Skip to main content

अपूर्व प्रकाशवाटा

आज एका अलौकिक, कल्पनातीत कलाकृतीचा आस्वाद घ्यायला मिळाला. महाकवी, कविकुलगुरू कालिदास यांची महान कलाकृती 'मेघदूत' आजवर अनेकांनी बसवलेली आहे, पण आजचा प्रयोग नावाप्रमाणेच 'अपूर्व मेघदूत' होता. एक अद्भुत नाट्यप्रयोग. द्रुष्टीक्षीणतेपासून, दृष्टिहीनतेपर्यंत अंधत्त्वाचे भिन्न प्रकार असलेले १९ प्रतिभाशाली अंध कलाकारांनी सादर केलेला नाट्यप्रयोग. गणेश दिघे यांचे लेखन असलेले हे दोन अंकी नाटक बसवले होते स्वागत थोरात यांनी. त्यांच्या बद्दल वेगळ्यानेच लिहायला हवे. पण कोल्हापुरात 'रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर, मिड टाऊन' आणि 'सावी फाउंडेशन' यांनी हा प्रयोग घडवून आणला होता.

प्रत्येक माणसाला व्यक्त व्हायचं असतं, त्यासाठी प्रत्येकजण वेगवेगळी अभिव्यक्ती साधने निवडतो. तशीच ही अंध मंडळी. यांना नाटकाद्वारे आपली कला सादर करायची होती. महाराष्ट्राच्या विविध भागातून शिक्षण, नोकरी, व्यवसायासाठी पुण्यात असलेल्या अशा या मुलांना एकत्र घेऊन हे नाटक बसवलं गेलं आहे. आपापली कामे, शिक्षण सांभाळत ही मुले नाटक करत आहेत. आणि नाटक करताना त्यांच्या व्यक्तिमत्त्वात बदल घडून आले आहेत असे ते सांगतात. मेघदूतासारखे नाटक म्हणजे शिवधनुष्य, पण या मुलांनी ते लीलया पेललं आहे. खरंतर आधी सांगितले नसते तर त्यांना दिसत नाही किंवा कमी दिसते हे पटलेच नसते. नाटकातले संवाद पाठ करणे असो, नृत्य असो, स्टेजचे भान ठेऊन सादरीकरण असो या सगळ्यात त्यांची मेहनत पुरेपूर जाणवत होती. प्रकाशयोजना, संगीतही अगदी सुरेख होते. यक्ष आणि त्याची प्रिय विरहणीचे छाया नृत्य अत्यंत वाखाणण्याजोगे होते. सारीच नृत्ये खूप मनोहारी होती. 

नाटक हे केवळ दृक्श्राव्य माध्यमापुरते मर्यादित नसून 'अनुभवणं' आहे हे या प्रयोगातून अधोरेखित झाले. "दिव्यांग आहोत म्हणून सहानुभूती नको तर आमच्या गुणांवर, कर्तृत्वावर आम्हाला जोखा. आणि समान वागणूक द्या." असे सांगण्याचा या सर्व कलाकारांचा प्रयत्न होता. आणि खरेच धकाधकीच्या जीवनातून वेळ काढून हे नाटक करण्याची इच्छाशक्ती पाहता, कष्ट पाहता हे सारे प्रशंसेच्याही खरोखरीच पलीकडचे आहे. आपण सादर करणारी कलाकृती आपण पाहू शकत नाही, पण एक चांगली कलाकृती आपण सादर करतो आहोत याचा आनंद प्रत्येक कलाकाराच्या चेहऱ्यावर होता.


नाटकाचे लेखक, निर्माते यांच्या सोबत दिग्दर्शक स्वागत थोरात यांचे काम खूप मोठे आहे.जे ‘ब्रेल मॅन ऑफ इंडिया’ या नावाने सर्वपरिचित आहेत. गेली २५ वर्ष ते अंधांसाठी काम करत आहेत. ब्रेल नियतकालिक काढण्यापासून, डॉक्युमेंटरी बनवणे ते विविध कलाविष्कारांचा नेत्रहीन कसा आनंद घेऊ शकतील त्या गोष्टींचा पाठपुरावा करणे यासाठी ते झटत असतात. या सगळ्यापाठीमागची निस्वार्थ मेहनत त्यांच्या बोलण्यातून दिसून येत होती. आपली मुले वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत स्वावलंबी जीवन जगतात हे सांगताना हळवे झाले. त्यातून त्यांचे कलाकृतीशी आणि कलाकारांशी जडलेले निस्सीम बंध दिसून येत होते. या मुलांना दृष्टी नसली तरी दृष्टिकोन आहे, आणि तोच किती महत्त्वाचा आहे हे त्यांनी सांगितलं.

ही मुले केवळ नेत्रहीन आहेत म्हणून हे नाटक पाहावे असे नाही, या मुलांनी हे नाटक 'पाहण्याजोगे' केलेलेच आहे. माझे सौभाग्यच की अशी दुर्दम्य इच्छाशक्ती आणि कष्टाळू माणसं मला पावलोपावली भेटत आहेत. आज मला या प्रज्ञाचक्षूंनी एक नजर दिली आहे. प्रकाशवाटा पाहण्याची. अपूर्व प्रकाशवाटा.

