Skip to main content

Posts

Showing posts from October, 2017

अपूर्व प्रकाशवाटा

आज एका अलौकिक, कल्पनातीत कलाकृतीचा आस्वाद घ्यायला मिळाला. महाकवी, कविकुलगुरू कालिदास यांची महान कलाकृती 'मेघदूत' आजवर अनेकांनी बसवलेली आहे, पण आजचा प्रयोग नावाप्रमाणेच 'अपूर्व मेघदूत' होता. एक अद्भुत नाट्यप्रयोग. द्रुष्टीक्षीणतेपासून, दृष्टिहीनतेपर्यंत अंधत्त्वाचे भिन्न प्रकार असलेले १९ प्रतिभाशाली अंध कलाकारांनी सादर केलेला नाट्यप्रयोग. गणेश दिघे यांचे लेखन असलेले हे दोन अंकी नाटक बसवले होते स्वागत थोरात यांनी. त्यांच्या बद्दल वेगळ्यानेच लिहायला हवे. पण कोल्हापुरात  'रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर, मिड टाऊन' आणि 'सावी फाउंडेशन' यांनी हा प्रयोग घडवून आणला होता. प्रत्येक माणसाला व्यक्त व्हायचं असतं, त्यासाठी प्रत्येकजण वेगवेगळी अभिव्यक्ती साधने निवडतो. तशीच ही अंध मंडळी. यांना नाटकाद्वारे आपली कला सादर करायची होती. महाराष्ट्राच्या विविध भागातून शिक्षण, नोकरी, व्यवसायासाठी पुण्यात असलेल्या अशा या मुलांना एकत्र घेऊन हे नाटक बसवलं गेलं आहे. आपापली कामे, शिक्षण सांभाळत ही मुले नाटक करत आहेत. आणि नाटक करताना त्यांच्या व्यक्तिमत्त्वात बदल घडून आले आहेत असे ते

कासव- माझ्या नजरेतून

सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपटासाठी दिल्या जाणार्‍या सुवर्णकमळासह अनेक राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवांत पारितोषिक पटकावणारा 'कासव' मी आज पाहून आले. माझे आवडते दिग्दर्शकद्वयी सुमित्रा भावे, सुनील सुकथनकार यांची अजून एक अप्रतिम कलाकृती. गेले काही दिवस मी पाहत असलेले चित्रपट हे खास 'माझ्यासाठी' बनवलेले आहेत, असं मला वाटतंय. त्यातला आशय, विषय, रचना, घटना हे माझ्याशी संबंधित असल्यासारखंच वाटतंय. (काही दिवसांपूर्वी 'बापजन्म' आणि आज 'कासव'), इतके की काही घटना आणि संवाद माझे आणि माझ्या आसपासचे असावेत असं वाटतंय. केवळ माझ्या मनात हा पाहून काय आलं, तेवढं लिहितेय नेहमीसारखं. 'नैराश्य' ही एकच थीम नाही या चित्रपटाची. माणूस हा समाजशील प्राणी आहे. आणि तरीही त्याला कधी कधी एकटेपणा हवासा वाटायला लागतो आणि या दोन परस्पर विरोधी प्रकृतीचा समतोल साधणं, हेच त्याचं जीवन आहे. कासवांसारखं तो कवचात जाऊन जगापासून स्वतःला फार काळ वेगळं ठेऊ शकत नाही. पण दुःख आत ओढून घेऊन बाह्य जगाला सामना करणं मात्र तो शिकतो.या समुद्री कासवांचं जीवनचक्र अगदी नवल वाटावं असं..

रॉबिन्स वाली दिवाळी

अलीकडेच पिकलपोनीला अन्नाचं महत्त्व कळालं होतं, आणि ती अन्न अजिबात वाया घालवत नव्हती. ही भाजी नको, ती भाजी नको असली नाटकं आता एकदम बंद झाली होती. तरीसुद्धा त्या दिवशी उपाशी माणसांचं बघितलेलं ते दृश्य तिच्या डोळ्यांसमोर अजून काही हलत नव्हतं. कितीतरी लोक अजून अन्नापासून वंचित आहेत, रोजच्या रोज त्यांच्यावर उपासमारीची वेळ येते हे किती वाईट्ट आहे हे तिच्या मनातून जायला तयार नव्हतं. तोच एकदवस दादुची मैत्रीण नूपुर घरी आली. नूपुर ताई पिकलपोनीची खूप आवडती होती. नवीन नवीन गोष्टी सांगायची, खूप वेगवेगळ्या गोष्टी करायची, एकदम तरतरीत आणि ऍक्टिव्ह. एके दिवशी ती आली एक ग्रीन टी-शर्ट घालून. त्यावर लिहिलेलं 'रॉबिनहूड आर्मी'. आत जाऊन दादा कपडे बदलून आला तर त्याने पण तसाच शर्ट घातला होता. आता पिकलपोनीला मोठीच उत्सुकता लागून राहिली. "नूपुर ताई, हे काय आहे? युनिफॉर्म आहे का? तुम्ही काय करणार आहात? रॉबिनहूड आर्मी म्हणजे काय? रॉबिन हूड म्हणजे तो गोष्टीतला का?" तिने प्रश्नांचा एकदम भडीमार सुरु केला. "ए बाई, आम्ही रॉबीनहूड आर्मीचे स्वयंसेवक आहोत. काम करायला जाणार आहोत. कळलं?", दादु

उदरभरण नोहे..

"आई आज डब्यात काय ए?", दप्तर भरता भरता पिकलपोनीने विचारलं. "फरसबी आहे.. आणि डबा संपवला नाही ना पिकू तर मग बघ च."आई डबे भरता, भरता ओरडली. 'फरसबी' ऐकलं मात्र आणि पिकलपोनीने तोंड वेंगाडलं. "ए काय गं आई, तुला माहितीये ना मला नाय आवडत ना शेंगभाज्या, ", "अन्नाला असं घालून पाडून बोलू नये, लोकं मरतात अन्नावाचून, आपल्याला ते मिळतंय तर त्याचा मान राखा" असं म्हणत आईने दादू आणि पिकलपोनी कडे डबे सोपवले. "पिकू, तुला नेमकी कोणती भाजी आवडते गं? रोज तीच कटकट, डबा तसाच परत", दादुने मध्ये नाक घुसवलंच. पिकू चिडली. नाश्त्याला केलेले दडपे पोहे दडपायचेही त्या रागाच्या भरात राहून गेलं. दादू मज्जेत नाश्ता करत बसला. त्याला जीभ दाखवत पिकू शाळेसाठी निघाली. शाळेत पहिल्याच तासाला पिकूला भूक लागली. पण मधल्या सुट्टीला अजून होता वेळ. मधल्या सुट्टीपर्यंत कशीबशी भूक रोखून धरली. आणि एकदाची घंटा वाजताच उघडला डबा. पुन्हा डब्यात फरसबी बघून पिकूने डबा बंद केला. तिला पुन्हा राग आला. ''ही आई असं का करते? नाही आवडत मला भाजी तर मग दुसरं काही का नाही देत?",