Skip to main content

कासव- माझ्या नजरेतून

सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपटासाठी दिल्या जाणार्‍या सुवर्णकमळासह अनेक राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवांत पारितोषिक पटकावणारा 'कासव' मी आज पाहून आले. माझे आवडते दिग्दर्शकद्वयी सुमित्रा भावे, सुनील सुकथनकार यांची अजून एक अप्रतिम कलाकृती.
गेले काही दिवस मी पाहत असलेले चित्रपट हे खास 'माझ्यासाठी' बनवलेले आहेत, असं मला वाटतंय. त्यातला आशय, विषय, रचना, घटना हे माझ्याशी संबंधित असल्यासारखंच वाटतंय. (काही दिवसांपूर्वी 'बापजन्म' आणि आज 'कासव'), इतके की काही घटना आणि संवाद माझे आणि माझ्या आसपासचे असावेत असं वाटतंय. केवळ माझ्या मनात हा पाहून काय आलं, तेवढं लिहितेय नेहमीसारखं. 'नैराश्य' ही एकच थीम नाही या चित्रपटाची. माणूस हा समाजशील प्राणी आहे. आणि तरीही त्याला कधी कधी एकटेपणा हवासा वाटायला लागतो आणि या दोन परस्पर विरोधी प्रकृतीचा समतोल साधणं, हेच त्याचं जीवन आहे. कासवांसारखं तो कवचात जाऊन जगापासून स्वतःला फार काळ वेगळं ठेऊ शकत नाही. पण दुःख आत ओढून घेऊन बाह्य जगाला सामना करणं मात्र तो शिकतो.या समुद्री कासवांचं जीवनचक्र अगदी नवल वाटावं असं.. कायम समुद्रात असणारी कासवीण अंडी घालण्यासाठी मात्र किनाऱ्यावर येऊन खड्डा करून त्यात अंडी घालते. पण पिल्लं अंड्यातून बाहेर यायच्या आधीच ती परत पाण्यात निघूनही जाते. नुकतीच जन्माला आलेली पिल्ले एकमेकांसोबत आणि तरी एकेकटी समुद्राकडे जायला निघतात. शेवटी त्यांना समुद्रात जावंच लागतं. असुरक्षित वाटलं की कासव अंग आकसून आपल्या कवचात घुसून बसतं. पण पुन्हा समुद्राचा सामना करण्यासाठी, आयुष्याला भिडण्यासाठी त्या कवचातून, शेलमधून बाहेर पडावं लागतं प्रत्येकाला.
"घेई ओढुनी सर्वत्र विषयातुनी इंद्रिये जसा कासव तो अंगे तेव्हा प्रज्ञा स्थिरावली''
गीताईतलं हे वचन दत्ताभाऊंच्या तोंडून ऐकताना आपण एक जीवन विषयक पायरीच जणू चढतो. निसर्गाच्या चक्रासारखं हे माणसांचेही एक चक्र आहे. नैराश्याशी झगडत त्यातून उभी राहणारी 'स्व' शोधणारी जानकी, नैराश्यात गुरफटलेला तरुण मुलगा, नैराश्य म्हणजे रिकामटेकड्यांचा उद्योग असे समजणाऱ्या सर्वसामान्यांचं प्रतिनिधीत्व करणारा यदु, एक अभ्यासक दत्ताभाऊ अशा पात्ररचनांशी कासवांचा संबंध काय? एक रूपक आहे. 'अस्तु' मध्ये जसा हत्ती होता ना तसंच. पण ते पडद्यावरच पहा. काय आणि कोणते प्रसंग सांगायचे म्हंटलं तर पूर्ण चित्रपटच उलगडला असं होईल. सर्वच कलाकारांचा सर्वांगसुंदर अभिनय, सुंदर पार्श्वसंगीत, लोकगीतांची चुणूक असलेली साधीच पण मनाला स्पर्शणारी गाणी.'लहर समंदर रे' गाण्याची रचनाच कल्पक आणि सुरेख आहे. असं लाटेला लाट येऊन मिळावी तसं वाटतं आणि कमाल सिनेमॅटोग्राफी..काय सुंदर टिपलाय निसर्ग, त्याची विविध अंग, समुद्राच्या तरंगांच्या इतकी वेगवेगळी चित्रे.. खूप सुंदर.. वेगवेगळ्या दाखल्यातून, संवादातून उभी राहणारी ही गोष्ट एक वैचारिक माहितीपट नाहीये. हा चित्रपट आपल्याला खूप काही देऊन जातो. महत्त्व आधाराचं, स्वीकाराचं, दातृत्वाचं आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे मातृत्वाचं. आवर्जून पहावा.