- रमा

Comments

Popular posts from this blog

शांतनू मॉइत्रा: बहती हवासा बावरा मन

प्रसिद्ध पार्श्वसंगीतकार, संगीतकार शांतनू मॉइत्राचा जन्म 22 जानेवारी 1968 मध्ये लखनौ इथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण (स्प्रिंगडेल स्कूल) येथे झाले. " इथे गाता गाता माझ्यातल्या संगीताला वाव मिळाला. आत्मविश्वास मिळाला " असे ते सांगतात. त्यांच्याच स्प्रिंगडेल स्कूलचे माजी विद्यार्थी सुश्मित बोस या अर्बन-लोकगीत गायककडून त्यांनी संगीताचे धडे घेतले. इकॉनॉमिक्स मध्ये डिग्री पूर्ण केल्यानंतर ते एका ऍड एजन्सी मध्ये क्लायंट सर्व्हिस एक्सिक्यूटिव्ह म्हणून रुजू झाले, आणि संगीत केवळ छंद बनून राहिला होता.  एकदा अगदी लास्ट मिनिटाला जिंगल बनवायची आहे असे प्रदीप सरकार यांनी शांतनुना सांगितले. त्यांनी ते जिंगल बनवलं. ते होतं " बोले मेरे लिप्स, आय लव्ह अंकल चिप्स ". यानंतर त्यांनी अनेक कंपनींसाठी जिंगल्स बनवले. नंतर त्यांनी त्यावेळी प्रसिद्ध अशा इंडी-पॉप अल्बम्स साठी संगीत दिले. शुभा मूदगल यांनी गायलेली " अब के सावन ऐसे बरसे " आणि '' सपना देखा है मैने "  ही त्यातली काही गाजलेली गीते. 2002 मध्ये मुंबईला शिफ्ट झाल्यानंतर त्यांना सुधीर मिश्रांच्या ...

दशक्रिया

मेलेल्या व्यक्तीचे दहन झाल्यानंतर, पुढील काही दिवस 'दशक्रिया विधी' केले जातात. असे समजतात की याने आत्म्याला शांती मिळते, जन्म-मरणाच्या चक्रातून सुटका होते आणि मोक्ष प्राप्त होतो. तिसऱ्या दिवशी राख नदीत सोडण्यापासून ते तेराव्यापर्यंत या विधी चालतात. पवित्र गंगेच्या तीरावर या विधी करतात. महाराष्ट्रातल्या पैठणला दक्षिण काशी मानतात त्यामुळे इथली गोदावरीही गंगेसारखीच पवित्र (आणि प्रदूषित) आहे. हिच्या घाटावरही हे क्रियाकर्म चालते. ब्राह्मणातील किरवंत या पोटजातीचे लोक हे विधी करतात. आणि तेच त्यांचे उपजीविकेचे साधन असते. यांना ब्राह्मणातील इतर पोटजातीहून कमी लेखले जाते. त्यांना शुभ सभारंभाला न बोलावणे, मंदिरात गंध-पूजेचा मान न देणे अशा प्रकारे अवहेलना करून केवळ मर्तिकालाच त्यांचे स्मरण होते. पण यांच्यातील काही लोकही 'दशक्रिया विधींचं' व्यावसायिकरण करून, मृत व्यक्तीच्या आधीच दुःखी-कष्टी नातेवाईकांना अमूक अमूक विधी न केल्यास आत्म्यास शांती मिळणार नाही अशी भीती घालून समाजातील इतर लोकांचे शोषण करतात. काहीजण निर्ढावून अक्षरशः आपले दुकान मांडून लोकांना गिऱ्हाईक बनवून, इतकेच नव्हे त...

"न्यूड : नग्नतेतील मुक्त कलाविष्कार"

आत्ता 'न्यूड' पाहिला. एखाद्या कथेचं चित्रात रूपांतर व्हावं आणि प्रत्येक ब्रशस्ट्रोक सोबत तयार व्हावी एक एक अप्रतिम फ्रेम आणि त्यांची एक बनावी चित्रमालिका या साऱ्यांनी बनला आहे 'न्यूड'. गावातून मुंबईला आलेली यमुना 'न्यूड मॉडेल' बनते. का? कशी? त्याचे होणारे परिणाम, पात्रांची आणि शेवटी आपलीही बदलत जाणारी विचारसरणी याची गोष्ट आहे न्यूड मध्ये.  चित्रपटाची कथा नग्नतेवर बेतली असली तरी कुठेही भडक होत नाही. अश्लीलतेचा लवलेश नाही. मॉडेल म्हणून तयार होताना आधी यमुनेची होणारी तडफड, तगमग, अगतिकता आपल्याला अस्वस्थ करून सोडते.  चित्रपटात एक मोठा कलाकार (एम.एफ.हुसेन वर बेतलेला)  मलिक (नसिरुद्दीन शाह) नायिकेचं न्यूड काढता काढता तिच्याशी आणि आपल्याशीही गप्पा मारतो. "मी घोड्यांची चित्रं काढली तर कुणाला हरकत नाही, पारव्यांची चित्र काढली कुणी बोलत नाही, मग मी माणसांची चित्रं काढली तर इतका हंगामा कशासाठी?", कलाकार 'रुह' पाहत असतो. तीच चितारत असतो.  चित्रपटाची कथा नग्नतेवर भाष्य करत असली तरी कुठेही भडकपणा नाही. काही प्रसंग अंगावर येतात पण ते त्य...