालाच त्यांचे स्मरण होते. पण यांच्यातील काही लोकही 'दशक्रिया विधींचं' व्यावसायिकरण करून, मृत व्यक्तीच्या आधीच दुःखी-कष्टी नातेवाईकांना अमूक अमूक विधी न केल्यास आत्म्यास शांती मिळणार नाही अशी भीती घालून समाजातील इतर लोकांचे शोषण करतात. काहीजण निर्ढावून अक्षरशः आपले दुकान मांडून लोकांना गिऱ्हाईक बनवून, इतकेच नव्हे त...

"न्यूड : नग्नतेतील मुक्त कलाविष्कार"

आत्ता 'न्यूड' पाहिला. एखाद्या कथेचं चित्रात रूपांतर व्हावं आणि प्रत्येक ब्रशस्ट्रोक सोबत तयार व्हावी एक एक अप्रतिम फ्रेम आणि त्यांची एक बनावी चित्रमालिका या साऱ्यांनी बनला आहे 'न्यूड'. गावातून मुंबईला आलेली यमुना 'न्यूड मॉडेल' बनते. का? कशी? त्याचे होणारे परिणाम, पात्रांची आणि शेवटी आपलीही बदलत जाणारी विचारसरणी याची गोष्ट आहे न्यूड मध्ये.  चित्रपटाची कथा नग्नतेवर बेतली असली तरी कुठेही भडक होत नाही. अश्लीलतेचा लवलेश नाही. मॉडेल म्हणून तयार होताना आधी यमुनेची होणारी तडफड, तगमग, अगतिकता आपल्याला अस्वस्थ करून सोडते.  चित्रपटात एक मोठा कलाकार (एम.एफ.हुसेन वर बेतलेला)  मलिक (नसिरुद्दीन शाह) नायिकेचं न्यूड काढता काढता तिच्याशी आणि आपल्याशीही गप्पा मारतो. "मी घोड्यांची चित्रं काढली तर कुणाला हरकत नाही, पारव्यांची चित्र काढली कुणी बोलत नाही, मग मी माणसांची चित्रं काढली तर इतका हंगामा कशासाठी?", कलाकार 'रुह' पाहत असतो. तीच चितारत असतो.  चित्रपटाची कथा नग्नतेवर भाष्य करत असली तरी कुठेही भडकपणा नाही. काही प्रसंग अंगावर येतात पण ते त्य...