Skip to main content

'कारखानीसांची वारी Ashes on a road trip




 मंगेश जोशींचा 'कारखानीसांची वारी' हा अतरंगी चित्रपट पाहिला. लिओ टॉलस्टॉयची एक अतिशय प्रसिद्ध कादंबरी आहे ऍना कॅरेनिना. त्याच्या सुरुवातीला एक कोट आहे. "All Happy families resemble one another, but each unhappy family is unhappy in its own way.’'. 'कारखानीसांची वारी Ashes on a road trip' हाही या कोटने सुरू होतो. एक सर्वसाधारण एकत्र कुटुंब. ज्यातील ज्येष्ठ व्यक्ती पुरुषोत्तम कारखानीस याचे निधन झालेले आहे. त्याच्या अंतिम इच्छेनुसार आता त्याचे 3 वयस्कर भाऊ , एक बहीण आणि मुलगा त्याच्या अस्थी गावाकडल्या घरात, शेतात आणि शेवटी पंढरपूरला चंद्रभागेत विसर्जित करण्यासाठी निघाले आहेत. अस्थीविसर्जन झाल्यानंतर एका लाखोट्यातील पत्राचे वाचन करावे असेही सांगून ठेवले आहे. आता कारखानीस परिवार एक टिपिकल मध्यमवर्गीय एकत्र कुटुंब आहे. एकत्र असूनही प्रत्येकाची वेगळीच कहाणी आहे. वेगळीच सुखदुःखे, जगण्याची ओझी आहेत. पण एकमेकांना सांगायची चोरी असे हटवादी आणि अहंकारी प्रत्येकाचे स्वभाव. लखोट्यातील पत्रात इच्छापत्र असेल आणि माझ्या वाट्याला काही ना काही नक्कीच आले असेल जगणे तरून जायला असा प्रत्येकाचा समज. समज म्हणण्यापेक्षाही एक तीव्र इच्छा म्हणू. एक प्रकारचा लोभ या सर्वाना अस्थीविसर्जनाच्या निमित्ताने एकत्र आणतं आणि हे कुटुंब प्रवास करून कटु-गोड प्रसंगांना सामोरं जातं त्याची ही कहाणी आहे. हा वर्णन करून सांगायचा नाही प्रत्यक्ष पाहायचा सिनेमा आहे. तगडी स्टारकास्ट, त्यांचे एक अन एक एक्सप्रेशन टिपण्यासारखे, प्रत्येकाने एक नमुना उभा केला आहे. मृत्यूसारख्या गंभीर विषयाला हलकं फुलकं करता येतं हे 'व्हेंटिलेटर' सारख्या चित्रपटात पाहिले होते. तसाच हा अनुभव होता. आपल्या अवतीभवती घडत असलेलीच एखादी गोष्ट आहे अशी अनुभूती येते. एकत्र असूनही विभक्त प्रवास ही वास्तवाची समज या चित्रपटात आपल्याला मिळते. मोहन आगाशे, अमेय वाघ, गीतांजली कुलकर्णी, प्रदीप जोशी, अजित अभ्यंकर, मृण्मयी देशपांडे यांची या ही रोड ट्रिप. वंदना गुप्ते, शुभांगी गोखले याचे एक उपकथानकही आहे. या सगळ्यांनी एक कुटुंब एकत्र असूनही दुसऱ्याच्या मनातले भाव माहीत नाहीत, इतके आपण कसे आत्ममग्न होतो की कुटुंबाचा विचारच मनात येत नाहीत असे प्रश्न पडतात. लखोट्यातल्या चिठ्ठीत नेमकं काय लिहिलेलं असतं, प्रत्येकाची काय रिऍक्शन येते हे पाहायला नक्की पाहा 'कारखानीसांची वारी'. 


