Skip to main content

भरधाव 'सायकल'

या सिनेमाच्या कथेत कोकणातलं लहानसं गाव, त्यातला ज्योतिषशास्त्राचे ज्ञान असणारा प्रसिद्ध केशव आणि त्याच्या आजोबांनी त्याला दिलेली प्रसिद्ध सायकल आहे. गज्या - मंग्या हो चोरांची जोडगोळी गावागावांत, घराघरातून हात मारत असताना ही सायकल चोरतात, त्याची ही गोष्ट!

केशव, हुशार आहे, सज्जन आहे, म्हणूनच गावातल्या लोकांत त्याला मान आहे. बाकी तो लोकांना मदत करण्यासाठी कासेची लंगोटी काढून देईल, पण त्याची एक कमजोरी आहे. त्याचा जीव अडकला आहे सायकलमध्ये! आजोबांनी वडिलांना डावलून ती आपल्याला दिली, आणि म्हणूनच त्यांची ज्योतिषविद्याही तिच्याद्वारे आपल्याला बहाल केली असा त्याचा वेडा समज आहे. एरवी वस्तूत अडकून पडायचं नाही हे पाळणारा, इतरांना सांगणारा केशव 'सायकल' विषयी मात्र फक्त हळवाच नाही, हट्टी आहे. प्रत्येकाचा एक weak point असतो. त्याला धक्का लागला की तो माणूस कोलमडतो, तुटून पडतो, शक्ती गमावून बसतो. तसंच केशवचं होतं. इतकं की "केशवमुळे सायकल की सायकलीमुळे केशव"असा प्रश्न पडावा. चोरांच्या (प्रियदर्शन जाधव, भाऊ कदम) आयुष्यात सायकल काय येते आणि प्रेम, आपुलकी, माणुसकी या तत्त्वांचं बळ त्यांना कळून तेही 'ईदं न मम' भावापाशी पोहोचतात. 

शेवटी छोट्या मृण्मयीला हातांनी उडणारी सायकल करून दाखवणाऱ्या केशवला आपली माणसं, त्यांचं आपल्यावरचं प्रेम, भौतिकाची नश्वरता उमजते आणि तो जणू स्वतःच मोकळ्या मनाने उडू लागतो. 

चित्रपटाचे कास्टिंग अतिशय उत्तम आहे. ह्रिषिकेश जोशी, प्रियदर्शन जाधव, भाऊ कदम या मेन कास्ट सोबतच केशवची बायको, वडील आणि सर्वात गोड म्हणजे केशवची लहान मुलगी यांचं खूप छान काम झालं आहे. गावातील इतर लोकांच्याही छोट्या छोट्या भूमिका मस्त जमल्या आहेत. तो काळ, तो प्रदेश अगदी व्यवस्थित रंगवला आहे. 

सहज साधेपणे खोल तत्वज्ञान सांगणारा असा हा सिनेमा मला वाटला. आपल्या मानासारखीच चालणारी, धावणारी, अडखळणारी, पंक्चर होणारी पुन्हा उठणारी, भरधाव धावणारी 'सायकल'. हिच्यासाठी काहीपण..


--------------------------------

Rating - 4/5

नक्की पाहा!

- रमा

Comments

Popular posts from this blog

शांतनू मॉइत्रा: बहती हवासा बावरा मन

प्रसिद्ध पार्श्वसंगीतकार, संगीतकार शांतनू मॉइत्राचा जन्म 22 जानेवारी 1968 मध्ये लखनौ इथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण (स्प्रिंगडेल स्कूल) येथे झाले. " इथे गाता गाता माझ्यातल्या संगीताला वाव मिळाला. आत्मविश्वास मिळाला " असे ते सांगतात. त्यांच्याच स्प्रिंगडेल स्कूलचे माजी विद्यार्थी सुश्मित बोस या अर्बन-लोकगीत गायककडून त्यांनी संगीताचे धडे घेतले. इकॉनॉमिक्स मध्ये डिग्री पूर्ण केल्यानंतर ते एका ऍड एजन्सी मध्ये क्लायंट सर्व्हिस एक्सिक्यूटिव्ह म्हणून रुजू झाले, आणि संगीत केवळ छंद बनून राहिला होता.  एकदा अगदी लास्ट मिनिटाला जिंगल बनवायची आहे असे प्रदीप सरकार यांनी शांतनुना सांगितले. त्यांनी ते जिंगल बनवलं. ते होतं " बोले मेरे लिप्स, आय लव्ह अंकल चिप्स ". यानंतर त्यांनी अनेक कंपनींसाठी जिंगल्स बनवले. नंतर त्यांनी त्यावेळी प्रसिद्ध अशा इंडी-पॉप अल्बम्स साठी संगीत दिले. शुभा मूदगल यांनी गायलेली " अब के सावन ऐसे बरसे " आणि '' सपना देखा है मैने "  ही त्यातली काही गाजलेली गीते. 2002 मध्ये मुंबईला शिफ्ट झाल्यानंतर त्यांना सुधीर मिश्रांच्या ...

