Skip to main content

द मॅरीड वूमन - रिक्त की मुक्त?

Alt बालाजी ची नवीन वेब सिरीज द मॅरीड वूमन पाहिली. मंजू कपूर यांच्या याच नावाच्या कादंबरीवर आधारित. आस्था एक ड्युटीफुल, कर्तव्यदक्ष बायको, सून, आई पण त्याच बरोबर एक कॉलेज टीचर. संथ आणि एकसुरी बनलेलं आहे तिचं आयुष्य. सतत गृहीत धरलं जाणं, सतत दुय्यम वागणूक. पण विना तक्रार नाती निभावत राहायचं. कारण समाजाने तसे नियम आखलेत. तिची कहाणी तीच आपल्याशी बोलत सांगते पूर्णवेळ. 


ऐजाज खान(इमाद शाह), तिने लिहिलेले नाटकाचे दिग्दर्शन करणारा एक स्वतंत्र, पुरोगामी विचारांचा, सर्वधर्मसमभाव मानणारा, त्याच्याकडे ओढली जात आहे आस्था पण दुर्दैवाने त्याचा मृत्यू होतो आणि तिच्या आयुष्यात येते पिपलिका.(मोनिका डोग्रा) ऐजाज ची विधवा. एक आर्टिस्ट. आस्थाहून खूप निराळी. दोघी दोन ध्रुवांसारख्या, तरी एकमेकींच्या जवळ खूप जवळ येतात, प्रेमात पडतात. पिपलिकाच्या मते, "प्यार जेंडर नही, रुह देखके होता है". 

काय आहे नक्की या दोघींचं नातं? केवळ तनाचं की मनाचंही? भावनांचा कोसळणारा प्रपात, जो चिंब करत आहे दोघींनाही. हे सगळं हवं हवसं आहे आस्थाला. पण ती विवाहित आहे, तिला एक सर्वसाधारण कुटुंब आहे, मुलं आहेत. ती त्यांना सोडून तर देऊ शकत नाही या समाजाच्या दृष्टीने पाप समजल्या जाणाऱ्या नात्यासाठी. सत्यासाठी. आणि केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी. 

पिपलिका तिला तिच्या हृदयाच्या खोलात पाहायला शिकवते, स्वतःला काय हवंय हे निवडायला शिकवते. आस्था मुक्त होते, लग्नाच्या बंधनातून एक खुला श्वास, गरमीच्या दिवसातील गार वाऱ्याची झुळूक आहे तिच्यासाठी हे नवीन नातं. ती पिपलिकासाठी घरदार सोडेल? समाजाला सामोरी जाईल? एक भारतीय विवाहित स्त्री केवळ पुरुषाकडून नाही तर स्त्रीकडूनही फसवली जाऊ शकते, गृहीत धरली जाऊ शकते. कोणाकडे जाते शेवटी आस्था? कुठला मार्ग निवडते? दोन्हीही मार्ग खडतर असणार आहेत तिच्यासाठी. ती खऱ्या अर्थाने काय असेल रिक्त? की पूर्णपणे मुक्त? 

वेब सिरीज काही ठिकाणी ढिली पडते पण संवाद आणि संगीत ती कसर भरून काढतात. याचा टायटल ट्रॅक अप्रतिम आहे. एकदा पाहण्यासाठी चांगली आहे सिरीज. साहिर रझा चे दिग्दर्शन छान आहे. 

समाजाची, खास करून भारतीय समाजाची, कुटुंबाची मानसिकता, समलिंगी प्रेमाकडे पाहण्याचा दूषित दृष्टिकोन, स्वतःची ओळख झाल्यावर इतर नाती तितकी जाचक न वाटणं या सगळ्यांना स्पर्श करते ही सिरीज. 


