Skip to main content

होम स्वीट होम - नात्यांचं रूटीन चेकप


साठी पार जोडप्यातल्या सौ.श्यामलला (रिमा लागू),आहे तो फ्लॅट विकून टॉवरमध्ये राहायला जायचे आहे, तर श्री. विद्याधरांसाठी(मोहन जोशी)आपल्या घर म्हणजे नुसत्या भिंती नाहीत. आठवणींचा साठा आहे, आयुष्याचा असा भाग आहे की, उर्वरित आयुष्यही इथेच घालवावं अशा मताचे. त्यातून त्यांना नवं घर मिळवून, आपल्या घरासाठी स्वप्न पाहणारा देणारा एजंट (हृषीकेश जोशी) यांची ही कथा. त्यापायी होणारे रुसवे फुगवे, भौतिकाशी आपलं जडलेलं अतूट नातं, एकीकडे नव्याची आस आणि दुसरीकडे न सुटणारी जुन्याची कास आहे. या मुख्य पात्रांसोबतच विभावरी देशपांडे, स्पृहा, सुमित राघवन त्यांच्या त्यांच्या लहानशा भूमिकेत चांगले वाटतात. 

राहत्या घराचा कंटाळा येऊन दुसरं घर पाहायला गेलेले महाजन जोडपं घरी येऊन स्पृहाच्या मित्रमंडळींचा पार्टीनामक पसारा पाहतं, तेव्हा "माझ्या घरात मलाअसली थेरं चालणार नाहीत" म्हणणारी श्यामल आपल्या घराबद्दल भावुक होते.. आणि शेवटी फ्लॅट असो की टॉवर शेवटी त्यात राहणाऱ्या माणसांनी घर बनतं. म्हणजे एकीकडे तिला दुसरं चांगलं घरही हवं आहे, तर दुसरीकडे जुन्या घराची ओढही कमी होत नाही आहे. 'इच्छा आणि आवश्यकता' यात मानवी मन कसं गुरफटलेलं हेही यात दिसतं 


रिमा ताईंचा हा अखेरचा सिनेमा. त्यांचं डबिंग निर्मिती सावंत यांनी केलं आहे. काय नाही आहे या चित्रपटात? उत्तम स्टार कास्ट आहे, त्यांचा सहज अभिनय आहे, उत्तम लेखन, साधे तरी चटकदार संवाद आहेत...  हे सगळं आहे, पण कथा धड सांगता आली नाही तर हे सगळं असून काय उपयोग? त्या दोघांचीही द्विधा मनस्थिती त्यांना जाणवते इतकी आपल्याला जाणवावी इतके आपल्याला टांगून ठेवलं आहे असं उत्तरार्धात वाटायला लागतं. ९० मिनिटात आटोपता आला असता सिनेमा तर मस्त झाला असता. वैभव जोशींच्या कविता उत्तम आहेत. 'काय आहे आता इथे?' असं जेव्हा श्यामल वैतागून म्हणते, तेव्हा त्यांचा त्या घरातला संसार उलगडणाऱ्या 'कधीच न विरणारी उब असेन मी तुझी..आणि कधीच न सरणारा माझा पाऊस असशील तू...चार भिंती आणि दोन खिडक्या नाही आहे फक्त या घराला...सगळंच तर आहे इथं...' या हृदय ओळीअसोत किंवा, "हाय काय अन नाय काय" कवितेतून चित्रपट सरकत जातो काही जागी तर रेंगाळतो. पण एक क्षण असा येतो की 'बस की राव आता कविता' असा अक्षरशः मारा झालाय चित्रपटात. 

 कथा सांगणारा कधी कधी त्या कवितांच्या प्रवाहात इतका ओढला जातो की कथेचा नेमका आशयच हरवतो, तसं थोडंसं इथे झाल्याचं जाणवतं. माणसांचं एकमेकांशी नातं असतं तितकंच घराशीही असतं. घरांच्या भिंतीना कान असतात. खिडक्यांना डोळे आणि छपराला हात असतात. जुनी कपाटं, संदुका, पलंग, आरसे सगळ्यांशीच आपलं जवळचं नातं असतं. पण माणसांच्या असण्यानेच घरं जिवंत होतात. कुठे का असेनात. 

१०८ वर्षाच्या आमच्या जुन्या घराची या निमित्ताने आठवण आली आणि मन हळवं झालं.. 

चित्रपट म्हणून एकदा हा सिनेमा जरूर पाहा. या निमित्ताने नात्यांनाही रूटीन चेकपची गरज आहे असं लक्षात येईल. सिनेमागृहात आम्ही १३ जण होतो. पण निदान चित्रपट लावला तरी, हाय काय अन नाय काय!

