Skip to main content

भांडण

"हॅलो दादू, कॉलेज नंतर डायरेक्ट घरी ये. ".. "असं आई म्हणतेय"..नाही नाही म्हणता म्हणता  पिकलपोनीने शेवटी दादूला फोन लावलाच. 

दादुने पण टेचात विचारलं, "का? घरी पाहुणे येणारेत? मटन बनवलंय? का मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है?? नाही म्हणजे फक्त तेवढ्यासाठीच येत असतो ना मी घरी? असं काहीसं ऐकलं होतं मी.. "
जरासं ओशाळून पिकलपोनी म्हणाली, "सॉरी ना रे दादू.. तू सारखा बाहेरच असतोस. पूर्वीसारखा आमच्या बरोबर घालवायला तुला वेळच नसतो.. रात्रंदिवस अभ्यास असतो. म्हणून चिडून तसलं काही तरी बोलले ना रे मी.. आता सॉरी की. प्लीज..प्लीज..प्लीज"... 
दादा एकदम तोडून म्हणाला, "बरं.. बरं.. बघतो..जमलं तर चक्कर टाकतो दुपारी." फोन कट. 

"हट, चक्कर टाकतो म्हणे. सरळ नाही येणार म्हणून सांग की" पिकलपोनी त्याची नक्कल करत स्वतःशीच चरफडली. "नाहीच येणार तो नक्की."

त्याचं असं झालं होतं, पिकलपोनी आणो दादूचं कुठल्याशा फुसक्या कारणाने झालं होतं भांडण. भांडता भांडता भांडण एवढं वाढलं की दोघांना भांडणाचा मूळ मुद्दाच आठवेना. तरीही ओरडाओरडी झाली, पिकूचं भोकाड पसरून झालं. शेवटी तिचं नाक लालबूंद होईपर्यंत आणि दादाची कानशिलं गरम होण्यापर्यंत युद्ध रंगलं. आणि मग.. मग काय, दादूनं सभात्याग केला. फुल्ल गट्टी फू! अबोला. 

दादू आजकाल मित्रांच्याच रूमवर पडीक असे. काल पण तो सणाचा म्हणून आला, छान गुढी उभी केली, आई बाबांशी गप्पा मारल्या, २ पुरणपोळ्या गट्टम केल्या. खिदळला सुद्धा, आता पिकूला बासच झालं.. "मी काय अदृश्य आहे होय? माझ्याकडं बघितलं पण नाही? इतकं असतंय होय? जा बाबा!!"

तरीही तिनं आज त्याला फोन केलाच, तर त्यावर उत्तर काय? "बरं.. बरं.. बघतो.." दुपार उलटत आलेली, दादू काही आलाच नाही. डोळ्यात टपोरे  थेंब आले घळाघळा... "हम्म्म!!आलाय मोठा!!जाऊ दे तिकडं, मी काय वाट-बिट बघणार नाहीये".. 

आईनं दादूला फोन केला, "काय रे बाबा, कुठे आहेस? येणार म्हंटला होतास ना?".. "नाही??? बरं बरं.. " पिकू ऐकत होतीच. चिडून गेली शेजारी झोपीकडे खेळायला. 

झोपीचा छोटा भाऊ पाळण्यात छान हात-पाय हलवत होता. मधेच त्याला 'भॉ' केलं की 'खे-खे' करून इतकं गोड हसत होता. त्याला बघून पिकलपोनी म्हणाली, "झोपी, बरंय तुला छोटुलाच भाऊ आहे ते. मोठे भाऊ खूप चिडके बिब्बे असतात." थोडावेळ बाळाशी खेळून मग पिकू घरी जायला निघाली, "चला, ७ वाजत आले, बाय बाय छोटू बालू, बाय बाय झोपी" .. 

घरी येऊन बघते तर काय? दादू किचन मधून बाहेर आला, "टडा, आमच्या रडूबाईंसाठी".. पिकूला एकदम काही कळेचना. दादाने पिकलपोनीचा आवडता पास्ता बनवला होता.. "कित्ती माया करतो दादू आपली.. आणि आपण कित्ती येडचॅप सारखे वागतो".. ती एकदम दादूला बिलगली. "दादू, थँक्यू, मी आत्ता कधी च नाही भांडणार.. "भरव मला एक घास" - आ.. 

दादुने एक भास भरवला, "ए नाटक, ते खाऊन झाल्यावर सगळ्यांच्या प्लेट्स तू धुणार आहेस, कळलं ना?" आणि दोघे पण हसले. 

अशा रीतीनं तब्बल ९ दिवसांचं भांडण संपुष्टात आलं.. 

