Skip to main content

कासव- माझ्या नजरेतून

सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपटासाठी दिल्या जाणार्‍या सुवर्णकमळासह अनेक राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवांत पारितोषिक पटकावणारा 'कासव' मी आज पाहून आले. माझे आवडते दिग्दर्शकद्वयी सुमित्रा भावे, सुनील सुकथनकार यांची अजून एक अप्रतिम कलाकृती.
गेले काही दिवस मी पाहत असलेले चित्रपट हे खास 'माझ्यासाठी' बनवलेले आहेत, असं मला वाटतंय. त्यातला आशय, विषय, रचना, घटना हे माझ्याशी संबंधित असल्यासारखंच वाटतंय. (काही दिवसांपूर्वी 'बापजन्म' आणि आज 'कासव'), इतके की काही घटना आणि संवाद माझे आणि माझ्या आसपासचे असावेत असं वाटतंय. केवळ माझ्या मनात हा पाहून काय आलं, तेवढं लिहितेय नेहमीसारखं. 'नैराश्य' ही एकच थीम नाही या चित्रपटाची. माणूस हा समाजशील प्राणी आहे. आणि तरीही त्याला कधी कधी एकटेपणा हवासा वाटायला लागतो आणि या दोन परस्पर विरोधी प्रकृतीचा समतोल साधणं, हेच त्याचं जीवन आहे. कासवांसारखं तो कवचात जाऊन जगापासून स्वतःला फार काळ वेगळं ठेऊ शकत नाही. पण दुःख आत ओढून घेऊन बाह्य जगाला सामना करणं मात्र तो शिकतो.या समुद्री कासवांचं जीवनचक्र अगदी नवल वाटावं असं.. कायम समुद्रात असणारी कासवीण अंडी घालण्यासाठी मात्र किनाऱ्यावर येऊन खड्डा करून त्यात अंडी घालते. पण पिल्लं अंड्यातून बाहेर यायच्या आधीच ती परत पाण्यात निघूनही जाते. नुकतीच जन्माला आलेली पिल्ले एकमेकांसोबत आणि तरी एकेकटी समुद्राकडे जायला निघतात. शेवटी त्यांना समुद्रात जावंच लागतं. असुरक्षित वाटलं की कासव अंग आकसून आपल्या कवचात घुसून बसतं. पण पुन्हा समुद्राचा सामना करण्यासाठी, आयुष्याला भिडण्यासाठी त्या कवचातून, शेलमधून बाहेर पडावं लागतं प्रत्येकाला.
"घेई ओढुनी सर्वत्र विषयातुनी इंद्रिये जसा कासव तो अंगे तेव्हा प्रज्ञा स्थिरावली''
गीताईतलं हे वचन दत्ताभाऊंच्या तोंडून ऐकताना आपण एक जीवन विषयक पायरीच जणू चढतो. निसर्गाच्या चक्रासारखं हे माणसांचेही एक चक्र आहे. नैराश्याशी झगडत त्यातून उभी राहणारी 'स्व' शोधणारी जानकी, नैराश्यात गुरफटलेला तरुण मुलगा, नैराश्य म्हणजे रिकामटेकड्यांचा उद्योग असे समजणाऱ्या सर्वसामान्यांचं प्रतिनिधीत्व करणारा यदु, एक अभ्यासक दत्ताभाऊ अशा पात्ररचनांशी कासवांचा संबंध काय? एक रूपक आहे. 'अस्तु' मध्ये जसा हत्ती होता ना तसंच. पण ते पडद्यावरच पहा. काय आणि कोणते प्रसंग सांगायचे म्हंटलं तर पूर्ण चित्रपटच उलगडला असं होईल. सर्वच कलाकारांचा सर्वांगसुंदर अभिनय, सुंदर पार्श्वसंगीत, लोकगीतांची चुणूक असलेली साधीच पण मनाला स्पर्शणारी गाणी.'लहर समंदर रे' गाण्याची रचनाच कल्पक आणि सुरेख आहे. असं लाटेला लाट येऊन मिळावी तसं वाटतं आणि कमाल सिनेमॅटोग्राफी..काय सुंदर टिपलाय निसर्ग, त्याची विविध अंग, समुद्राच्या तरंगांच्या इतकी वेगवेगळी चित्रे.. खूप सुंदर.. वेगवेगळ्या दाखल्यातून, संवादातून उभी राहणारी ही गोष्ट एक वैचारिक माहितीपट नाहीये. हा चित्रपट आपल्याला खूप काही देऊन जातो. महत्त्व आधाराचं, स्वीकाराचं, दातृत्वाचं आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे मातृत्वाचं. आवर्जून पहावा.