रेटिंग- 
२.५/५

-रमा जाधव 
२८/९/२०१८

Comments

Jyoti B said…
Bas ki rao atta.. hahaha

I didn't see the movie but the helpful one

Popular posts from this blog

दशक्रिया

मेलेल्या व्यक्तीचे दहन झाल्यानंतर, पुढील काही दिवस 'दशक्रिया विधी' केले जातात. असे समजतात की याने आत्म्याला शांती मिळते, जन्म-मरणाच्या चक्रातून सुटका होते आणि मोक्ष प्राप्त होतो. तिसऱ्या दिवशी राख नदीत सोडण्यापासून ते तेराव्यापर्यंत या विधी चालतात. पवित्र गंगेच्या तीरावर या विधी करतात. महाराष्ट्रातल्या पैठणला दक्षिण काशी मानतात त्यामुळे इथली गोदावरीही गंगेसारखीच पवित्र (आणि प्रदूषित) आहे. हिच्या घाटावरही हे क्रियाकर्म चालते. ब्राह्मणातील किरवंत या पोटजातीचे लोक हे विधी करतात. आणि तेच त्यांचे उपजीविकेचे साधन असते. यांना ब्राह्मणातील इतर पोटजातीहून कमी लेखले जाते. त्यांना शुभ सभारंभाला न बोलावणे, मंदिरात गंध-पूजेचा मान न देणे अशा प्रकारे अवहेलना करून केवळ मर्तिकालाच त्यांचे स्मरण होते. पण यांच्यातील काही लोकही 'दशक्रिया विधींचं' व्यावसायिकरण करून, मृत व्यक्तीच्या आधीच दुःखी-कष्टी नातेवाईकांना अमूक अमूक विधी न केल्यास आत्म्यास शांती मिळणार नाही अशी भीती घालून समाजातील इतर लोकांचे शोषण करतात. काहीजण निर्ढावून अक्षरशः आपले दुकान मांडून लोकांना गिऱ्हाईक बनवून, इतकेच नव्हे त...

शांतनू मॉइत्रा: बहती हवासा बावरा मन

प्रसिद्ध पार्श्वसंगीतकार, संगीतकार शांतनू मॉइत्राचा जन्म 22 जानेवारी 1968 मध्ये लखनौ इथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण (स्प्रिंगडेल स्कूल) येथे झाले. " इथे गाता गाता माझ्यातल्या संगीताला वाव मिळाला. आत्मविश्वास मिळाला " असे ते सांगतात. त्यांच्याच स्प्रिंगडेल स्कूलचे माजी विद्यार्थी सुश्मित बोस या अर्बन-लोकगीत गायककडून त्यांनी संगीताचे धडे घेतले. इकॉनॉमिक्स मध्ये डिग्री पूर्ण केल्यानंतर ते एका ऍड एजन्सी मध्ये क्लायंट सर्व्हिस एक्सिक्यूटिव्ह म्हणून रुजू झाले, आणि संगीत केवळ छंद बनून राहिला होता.  एकदा अगदी लास्ट मिनिटाला जिंगल बनवायची आहे असे प्रदीप सरकार यांनी शांतनुना सांगितले. त्यांनी ते जिंगल बनवलं. ते होतं " बोले मेरे लिप्स, आय लव्ह अंकल चिप्स ". यानंतर त्यांनी अनेक कंपनींसाठी जिंगल्स बनवले. नंतर त्यांनी त्यावेळी प्रसिद्ध अशा इंडी-पॉप अल्बम्स साठी संगीत दिले. शुभा मूदगल यांनी गायलेली " अब के सावन ऐसे बरसे " आणि '' सपना देखा है मैने "  ही त्यातली काही गाजलेली गीते. 2002 मध्ये मुंबईला शिफ्ट झाल्यानंतर त्यांना सुधीर मिश्रांच्या ...

"न्यूड : नग्नतेतील मुक्त कलाविष्कार"

आत्ता 'न्यूड' पाहिला. एखाद्या कथेचं चित्रात रूपांतर व्हावं आणि प्रत्येक ब्रशस्ट्रोक सोबत तयार व्हावी एक एक अप्रतिम फ्रेम आणि त्यांची एक बनावी चित्रमालिका या साऱ्यांनी बनला आहे 'न्यूड'. गावातून मुंबईला आलेली यमुना 'न्यूड मॉडेल' बनते. का? कशी? त्याचे होणारे परिणाम, पात्रांची आणि शेवटी आपलीही बदलत जाणारी विचारसरणी याची गोष्ट आहे न्यूड मध्ये.  चित्रपटाची कथा नग्नतेवर बेतली असली तरी कुठेही भडक होत नाही. अश्लीलतेचा लवलेश नाही. मॉडेल म्हणून तयार होताना आधी यमुनेची होणारी तडफड, तगमग, अगतिकता आपल्याला अस्वस्थ करून सोडते.  चित्रपटात एक मोठा कलाकार (एम.एफ.हुसेन वर बेतलेला)  मलिक (नसिरुद्दीन शाह) नायिकेचं न्यूड काढता काढता तिच्याशी आणि आपल्याशीही गप्पा मारतो. "मी घोड्यांची चित्रं काढली तर कुणाला हरकत नाही, पारव्यांची चित्र काढली कुणी बोलत नाही, मग मी माणसांची चित्रं काढली तर इतका हंगामा कशासाठी?", कलाकार 'रुह' पाहत असतो. तीच चितारत असतो.  चित्रपटाची कथा नग्नतेवर भाष्य करत असली तरी कुठेही भडकपणा नाही. काही प्रसंग अंगावर येतात पण ते त्य...