रमा

Comments

Popular posts from this blog

गीताई आणि आई

"आई आम्हाला ना गीताई शिकवत आहेत त्या नवीन मॅडम. तू मला आणि दादूला म्हणायला लावायचीस बघ. ते आत्ता शाळेत म्हणायला आहे." "अरे वा! अगं पिकू, अजूनही सांगतेच की मी, की करा पाठ, म्हणा, शिकवलेली स्तोत्रं, रामरक्षा, मनाचे श्लोक, अथर्वशीर्ष. पण वेळच नसतो तुम्हाला. आमच्या लहानपणी..असो.. "ए दादू, ये इकडे. बघ बघ. ते बघ आई परत स्वतःशी पुटपुटायला लागली" "काय विषय काय आहे?" - दादू "दादू, पिकू या असे समोर बरं" "आई मला अभ्यास आहे आणि दादूला टेनिस ला जायचंय म्हणतोय. हो ना रे?" "2 मिनिट थांब दादू. या दोघे समोर. खूप दिवस माझ्या मनात होतं हे, आणि त्यामागे काही कारणेही आहेत.  तुम्ही शांतपणे अर्धा तास तरी यासाठी देऊच शकता ना, टीव्ही आणि कॉम्प्युटर बंद करून? मग नंतर जा खेळायला आणि अभ्यासाला. कारण तेही महत्वाचं आहेच." " अगं आम्हाला 0 काही कळत नाही आणि कशाला उगाच म्हणायचं? आम्हाला कंटाळा येतो." "तुम्हाला माहीत आहे, हे सारं आम्ही का म्हणायला सांगतो? यामागे काही धार्मिक कारणं नाहीयेत. तुमचं पाठां...

दशक्रिया

मेलेल्या व्यक्तीचे दहन झाल्यानंतर, पुढील काही दिवस 'दशक्रिया विधी' केले जातात. असे समजतात की याने आत्म्याला शांती मिळते, जन्म-मरणाच्या चक्रातून सुटका होते आणि मोक्ष प्राप्त होतो. तिसऱ्या दिवशी राख नदीत सोडण्यापासून ते तेराव्यापर्यंत या विधी चालतात. पवित्र गंगेच्या तीरावर या विधी करतात. महाराष्ट्रातल्या पैठणला दक्षिण काशी मानतात त्यामुळे इथली गोदावरीही गंगेसारखीच पवित्र (आणि प्रदूषित) आहे. हिच्या घाटावरही हे क्रियाकर्म चालते. ब्राह्मणातील किरवंत या पोटजातीचे लोक हे विधी करतात. आणि तेच त्यांचे उपजीविकेचे साधन असते. यांना ब्राह्मणातील इतर पोटजातीहून कमी लेखले जाते. त्यांना शुभ सभारंभाला न बोलावणे, मंदिरात गंध-पूजेचा मान न देणे अशा प्रकारे अवहेलना करून केवळ मर्तिकालाच त्यांचे स्मरण होते. पण यांच्यातील काही लोकही 'दशक्रिया विधींचं' व्यावसायिकरण करून, मृत व्यक्तीच्या आधीच दुःखी-कष्टी नातेवाईकांना अमूक अमूक विधी न केल्यास आत्म्यास शांती मिळणार नाही अशी भीती घालून समाजातील इतर लोकांचे शोषण करतात. काहीजण निर्ढावून अक्षरशः आपले दुकान मांडून लोकांना गिऱ्हाईक बनवून, इतकेच नव्हे त...

सलील चौधरी : एक श्रद्धांजली

बंगाल प्रांत हा मुळातच मुग्ध करणारा प्रदेश आहे. कलाप्रेमींवर तर बंगालची कायमच जादू राहिली आहे. के एल सेहगल पासून अनिल बिस्वास, एस डी, आर डी, हेमंतकुमार, किशोरकुमार, मन्ना डे ते लोकगीतं गाणारे कुणी अनामिक, इथलं संगीत अत्यंत मधुर, मोहक संगीत आहे. या सर्वांतच मला 'सलील चौधरी' या संगीतकाराने नेहमीच मोहवून टाकलं आहे. आज सलील चौधरी यांचा जन्मदिवस. सुरुवात झाली 'मधुमतीने'. एकूण 12 गाण्यांचं अप्रतिम प्रदर्शन. मुकेशची तरल "दिल तडप तडप" आणि "सुहाना सफर और ये मौसम हसीं", एकीकडे लताची आर्त हाक  "आजा रे परदेसी", खेळकर "घडी घडी मोरा दिल धडके" आणि "जुल्मी संग आँख लडी" तर दुसरीकडे मोहम्मद रफीची "टुटे हुए ख्वाबोंने" ते "जंगलमे मोर नाचा" अशी बहुरंगी गाणी. "दैय्या रे, दैय्या रे चढ गयो पापी बिछुआ" गाण्याप्रमाणे  लहानपणापासूनच सलीलदांनी मला झपाटून टाकलं. आणि फिल्मी गीतांच्या जादुई दुनियेत मी प्रवेश केला. मुकेशने सलीलदांच्या निर्देशनखाली ज्याप्रमाणे गायले आहे ते खरंच उल्लेखनीय आहे. अगदी ...