- रमा जाधव

Comments

Popular posts from this blog

दशक्रिया

मेलेल्या व्यक्तीचे दहन झाल्यानंतर, पुढील काही दिवस 'दशक्रिया विधी' केले जातात. असे समजतात की याने आत्म्याला शांती मिळते, जन्म-मरणाच्या चक्रातून सुटका होते आणि मोक्ष प्राप्त होतो. तिसऱ्या दिवशी राख नदीत सोडण्यापासून ते तेराव्यापर्यंत या विधी चालतात. पवित्र गंगेच्या तीरावर या विधी करतात. महाराष्ट्रातल्या पैठणला दक्षिण काशी मानतात त्यामुळे इथली गोदावरीही गंगेसारखीच पवित्र (आणि प्रदूषित) आहे. हिच्या घाटावरही हे क्रियाकर्म चालते. ब्राह्मणातील किरवंत या पोटजातीचे लोक हे विधी करतात. आणि तेच त्यांचे उपजीविकेचे साधन असते. यांना ब्राह्मणातील इतर पोटजातीहून कमी लेखले जाते. त्यांना शुभ सभारंभाला न बोलावणे, मंदिरात गंध-पूजेचा मान न देणे अशा प्रकारे अवहेलना करून केवळ मर्तिकालाच त्यांचे स्मरण होते. पण यांच्यातील काही लोकही 'दशक्रिया विधींचं' व्यावसायिकरण करून, मृत व्यक्तीच्या आधीच दुःखी-कष्टी नातेवाईकांना अमूक अमूक विधी न केल्यास आत्म्यास शांती मिळणार नाही अशी भीती घालून समाजातील इतर लोकांचे शोषण करतात. काहीजण निर्ढावून अक्षरशः आपले दुकान मांडून लोकांना गिऱ्हाईक बनवून, इतकेच नव्हे त

गीताई आणि आई

"आई आम्हाला ना गीताई शिकवत आहेत त्या नवीन मॅडम. तू मला आणि दादूला म्हणायला लावायचीस बघ. ते आत्ता शाळेत म्हणायला आहे." "अरे वा! अगं पिकू, अजूनही सांगतेच की मी, की करा पाठ, म्हणा, शिकवलेली स्तोत्रं, रामरक्षा, मनाचे श्लोक, अथर्वशीर्ष. पण वेळच नसतो तुम्हाला. आमच्या लहानपणी..असो.. "ए दादू, ये इकडे. बघ बघ. ते बघ आई परत स्वतःशी पुटपुटायला लागली" "काय विषय काय आहे?" - दादू "दादू, पिकू या असे समोर बरं" "आई मला अभ्यास आहे आणि दादूला टेनिस ला जायचंय म्हणतोय. हो ना रे?" "2 मिनिट थांब दादू. या दोघे समोर. खूप दिवस माझ्या मनात होतं हे, आणि त्यामागे काही कारणेही आहेत.  तुम्ही शांतपणे अर्धा तास तरी यासाठी देऊच शकता ना, टीव्ही आणि कॉम्प्युटर बंद करून? मग नंतर जा खेळायला आणि अभ्यासाला. कारण तेही महत्वाचं आहेच." " अगं आम्हाला 0 काही कळत नाही आणि कशाला उगाच म्हणायचं? आम्हाला कंटाळा येतो." "तुम्हाला माहीत आहे, हे सारं आम्ही का म्हणायला सांगतो? यामागे काही धार्मिक कारणं नाहीयेत. तुमचं पाठां

चारचौघी

परवा चारचौघी बघून आले. शो हाऊसफुल्ल होता. टिकीट्स मिळत नव्हती, पण राजसीमुळे मिळाली आणि I am greatfull की तिच्यामुळे इतकी सुंदर कलाकृती बघायला मिळाली. चारचौघी बघून आले आणि डोक्यात चक्रीवादळाने थैमान घातलं. ३१ वर्षानंतर हे नाटक पुन्हा एकदा रंगमंचावर आलं आणि तरीही ते तितकंच रीलेटिव्ह वाटतं, आणि एकंदर आपली समाजव्यवस्था पाहता ते अजून अनेक दशकं ते तितकंच रीलेटीव्ह वाटत राहील. प्रशांत दळवीने, एका पुरुषानी बाईपणाचे कंगोरे इतक्या बारकाईने मांडणं, आणि त्यांच्या मनातील तुफानाचा ठाव घेणं is really commendable. संहितेला योग्य न्याय दिला आहे त्यांनी. काळाच्या कितीतरी पुढचं आहे हे लिखाण असं म्हणावं तर यातील शब्दन शब्द असंख्य बायकांच्या मनाला स्पर्शून गेलेल्या असतो. काळ कुठलाही असो मग. चंद्रकांत कुलकर्णी यांचं कौतुक करावं तितकं कमीच आहे, त्यांनी संहितेला खराखुरा न्याय मिळवून दिला आहे. कास्टिंग अफलातून झालं आहे. यातले सारेच कलाकार खूप ताकदीचे आहेत. या चारचौघींचे भिन्न भिन्न प्रश्न आहेत. सगळ्या सक्षम, सुशिक्षित, सुजाण आहेत. आपल्या पायावर स्वाभिमानाने उभ्या आहेत. या सगळ्याच स्त्रिया त्यांच्या त्यांच्या आ