Comments

Popular posts from this blog

गीताई आणि आई

"आई आम्हाला ना गीताई शिकवत आहेत त्या नवीन मॅडम. तू मला आणि दादूला म्हणायला लावायचीस बघ. ते आत्ता शाळेत म्हणायला आहे." "अरे वा! अगं पिकू, अजूनही सांगतेच की मी, की करा पाठ, म्हणा, शिकवलेली स्तोत्रं, रामरक्षा, मनाचे श्लोक, अथर्वशीर्ष. पण वेळच नसतो तुम्हाला. आमच्या लहानपणी..असो.. "ए दादू, ये इकडे. बघ बघ. ते बघ आई परत स्वतःशी पुटपुटायला लागली" "काय विषय काय आहे?" - दादू "दादू, पिकू या असे समोर बरं" "आई मला अभ्यास आहे आणि दादूला टेनिस ला जायचंय म्हणतोय. हो ना रे?" "2 मिनिट थांब दादू. या दोघे समोर. खूप दिवस माझ्या मनात होतं हे, आणि त्यामागे काही कारणेही आहेत.  तुम्ही शांतपणे अर्धा तास तरी यासाठी देऊच शकता ना, टीव्ही आणि कॉम्प्युटर बंद करून? मग नंतर जा खेळायला आणि अभ्यासाला. कारण तेही महत्वाचं आहेच." " अगं आम्हाला 0 काही कळत नाही आणि कशाला उगाच म्हणायचं? आम्हाला कंटाळा येतो." "तुम्हाला माहीत आहे, हे सारं आम्ही का म्हणायला सांगतो? यामागे काही धार्मिक कारणं नाहीयेत. तुमचं पाठां...

दशक्रिया

मेलेल्या व्यक्तीचे दहन झाल्यानंतर, पुढील काही दिवस 'दशक्रिया विधी' केले जातात. असे समजतात की याने आत्म्याला शांती मिळते, जन्म-मरणाच्या चक्रातून सुटका होते आणि मोक्ष प्राप्त होतो. तिसऱ्या दिवशी राख नदीत सोडण्यापासून ते तेराव्यापर्यंत या विधी चालतात. पवित्र गंगेच्या तीरावर या विधी करतात. महाराष्ट्रातल्या पैठणला दक्षिण काशी मानतात त्यामुळे इथली गोदावरीही गंगेसारखीच पवित्र (आणि प्रदूषित) आहे. हिच्या घाटावरही हे क्रियाकर्म चालते. ब्राह्मणातील किरवंत या पोटजातीचे लोक हे विधी करतात. आणि तेच त्यांचे उपजीविकेचे साधन असते. यांना ब्राह्मणातील इतर पोटजातीहून कमी लेखले जाते. त्यांना शुभ सभारंभाला न बोलावणे, मंदिरात गंध-पूजेचा मान न देणे अशा प्रकारे अवहेलना करून केवळ मर्तिकालाच त्यांचे स्मरण होते. पण यांच्यातील काही लोकही 'दशक्रिया विधींचं' व्यावसायिकरण करून, मृत व्यक्तीच्या आधीच दुःखी-कष्टी नातेवाईकांना अमूक अमूक विधी न केल्यास आत्म्यास शांती मिळणार नाही अशी भीती घालून समाजातील इतर लोकांचे शोषण करतात. काहीजण निर्ढावून अक्षरशः आपले दुकान मांडून लोकांना गिऱ्हाईक बनवून, इतकेच नव्हे त...

सलील चौधरी : एक श्रद्धांजली

बंगाल प्रांत हा मुळातच मुग्ध करणारा प्रदेश आहे. कलाप्रेमींवर तर बंगालची कायमच जादू राहिली आहे. के एल सेहगल पासून अनिल बिस्वास, एस डी, आर डी, हेमंतकुमार, किशोरकुमार, मन्ना डे ते लोकगीतं गाणारे कुणी अनामिक, इथलं संगीत अत्यंत मधुर, मोहक संगीत आहे. या सर्वांतच मला 'सलील चौधरी' या संगीतकाराने नेहमीच मोहवून टाकलं आहे. आज सलील चौधरी यांचा जन्मदिवस. सुरुवात झाली 'मधुमतीने'. एकूण 12 गाण्यांचं अप्रतिम प्रदर्शन. मुकेशची तरल "दिल तडप तडप" आणि "सुहाना सफर और ये मौसम हसीं", एकीकडे लताची आर्त हाक  "आजा रे परदेसी", खेळकर "घडी घडी मोरा दिल धडके" आणि "जुल्मी संग आँख लडी" तर दुसरीकडे मोहम्मद रफीची "टुटे हुए ख्वाबोंने" ते "जंगलमे मोर नाचा" अशी बहुरंगी गाणी. "दैय्या रे, दैय्या रे चढ गयो पापी बिछुआ" गाण्याप्रमाणे  लहानपणापासूनच सलीलदांनी मला झपाटून टाकलं. आणि फिल्मी गीतांच्या जादुई दुनियेत मी प्रवेश केला. मुकेशने सलीलदांच्या निर्देशनखाली ज्याप्रमाणे गायले आहे ते खरंच उल्लेखनीय आहे. अगदी ...