Skip to main content

उडता पंजाब : दबलेला आतंक

पंजाबमधील ड्रग्जच्या विळख्यात सापडलेल्या तरुण मंडळी, अमली पदार्थांची तस्करी, सध्याच्या पिढीलाच पोखरणारं नार्को पॉलिटिक्स या सगळ्यांचं चित्रण 'उडता पंजाब' सिनेमात पाहायला मिळतं.

आपल्या गाण्यांतून नशा, हिंसा ग्लोरिफाय करणारा, स्वतःही ड्रग्जच्या आहारी गेलेला तरुण रॉकस्टार टॉमी सिंग (शाहिद कपूर) , ड्रग्ज माफियांच्या जाळ्यात अडकलेली एक बिहारी तरुणी कुमारी पिंकी (आलिया भट), अमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या रुग्णांवर उपचार करणारी डॉक्टर प्रीत (करीना कपूर), आणि पोलीस अधिकारी सरताज (दिलजीत) ही उडता पंजाब ची प्रमुख पात्रं योगायोगाने, वेगवेगळ्या संदर्भाने एकत्र येतात. एकीकडे सरताज आणि प्रीत ड्रॅग रॅकेट व्यवस्थेविरुद्ध लढण्यासाठी एकत्र आले आहेत हा एक ट्रॅक तर एकीकडे ऐन तरुणाईत ड्रग्जमुळे स्वतःची स्वप्ने पिचलेले टॉमी आणि पिंकी, यांचीबस्वतःची स्वतःशी लढाई हा एक ट्रॅक आहे. मधेच भ्रष्टाचारी सरकारी यंत्रणा आणि झिंगून भोगणारी तरुणाई असे ट्रॅक या सिनेमात येतात.

चित्रपटातील अतिशिवराळ भाषेमुळे, काही बाबी अश्लील (म्हणजे नेमकं काय काय?🤔) भासल्यामुळे सेन्सॉर बोर्डाच्या अनेक 'कटकटिंग' नंतर हा चित्रपट प्रेक्षकांसाठी खुला झाला. पण खरं सांगायचं तर ती भाषा म्हणा किंवा नशापाण्याच्या जगात हरवलेली पात्रं म्हणा, हे सगळं वास्तव आहे. कितीही कटू असलं तरी आजच्या तरुण पंजाबचं हे सत्य स्वरूप आहे. चित्रपट काही ठिकाणी अंगावर येतो, पण म्हणूनच अमली पदार्थांचे भयंकर दुष्परिणाम ठळकपणे, विदारकपणे मांडले जाता येतात.

दिलजीतने पोलीसाची भूमिका, त्याच्यात झालेले बदल छान साकारले आहेत. 'प्रीत' च्या भूमिका खूप महत्वाची भूमिका असूनही करीना हवी तितकी लक्षात राहत नाही. शाहिद आणि आलियाने एक नंबर, अफलातून अभिनय केलेला आहे. (हाच शाहिद 'पद्मावत' मध्ये पूर्ण चित्रपटभर बद्धकोष्ठ झाल्यासारखे भाव घेऊन कसा काय वावरतो  हा प्रश्न पडतो). इथे त्याने तुफान माजवलाय, आग ओकलीये. आलिया आणि त्याचे प्रसंग तर इतके लाजवाब झाले आहेत की हे दोघेही बेशक गुणी कलाकार आहेत याची प्रचिती येते. आलियाने 'हायवे' पेक्षाही या सिनेमात कम्माल केली आहे. असंख्य घाव झेलून, घात पचवूनही 'टुटे नाही है हम' हे ती पिंकी म्हणून बोलते तेव्हा शहारा येतो. इतकं जबरदस्त व्यक्तिमत्व तिने सहजपणे साकारलं आहे.

अभिषेक चौबेचे दिग्दर्शन, अमित त्रिवेदीचं संगीत सुरेख. 'इक कुडी' हे गाणं तर माझं 2017 च्या आवडत्या गाण्यांपैकी एक. भारदस्त पार्श्वसंगीताचाही उल्लेख करावासा वाटतो. मधेच जेंव्हा सिनेमा संथ होतोय असं वाटतं तेव्हा पार्श्वसंगीत त्याला गती देतं. तर चित्रपटातील शांतता तुमचं काळीज चिरत जाते.

आलिया आणि शाहिद साठी तर हा सिनेमा पाहवाच, मी तर म्हणेन की लोकांनी विशेषतः तरुणांनी हा चित्रपट अशासाठी बघावा की त्यांना कळावं, काही क्षणांची धुंदी कित्येकांचं जीवन उध्वस्त करणारी असते. ड्रग रॅकेटमुळे कित्येक जणांचं शोषण अजूनही चालू आहे.

चित्रपटाची लांबी जरा कमी केली असती तर अजून चांगलं वाटलं असतं. सिनेमॅटोग्राफीही दिलखेचक आहे. टीव्हीवर मध्ये मध्ये ads येतील आणि लिंक टुटेल. हा लक्ष देऊन पाहायचा सिनेमा आहे. त्यामुळे नेटफ्लिक्सवर आहे. (नेटफ्लिक्स घेतल्यापासून त्याचीच लाल करत आहे सध्या). एकदा तरी जरूर पाहा, 'उडता पंजाब'..