दशक्रिया

मेलेल्या व्यक्तीचे दहन झाल्यानंतर, पुढील काही दिवस 'दशक्रिया विधी' केले जातात. असे समजतात की याने आत्म्याला शांती मिळते, जन्म-मरणाच्या चक्रातून सुटका होते आणि मोक्ष प्राप्त होतो. तिसऱ्या दिवशी राख नदीत सोडण्यापासून ते तेराव्यापर्यंत या विधी चालतात. पवित्र गंगेच्या तीरावर या विधी करतात. महाराष्ट्रातल्या पैठणला दक्षिण काशी मानतात त्यामुळे इथली गोदावरीही गंगेसारखीच पवित्र (आणि प्रदूषित) आहे. हिच्या घाटावरही हे क्रियाकर्म चालते. ब्राह्मणातील किरवंत या पोटजातीचे लोक हे विधी करतात. आणि तेच त्यांचे उपजीविकेचे साधन असते. यांना ब्राह्मणातील इतर पोटजातीहून कमी लेखले जाते. त्यांना शुभ सभारंभाला न बोलावणे, मंदिरात गंध-पूजेचा मान न देणे अशा प्रकारे अवहेलना करून केवळ मर्तिकालाच त्यांचे स्मरण होते. पण यांच्यातील काही लोकही 'दशक्रिया विधींचं' व्यावसायिकरण करून, मृत व्यक्तीच्या आधीच दुःखी-कष्टी नातेवाईकांना अमूक अमूक विधी न केल्यास आत्म्यास शांती मिळणार नाही अशी भीती घालून समाजातील इतर लोकांचे शोषण करतात. काहीजण निर्ढावून अक्षरशः आपले दुकान मांडून लोकांना गिऱ्हाईक बनवून, इतकेच नव्हे त...

"न्यूड : नग्नतेतील मुक्त कलाविष्कार"

आत्ता 'न्यूड' पाहिला. एखाद्या कथेचं चित्रात रूपांतर व्हावं आणि प्रत्येक ब्रशस्ट्रोक सोबत तयार व्हावी एक एक अप्रतिम फ्रेम आणि त्यांची एक बनावी चित्रमालिका या साऱ्यांनी बनला आहे 'न्यूड'. गावातून मुंबईला आलेली यमुना 'न्यूड मॉडेल' बनते. का? कशी? त्याचे होणारे परिणाम, पात्रांची आणि शेवटी आपलीही बदलत जाणारी विचारसरणी याची गोष्ट आहे न्यूड मध्ये.  चित्रपटाची कथा नग्नतेवर बेतली असली तरी कुठेही भडक होत नाही. अश्लीलतेचा लवलेश नाही. मॉडेल म्हणून तयार होताना आधी यमुनेची होणारी तडफड, तगमग, अगतिकता आपल्याला अस्वस्थ करून सोडते.  चित्रपटात एक मोठा कलाकार (एम.एफ.हुसेन वर बेतलेला)  मलिक (नसिरुद्दीन शाह) नायिकेचं न्यूड काढता काढता तिच्याशी आणि आपल्याशीही गप्पा मारतो. "मी घोड्यांची चित्रं काढली तर कुणाला हरकत नाही, पारव्यांची चित्र काढली कुणी बोलत नाही, मग मी माणसांची चित्रं काढली तर इतका हंगामा कशासाठी?", कलाकार 'रुह' पाहत असतो. तीच चितारत असतो.  चित्रपटाची कथा नग्नतेवर भाष्य करत असली तरी कुठेही भडकपणा नाही. काही प्रसंग अंगावर येतात पण ते त्य...