Skip to main content

प्रिय सावित्री


प्रिय सावित्री, 

अज्ञान, कर्मकांड, वर्णभेद, जात-पात, बालविवाह, केशवपन,सतीप्रथा या कुप्रथांनी आणि समाजव्यवस्थेत पिचल्या जाणार्‍या बाईला, पुरुषाच्या आधाराशिवायही तिचं काही अस्तित्व आहे, हे तुझ्याकडे बघून वाटलं बघ..स्त्रिया आणि दलित यांच्या सामाजिक स्वातंत्र्यासाठी नवे कार्य तू सुरु केलेस. या सामाजिक परीवर्तनाच्या लढाईत आयुष्याची पन्नासहून अधिक वर्षे खर्च केलीस..अनेक आघात, छळ सहन करून विवाहोत्तर शिक्षण घेतलेस..देशाची पहिली महिला शिक्षिका तू, तू स्त्रियांना फक्त शिक्षण नाही ज्ञान दिलेस..असंख्य स्त्रियांना प्रेरणा देऊन शिक्षणक्षेत्रात आणलेस, तुझ्या वाड्यातली विहीर दलितांना खुली करून दिलीस, बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केलीस, शोषण आणि असमानता या विरोधात अनेक विवेकनिष्ठ चळवळींचा पाया रचलास. सत्यशोधनाचा आग्रह धरलास..आज तुझ्या स्मृतीदिनी  मला सांग, एकोणीसाव्या शतकात, अस्पृश्यता, सतीप्रथा, वर्ण, लिंग,वंश, धर्म यांच्या आधारवर समाजात विषमता पोसणार्‍या समाजव्यवस्थेला छेद देणारी तू..कुठून आली तुझ्यात ही शक्ती?"ढोल, गवार, शुद्र, पशू, नारी, ये सब ताडन के अधिकारी" असे बेलाशक समजणार्‍या या संस्कृतीला तू आव्हान दिले तरी कसे? शोषितांच्या उद्धाराला स्वतःला वाहून घेतलेल्या त्या जोतीरावाची तू ज्योत, केवळ अर्धांगिनी नाही, तर पूर्णपणे त्यांच्या कार्याला साथ देण्याची प्रेरणा तुझ्यात आली कुठून? आज निव्वळ तुझ्यामुळे हे विचार शब्दरुपात मांडण्याचे सामर्थ्य आणि सवलत माझ्यासारख्या भारतीय स्त्रियांमध्ये आहे. आजही गर्भातच स्त्रीला संपवणार्‍या या समाजाशी लढायचे बळ मला दे, आत्मसन्मानाने जगण्याचे भान दे, समाजाचे ॠण फेडायचे मार्ग दे..


कोटी प्रणाम तुला..

तुझी,एक सावित्री


----------------------------------------------------------------------------------------------------------------


प्रिय सावित्री,

कुठल्याशा क्षुल्लक कारणावरून नवर्याने हात उगारला आज माझ्यावर. "हीच मुक्ती अपेक्षित होती का? हाच विकास व्हावा म्हणून आयुष्यभर झटलीस तू? आमच्या उद्धारासाठी परत तूच का येत नाहीस जन्माला??" या सगळ्या विचारांनी अगदी खिन्न झालं माझं मन..पण मग म्हंटलं हे शोषण आपण डिसर्व करत नाही निदान इतका तरी दृष्टीकोन बदलला माझा. शिक्षणाने अनेक पर्यायी मार्ग आज माझ्यासमोर उपलब्ध आहेत. हे ही नसे थोडके..कुणी दुसरे माझ्या मदतीला यावे यापेक्षा मीच स्वतःला मदत करावी हा संदेश नकळत तुझ्या आठवणीतून माझ्यापर्यंत पोहोचला.. 


