Skip to main content

भांडण

"हॅलो दादू, कॉलेज नंतर डायरेक्ट घरी ये. ".. "असं आई म्हणतेय"..नाही नाही म्हणता म्हणता  पिकलपोनीने शेवटी दादूला फोन लावलाच. 

दादुने पण टेचात विचारलं, "का? घरी पाहुणे येणारेत? मटन बनवलंय? का मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है?? नाही म्हणजे फक्त तेवढ्यासाठीच येत असतो ना मी घरी? असं काहीसं ऐकलं होतं मी.. "
जरासं ओशाळून पिकलपोनी म्हणाली, "सॉरी ना रे दादू.. तू सारखा बाहेरच असतोस. पूर्वीसारखा आमच्या बरोबर घालवायला तुला वेळच नसतो.. रात्रंदिवस अभ्यास असतो. म्हणून चिडून तसलं काही तरी बोलले ना रे मी.. आता सॉरी की. प्लीज..प्लीज..प्लीज"... 
दादा एकदम तोडून म्हणाला, "बरं.. बरं.. बघतो..जमलं तर चक्कर टाकतो दुपारी." फोन कट. 

"हट, चक्कर टाकतो म्हणे. सरळ नाही येणार म्हणून सांग की" पिकलपोनी त्याची नक्कल करत स्वतःशीच चरफडली. "नाहीच येणार तो नक्की."

त्याचं असं झालं होतं, पिकलपोनी आणो दादूचं कुठल्याशा फुसक्या कारणाने झालं होतं भांडण. भांडता भांडता भांडण एवढं वाढलं की दोघांना भांडणाचा मूळ मुद्दाच आठवेना. तरीही ओरडाओरडी झाली, पिकूचं भोकाड पसरून झालं. शेवटी तिचं नाक लालबूंद होईपर्यंत आणि दादाची कानशिलं गरम होण्यापर्यंत युद्ध रंगलं. आणि मग.. मग काय, दादूनं सभात्याग केला. फुल्ल गट्टी फू! अबोला. 

दादू आजकाल मित्रांच्याच रूमवर पडीक असे. काल पण तो सणाचा म्हणून आला, छान गुढी उभी केली, आई बाबांशी गप्पा मारल्या, २ पुरणपोळ्या गट्टम केल्या. खिदळला सुद्धा, आता पिकूला बासच झालं.. "मी काय अदृश्य आहे होय? माझ्याकडं बघितलं पण नाही? इतकं असतंय होय? जा बाबा!!"

तरीही तिनं आज त्याला फोन केलाच, तर त्यावर उत्तर काय? "बरं.. बरं.. बघतो.." दुपार उलटत आलेली, दादू काही आलाच नाही. डोळ्यात टपोरे  थेंब आले घळाघळा... "हम्म्म!!आलाय मोठा!!जाऊ दे तिकडं, मी काय वाट-बिट बघणार नाहीये".. 

आईनं दादूला फोन केला, "काय रे बाबा, कुठे आहेस? येणार म्हंटला होतास ना?".. "नाही??? बरं बरं.. " पिकू ऐकत होतीच. चिडून गेली शेजारी झोपीकडे खेळायला. 

झोपीचा छोटा भाऊ पाळण्यात छान हात-पाय हलवत होता. मधेच त्याला 'भॉ' केलं की 'खे-खे' करून इतकं गोड हसत होता. त्याला बघून पिकलपोनी म्हणाली, "झोपी, बरंय तुला छोटुलाच भाऊ आहे ते. मोठे भाऊ खूप चिडके बिब्बे असतात." थोडावेळ बाळाशी खेळून मग पिकू घरी जायला निघाली, "चला, ७ वाजत आले, बाय बाय छोटू बालू, बाय बाय झोपी" .. 

घरी येऊन बघते तर काय? दादू किचन मधून बाहेर आला, "टडा, आमच्या रडूबाईंसाठी".. पिकूला एकदम काही कळेचना. दादाने पिकलपोनीचा आवडता पास्ता बनवला होता.. "कित्ती माया करतो दादू आपली.. आणि आपण कित्ती येडचॅप सारखे वागतो".. ती एकदम दादूला बिलगली. "दादू, थँक्यू, मी आत्ता कधी च नाही भांडणार.. "भरव मला एक घास" - आ.. 

दादुने एक भास भरवला, "ए नाटक, ते खाऊन झाल्यावर सगळ्यांच्या प्लेट्स तू धुणार आहेस, कळलं ना?" आणि दोघे पण हसले. 

अशा रीतीनं तब्बल ९ दिवसांचं भांडण संपुष्टात आलं.. 