- रमा

Comments

Popular posts from this blog

दशक्रिया

मेलेल्या व्यक्तीचे दहन झाल्यानंतर, पुढील काही दिवस 'दशक्रिया विधी' केले जातात. असे समजतात की याने आत्म्याला शांती मिळते, जन्म-मरणाच्या चक्रातून सुटका होते आणि मोक्ष प्राप्त होतो. तिसऱ्या दिवशी राख नदीत सोडण्यापासून ते तेराव्यापर्यंत या विधी चालतात. पवित्र गंगेच्या तीरावर या विधी करतात. महाराष्ट्रातल्या पैठणला दक्षिण काशी मानतात त्यामुळे इथली गोदावरीही गंगेसारखीच पवित्र (आणि प्रदूषित) आहे. हिच्या घाटावरही हे क्रियाकर्म चालते. ब्राह्मणातील किरवंत या पोटजातीचे लोक हे विधी करतात. आणि तेच त्यांचे उपजीविकेचे साधन असते. यांना ब्राह्मणातील इतर पोटजातीहून कमी लेखले जाते. त्यांना शुभ सभारंभाला न बोलावणे, मंदिरात गंध-पूजेचा मान न देणे अशा प्रकारे अवहेलना करून केवळ मर्तिकालाच त्यांचे स्मरण होते. पण यांच्यातील काही लोकही 'दशक्रिया विधींचं' व्यावसायिकरण करून, मृत व्यक्तीच्या आधीच दुःखी-कष्टी नातेवाईकांना अमूक अमूक विधी न केल्यास आत्म्यास शांती मिळणार नाही अशी भीती घालून समाजातील इतर लोकांचे शोषण करतात. काहीजण निर्ढावून अक्षरशः आपले दुकान मांडून लोकांना गिऱ्हाईक बनवून, इतकेच नव्हे त...

शांतनू मॉइत्रा: बहती हवासा बावरा मन

प्रसिद्ध पार्श्वसंगीतकार, संगीतकार शांतनू मॉइत्राचा जन्म 22 जानेवारी 1968 मध्ये लखनौ इथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण (स्प्रिंगडेल स्कूल) येथे झाले. " इथे गाता गाता माझ्यातल्या संगीताला वाव मिळाला. आत्मविश्वास मिळाला " असे ते सांगतात. त्यांच्याच स्प्रिंगडेल स्कूलचे माजी विद्यार्थी सुश्मित बोस या अर्बन-लोकगीत गायककडून त्यांनी संगीताचे धडे घेतले. इकॉनॉमिक्स मध्ये डिग्री पूर्ण केल्यानंतर ते एका ऍड एजन्सी मध्ये क्लायंट सर्व्हिस एक्सिक्यूटिव्ह म्हणून रुजू झाले, आणि संगीत केवळ छंद बनून राहिला होता.  एकदा अगदी लास्ट मिनिटाला जिंगल बनवायची आहे असे प्रदीप सरकार यांनी शांतनुना सांगितले. त्यांनी ते जिंगल बनवलं. ते होतं " बोले मेरे लिप्स, आय लव्ह अंकल चिप्स ". यानंतर त्यांनी अनेक कंपनींसाठी जिंगल्स बनवले. नंतर त्यांनी त्यावेळी प्रसिद्ध अशा इंडी-पॉप अल्बम्स साठी संगीत दिले. शुभा मूदगल यांनी गायलेली " अब के सावन ऐसे बरसे " आणि '' सपना देखा है मैने "  ही त्यातली काही गाजलेली गीते. 2002 मध्ये मुंबईला शिफ्ट झाल्यानंतर त्यांना सुधीर मिश्रांच्या ...

"न्यूड : नग्नतेतील मुक्त कलाविष्कार"

आत्ता 'न्यूड' पाहिला. एखाद्या कथेचं चित्रात रूपांतर व्हावं आणि प्रत्येक ब्रशस्ट्रोक सोबत तयार व्हावी एक एक अप्रतिम फ्रेम आणि त्यांची एक बनावी चित्रमालिका या साऱ्यांनी बनला आहे 'न्यूड'. गावातून मुंबईला आलेली यमुना 'न्यूड मॉडेल' बनते. का? कशी? त्याचे होणारे परिणाम, पात्रांची आणि शेवटी आपलीही बदलत जाणारी विचारसरणी याची गोष्ट आहे न्यूड मध्ये.  चित्रपटाची कथा नग्नतेवर बेतली असली तरी कुठेही भडक होत नाही. अश्लीलतेचा लवलेश नाही. मॉडेल म्हणून तयार होताना आधी यमुनेची होणारी तडफड, तगमग, अगतिकता आपल्याला अस्वस्थ करून सोडते.  चित्रपटात एक मोठा कलाकार (एम.एफ.हुसेन वर बेतलेला)  मलिक (नसिरुद्दीन शाह) नायिकेचं न्यूड काढता काढता तिच्याशी आणि आपल्याशीही गप्पा मारतो. "मी घोड्यांची चित्रं काढली तर कुणाला हरकत नाही, पारव्यांची चित्र काढली कुणी बोलत नाही, मग मी माणसांची चित्रं काढली तर इतका हंगामा कशासाठी?", कलाकार 'रुह' पाहत असतो. तीच चितारत असतो.  चित्रपटाची कथा नग्नतेवर भाष्य करत असली तरी कुठेही भडकपणा नाही. काही प्रसंग अंगावर येतात पण ते त्य...