तुझी,
आणखी एक सावित्री

Comments

Popular posts from this blog

दशक्रिया

मेलेल्या व्यक्तीचे दहन झाल्यानंतर, पुढील काही दिवस 'दशक्रिया विधी' केले जातात. असे समजतात की याने आत्म्याला शांती मिळते, जन्म-मरणाच्या चक्रातून सुटका होते आणि मोक्ष प्राप्त होतो. तिसऱ्या दिवशी राख नदीत सोडण्यापासून ते तेराव्यापर्यंत या विधी चालतात. पवित्र गंगेच्या तीरावर या विधी करतात. महाराष्ट्रातल्या पैठणला दक्षिण काशी मानतात त्यामुळे इथली गोदावरीही गंगेसारखीच पवित्र (आणि प्रदूषित) आहे. हिच्या घाटावरही हे क्रियाकर्म चालते. ब्राह्मणातील किरवंत या पोटजातीचे लोक हे विधी करतात. आणि तेच त्यांचे उपजीविकेचे साधन असते. यांना ब्राह्मणातील इतर पोटजातीहून कमी लेखले जाते. त्यांना शुभ सभारंभाला न बोलावणे, मंदिरात गंध-पूजेचा मान न देणे अशा प्रकारे अवहेलना करून केवळ मर्तिकालाच त्यांचे स्मरण होते. पण यांच्यातील काही लोकही 'दशक्रिया विधींचं' व्यावसायिकरण करून, मृत व्यक्तीच्या आधीच दुःखी-कष्टी नातेवाईकांना अमूक अमूक विधी न केल्यास आत्म्यास शांती मिळणार नाही अशी भीती घालून समाजातील इतर लोकांचे शोषण करतात. काहीजण निर्ढावून अक्षरशः आपले दुकान मांडून लोकांना गिऱ्हाईक बनवून, इतकेच नव्हे त

गीताई आणि आई

"आई आम्हाला ना गीताई शिकवत आहेत त्या नवीन मॅडम. तू मला आणि दादूला म्हणायला लावायचीस बघ. ते आत्ता शाळेत म्हणायला आहे." "अरे वा! अगं पिकू, अजूनही सांगतेच की मी, की करा पाठ, म्हणा, शिकवलेली स्तोत्रं, रामरक्षा, मनाचे श्लोक, अथर्वशीर्ष. पण वेळच नसतो तुम्हाला. आमच्या लहानपणी..असो.. "ए दादू, ये इकडे. बघ बघ. ते बघ आई परत स्वतःशी पुटपुटायला लागली" "काय विषय काय आहे?" - दादू "दादू, पिकू या असे समोर बरं" "आई मला अभ्यास आहे आणि दादूला टेनिस ला जायचंय म्हणतोय. हो ना रे?" "2 मिनिट थांब दादू. या दोघे समोर. खूप दिवस माझ्या मनात होतं हे, आणि त्यामागे काही कारणेही आहेत.  तुम्ही शांतपणे अर्धा तास तरी यासाठी देऊच शकता ना, टीव्ही आणि कॉम्प्युटर बंद करून? मग नंतर जा खेळायला आणि अभ्यासाला. कारण तेही महत्वाचं आहेच." " अगं आम्हाला 0 काही कळत नाही आणि कशाला उगाच म्हणायचं? आम्हाला कंटाळा येतो." "तुम्हाला माहीत आहे, हे सारं आम्ही का म्हणायला सांगतो? यामागे काही धार्मिक कारणं नाहीयेत. तुमचं पाठां

चारचौघी

परवा चारचौघी बघून आले. शो हाऊसफुल्ल होता. टिकीट्स मिळत नव्हती, पण राजसीमुळे मिळाली आणि I am greatfull की तिच्यामुळे इतकी सुंदर कलाकृती बघायला मिळाली. चारचौघी बघून आले आणि डोक्यात चक्रीवादळाने थैमान घातलं. ३१ वर्षानंतर हे नाटक पुन्हा एकदा रंगमंचावर आलं आणि तरीही ते तितकंच रीलेटिव्ह वाटतं, आणि एकंदर आपली समाजव्यवस्था पाहता ते अजून अनेक दशकं ते तितकंच रीलेटीव्ह वाटत राहील. प्रशांत दळवीने, एका पुरुषानी बाईपणाचे कंगोरे इतक्या बारकाईने मांडणं, आणि त्यांच्या मनातील तुफानाचा ठाव घेणं is really commendable. संहितेला योग्य न्याय दिला आहे त्यांनी. काळाच्या कितीतरी पुढचं आहे हे लिखाण असं म्हणावं तर यातील शब्दन शब्द असंख्य बायकांच्या मनाला स्पर्शून गेलेल्या असतो. काळ कुठलाही असो मग. चंद्रकांत कुलकर्णी यांचं कौतुक करावं तितकं कमीच आहे, त्यांनी संहितेला खराखुरा न्याय मिळवून दिला आहे. कास्टिंग अफलातून झालं आहे. यातले सारेच कलाकार खूप ताकदीचे आहेत. या चारचौघींचे भिन्न भिन्न प्रश्न आहेत. सगळ्या सक्षम, सुशिक्षित, सुजाण आहेत. आपल्या पायावर स्वाभिमानाने उभ्या आहेत. या सगळ्याच स्त्रिया त्यांच्या त्यांच्या आ