Comments

Popular posts from this blog

दशक्रिया

मेलेल्या व्यक्तीचे दहन झाल्यानंतर, पुढील काही दिवस 'दशक्रिया विधी' केले जातात. असे समजतात की याने आत्म्याला शांती मिळते, जन्म-मरणाच्या चक्रातून सुटका होते आणि मोक्ष प्राप्त होतो. तिसऱ्या दिवशी राख नदीत सोडण्यापासून ते तेराव्यापर्यंत या विधी चालतात. पवित्र गंगेच्या तीरावर या विधी करतात. महाराष्ट्रातल्या पैठणला दक्षिण काशी मानतात त्यामुळे इथली गोदावरीही गंगेसारखीच पवित्र (आणि प्रदूषित) आहे. हिच्या घाटावरही हे क्रियाकर्म चालते. ब्राह्मणातील किरवंत या पोटजातीचे लोक हे विधी करतात. आणि तेच त्यांचे उपजीविकेचे साधन असते. यांना ब्राह्मणातील इतर पोटजातीहून कमी लेखले जाते. त्यांना शुभ सभारंभाला न बोलावणे, मंदिरात गंध-पूजेचा मान न देणे अशा प्रकारे अवहेलना करून केवळ मर्तिकालाच त्यांचे स्मरण होते. पण यांच्यातील काही लोकही 'दशक्रिया विधींचं' व्यावसायिकरण करून, मृत व्यक्तीच्या आधीच दुःखी-कष्टी नातेवाईकांना अमूक अमूक विधी न केल्यास आत्म्यास शांती मिळणार नाही अशी भीती घालून समाजातील इतर लोकांचे शोषण करतात. काहीजण निर्ढावून अक्षरशः आपले दुकान मांडून लोकांना गिऱ्हाईक बनवून, इतकेच नव्हे त...

शांतनू मॉइत्रा: बहती हवासा बावरा मन

प्रसिद्ध पार्श्वसंगीतकार, संगीतकार शांतनू मॉइत्राचा जन्म 22 जानेवारी 1968 मध्ये लखनौ इथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण (स्प्रिंगडेल स्कूल) येथे झाले. " इथे गाता गाता माझ्यातल्या संगीताला वाव मिळाला. आत्मविश्वास मिळाला " असे ते सांगतात. त्यांच्याच स्प्रिंगडेल स्कूलचे माजी विद्यार्थी सुश्मित बोस या अर्बन-लोकगीत गायककडून त्यांनी संगीताचे धडे घेतले. इकॉनॉमिक्स मध्ये डिग्री पूर्ण केल्यानंतर ते एका ऍड एजन्सी मध्ये क्लायंट सर्व्हिस एक्सिक्यूटिव्ह म्हणून रुजू झाले, आणि संगीत केवळ छंद बनून राहिला होता.  एकदा अगदी लास्ट मिनिटाला जिंगल बनवायची आहे असे प्रदीप सरकार यांनी शांतनुना सांगितले. त्यांनी ते जिंगल बनवलं. ते होतं " बोले मेरे लिप्स, आय लव्ह अंकल चिप्स ". यानंतर त्यांनी अनेक कंपनींसाठी जिंगल्स बनवले. नंतर त्यांनी त्यावेळी प्रसिद्ध अशा इंडी-पॉप अल्बम्स साठी संगीत दिले. शुभा मूदगल यांनी गायलेली " अब के सावन ऐसे बरसे " आणि '' सपना देखा है मैने "  ही त्यातली काही गाजलेली गीते. 2002 मध्ये मुंबईला शिफ्ट झाल्यानंतर त्यांना सुधीर मिश्रांच्या ...

"न्यूड : नग्नतेतील मुक्त कलाविष्कार"

आत्ता 'न्यूड' पाहिला. एखाद्या कथेचं चित्रात रूपांतर व्हावं आणि प्रत्येक ब्रशस्ट्रोक सोबत तयार व्हावी एक एक अप्रतिम फ्रेम आणि त्यांची एक बनावी चित्रमालिका या साऱ्यांनी बनला आहे 'न्यूड'. गावातून मुंबईला आलेली यमुना 'न्यूड मॉडेल' बनते. का? कशी? त्याचे होणारे परिणाम, पात्रांची आणि शेवटी आपलीही बदलत जाणारी विचारसरणी याची गोष्ट आहे न्यूड मध्ये.  चित्रपटाची कथा नग्नतेवर बेतली असली तरी कुठेही भडक होत नाही. अश्लीलतेचा लवलेश नाही. मॉडेल म्हणून तयार होताना आधी यमुनेची होणारी तडफड, तगमग, अगतिकता आपल्याला अस्वस्थ करून सोडते.  चित्रपटात एक मोठा कलाकार (एम.एफ.हुसेन वर बेतलेला)  मलिक (नसिरुद्दीन शाह) नायिकेचं न्यूड काढता काढता तिच्याशी आणि आपल्याशीही गप्पा मारतो. "मी घोड्यांची चित्रं काढली तर कुणाला हरकत नाही, पारव्यांची चित्र काढली कुणी बोलत नाही, मग मी माणसांची चित्रं काढली तर इतका हंगामा कशासाठी?", कलाकार 'रुह' पाहत असतो. तीच चितारत असतो.  चित्रपटाची कथा नग्नतेवर भाष्य करत असली तरी कुठेही भडकपणा नाही. काही प्रसंग अंगावर येतात पण ते त्य...