4/5


रमा






Comments

उत्तम समीक्षा

Popular posts from this blog

शांतनू मॉइत्रा: बहती हवासा बावरा मन

प्रसिद्ध पार्श्वसंगीतकार, संगीतकार शांतनू मॉइत्राचा जन्म 22 जानेवारी 1968 मध्ये लखनौ इथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण (स्प्रिंगडेल स्कूल) येथे झाले. " इथे गाता गाता माझ्यातल्या संगीताला वाव मिळाला. आत्मविश्वास मिळाला " असे ते सांगतात. त्यांच्याच स्प्रिंगडेल स्कूलचे माजी विद्यार्थी सुश्मित बोस या अर्बन-लोकगीत गायककडून त्यांनी संगीताचे धडे घेतले. इकॉनॉमिक्स मध्ये डिग्री पूर्ण केल्यानंतर ते एका ऍड एजन्सी मध्ये क्लायंट सर्व्हिस एक्सिक्यूटिव्ह म्हणून रुजू झाले, आणि संगीत केवळ छंद बनून राहिला होता.  एकदा अगदी लास्ट मिनिटाला जिंगल बनवायची आहे असे प्रदीप सरकार यांनी शांतनुना सांगितले. त्यांनी ते जिंगल बनवलं. ते होतं " बोले मेरे लिप्स, आय लव्ह अंकल चिप्स ". यानंतर त्यांनी अनेक कंपनींसाठी जिंगल्स बनवले. नंतर त्यांनी त्यावेळी प्रसिद्ध अशा इंडी-पॉप अल्बम्स साठी संगीत दिले. शुभा मूदगल यांनी गायलेली " अब के सावन ऐसे बरसे " आणि '' सपना देखा है मैने "  ही त्यातली काही गाजलेली गीते. 2002 मध्ये मुंबईला शिफ्ट झाल्यानंतर त्यांना सुधीर मिश्रांच्या ...

दशक्रिया

मेलेल्या व्यक्तीचे दहन झाल्यानंतर, पुढील काही दिवस 'दशक्रिया विधी' केले जातात. असे समजतात की याने आत्म्याला शांती मिळते, जन्म-मरणाच्या चक्रातून सुटका होते आणि मोक्ष प्राप्त होतो. तिसऱ्या दिवशी राख नदीत सोडण्यापासून ते तेराव्यापर्यंत या विधी चालतात. पवित्र गंगेच्या तीरावर या विधी करतात. महाराष्ट्रातल्या पैठणला दक्षिण काशी मानतात त्यामुळे इथली गोदावरीही गंगेसारखीच पवित्र (आणि प्रदूषित) आहे. हिच्या घाटावरही हे क्रियाकर्म चालते. ब्राह्मणातील किरवंत या पोटजातीचे लोक हे विधी करतात. आणि तेच त्यांचे उपजीविकेचे साधन असते. यांना ब्राह्मणातील इतर पोटजातीहून कमी लेखले जाते. त्यांना शुभ सभारंभाला न बोलावणे, मंदिरात गंध-पूजेचा मान न देणे अशा प्रकारे अवहेलना करून केवळ मर्तिकालाच त्यांचे स्मरण होते. पण यांच्यातील काही लोकही 'दशक्रिया विधींचं' व्यावसायिकरण करून, मृत व्यक्तीच्या आधीच दुःखी-कष्टी नातेवाईकांना अमूक अमूक विधी न केल्यास आत्म्यास शांती मिळणार नाही अशी भीती घालून समाजातील इतर लोकांचे शोषण करतात. काहीजण निर्ढावून अक्षरशः आपले दुकान मांडून लोकांना गिऱ्हाईक बनवून, इतकेच नव्हे त...

"न्यूड : नग्नतेतील मुक्त कलाविष्कार"

आत्ता 'न्यूड' पाहिला. एखाद्या कथेचं चित्रात रूपांतर व्हावं आणि प्रत्येक ब्रशस्ट्रोक सोबत तयार व्हावी एक एक अप्रतिम फ्रेम आणि त्यांची एक बनावी चित्रमालिका या साऱ्यांनी बनला आहे 'न्यूड'. गावातून मुंबईला आलेली यमुना 'न्यूड मॉडेल' बनते. का? कशी? त्याचे होणारे परिणाम, पात्रांची आणि शेवटी आपलीही बदलत जाणारी विचारसरणी याची गोष्ट आहे न्यूड मध्ये.  चित्रपटाची कथा नग्नतेवर बेतली असली तरी कुठेही भडक होत नाही. अश्लीलतेचा लवलेश नाही. मॉडेल म्हणून तयार होताना आधी यमुनेची होणारी तडफड, तगमग, अगतिकता आपल्याला अस्वस्थ करून सोडते.  चित्रपटात एक मोठा कलाकार (एम.एफ.हुसेन वर बेतलेला)  मलिक (नसिरुद्दीन शाह) नायिकेचं न्यूड काढता काढता तिच्याशी आणि आपल्याशीही गप्पा मारतो. "मी घोड्यांची चित्रं काढली तर कुणाला हरकत नाही, पारव्यांची चित्र काढली कुणी बोलत नाही, मग मी माणसांची चित्रं काढली तर इतका हंगामा कशासाठी?", कलाकार 'रुह' पाहत असतो. तीच चितारत असतो.  चित्रपटाची कथा नग्नतेवर भाष्य करत असली तरी कुठेही भडकपणा नाही. काही प्रसंग अंगावर येतात पण ते त्य...