- रमा जाधव

Comments

Popular posts from this blog

दशक्रिया

मेलेल्या व्यक्तीचे दहन झाल्यानंतर, पुढील काही दिवस 'दशक्रिया विधी' केले जातात. असे समजतात की याने आत्म्याला शांती मिळते, जन्म-मरणाच्या चक्रातून सुटका होते आणि मोक्ष प्राप्त होतो. तिसऱ्या दिवशी राख नदीत सोडण्यापासून ते तेराव्यापर्यंत या विधी चालतात. पवित्र गंगेच्या तीरावर या विधी करतात. महाराष्ट्रातल्या पैठणला दक्षिण काशी मानतात त्यामुळे इथली गोदावरीही गंगेसारखीच पवित्र (आणि प्रदूषित) आहे. हिच्या घाटावरही हे क्रियाकर्म चालते. ब्राह्मणातील किरवंत या पोटजातीचे लोक हे विधी करतात. आणि तेच त्यांचे उपजीविकेचे साधन असते. यांना ब्राह्मणातील इतर पोटजातीहून कमी लेखले जाते. त्यांना शुभ सभारंभाला न बोलावणे, मंदिरात गंध-पूजेचा मान न देणे अशा प्रकारे अवहेलना करून केवळ मर्तिकालाच त्यांचे स्मरण होते. पण यांच्यातील काही लोकही 'दशक्रिया विधींचं' व्यावसायिकरण करून, मृत व्यक्तीच्या आधीच दुःखी-कष्टी नातेवाईकांना अमूक अमूक विधी न केल्यास आत्म्यास शांती मिळणार नाही अशी भीती घालून समाजातील इतर लोकांचे शोषण करतात. काहीजण निर्ढावून अक्षरशः आपले दुकान मांडून लोकांना गिऱ्हाईक बनवून, इतकेच नव्हे त...

शांतनू मॉइत्रा: बहती हवासा बावरा मन

प्रसिद्ध पार्श्वसंगीतकार, संगीतकार शांतनू मॉइत्राचा जन्म 22 जानेवारी 1968 मध्ये लखनौ इथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण (स्प्रिंगडेल स्कूल) येथे झाले. " इथे गाता गाता माझ्यातल्या संगीताला वाव मिळाला. आत्मविश्वास मिळाला " असे ते सांगतात. त्यांच्याच स्प्रिंगडेल स्कूलचे माजी विद्यार्थी सुश्मित बोस या अर्बन-लोकगीत गायककडून त्यांनी संगीताचे धडे घेतले. इकॉनॉमिक्स मध्ये डिग्री पूर्ण केल्यानंतर ते एका ऍड एजन्सी मध्ये क्लायंट सर्व्हिस एक्सिक्यूटिव्ह म्हणून रुजू झाले, आणि संगीत केवळ छंद बनून राहिला होता.  एकदा अगदी लास्ट मिनिटाला जिंगल बनवायची आहे असे प्रदीप सरकार यांनी शांतनुना सांगितले. त्यांनी ते जिंगल बनवलं. ते होतं " बोले मेरे लिप्स, आय लव्ह अंकल चिप्स ". यानंतर त्यांनी अनेक कंपनींसाठी जिंगल्स बनवले. नंतर त्यांनी त्यावेळी प्रसिद्ध अशा इंडी-पॉप अल्बम्स साठी संगीत दिले. शुभा मूदगल यांनी गायलेली " अब के सावन ऐसे बरसे " आणि '' सपना देखा है मैने "  ही त्यातली काही गाजलेली गीते. 2002 मध्ये मुंबईला शिफ्ट झाल्यानंतर त्यांना सुधीर मिश्रांच्या ...

"न्यूड : नग्नतेतील मुक्त कलाविष्कार"

आत्ता 'न्यूड' पाहिला. एखाद्या कथेचं चित्रात रूपांतर व्हावं आणि प्रत्येक ब्रशस्ट्रोक सोबत तयार व्हावी एक एक अप्रतिम फ्रेम आणि त्यांची एक बनावी चित्रमालिका या साऱ्यांनी बनला आहे 'न्यूड'. गावातून मुंबईला आलेली यमुना 'न्यूड मॉडेल' बनते. का? कशी? त्याचे होणारे परिणाम, पात्रांची आणि शेवटी आपलीही बदलत जाणारी विचारसरणी याची गोष्ट आहे न्यूड मध्ये.  चित्रपटाची कथा नग्नतेवर बेतली असली तरी कुठेही भडक होत नाही. अश्लीलतेचा लवलेश नाही. मॉडेल म्हणून तयार होताना आधी यमुनेची होणारी तडफड, तगमग, अगतिकता आपल्याला अस्वस्थ करून सोडते.  चित्रपटात एक मोठा कलाकार (एम.एफ.हुसेन वर बेतलेला)  मलिक (नसिरुद्दीन शाह) नायिकेचं न्यूड काढता काढता तिच्याशी आणि आपल्याशीही गप्पा मारतो. "मी घोड्यांची चित्रं काढली तर कुणाला हरकत नाही, पारव्यांची चित्र काढली कुणी बोलत नाही, मग मी माणसांची चित्रं काढली तर इतका हंगामा कशासाठी?", कलाकार 'रुह' पाहत असतो. तीच चितारत असतो.  चित्रपटाची कथा नग्नतेवर भाष्य करत असली तरी कुठेही भडकपणा नाही. काही प्रसंग अंगावर येतात पण ते त्य...