Skip to main content

अपूर्व प्रकाशवाटा

आज एका अलौकिक, कल्पनातीत कलाकृतीचा आस्वाद घ्यायला मिळाला. महाकवी, कविकुलगुरू कालिदास यांची महान कलाकृती 'मेघदूत' आजवर अनेकांनी बसवलेली आहे, पण आजचा प्रयोग नावाप्रमाणेच 'अपूर्व मेघदूत' होता. एक अद्भुत नाट्यप्रयोग. द्रुष्टीक्षीणतेपासून, दृष्टिहीनतेपर्यंत अंधत्त्वाचे भिन्न प्रकार असलेले १९ प्रतिभाशाली अंध कलाकारांनी सादर केलेला नाट्यप्रयोग. गणेश दिघे यांचे लेखन असलेले हे दोन अंकी नाटक बसवले होते स्वागत थोरात यांनी. त्यांच्या बद्दल वेगळ्यानेच लिहायला हवे. पण कोल्हापुरात 'रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर, मिड टाऊन' आणि 'सावी फाउंडेशन' यांनी हा प्रयोग घडवून आणला होता.

प्रत्येक माणसाला व्यक्त व्हायचं असतं, त्यासाठी प्रत्येकजण वेगवेगळी अभिव्यक्ती साधने निवडतो. तशीच ही अंध मंडळी. यांना नाटकाद्वारे आपली कला सादर करायची होती. महाराष्ट्राच्या विविध भागातून शिक्षण, नोकरी, व्यवसायासाठी पुण्यात असलेल्या अशा या मुलांना एकत्र घेऊन हे नाटक बसवलं गेलं आहे. आपापली कामे, शिक्षण सांभाळत ही मुले नाटक करत आहेत. आणि नाटक करताना त्यांच्या व्यक्तिमत्त्वात बदल घडून आले आहेत असे ते सांगतात. मेघदूतासारखे नाटक म्हणजे शिवधनुष्य, पण या मुलांनी ते लीलया पेललं आहे. खरंतर आधी सांगितले नसते तर त्यांना दिसत नाही किंवा कमी दिसते हे पटलेच नसते. नाटकातले संवाद पाठ करणे असो, नृत्य असो, स्टेजचे भान ठेऊन सादरीकरण असो या सगळ्यात त्यांची मेहनत पुरेपूर जाणवत होती. प्रकाशयोजना, संगीतही अगदी सुरेख होते. यक्ष आणि त्याची प्रिय विरहणीचे छाया नृत्य अत्यंत वाखाणण्याजोगे होते. सारीच नृत्ये खूप मनोहारी होती. 

नाटक हे केवळ दृक्श्राव्य माध्यमापुरते मर्यादित नसून 'अनुभवणं' आहे हे या प्रयोगातून अधोरेखित झाले. "दिव्यांग आहोत म्हणून सहानुभूती नको तर आमच्या गुणांवर, कर्तृत्वावर आम्हाला जोखा. आणि समान वागणूक द्या." असे सांगण्याचा या सर्व कलाकारांचा प्रयत्न होता. आणि खरेच धकाधकीच्या जीवनातून वेळ काढून हे नाटक करण्याची इच्छाशक्ती पाहता, कष्ट पाहता हे सारे प्रशंसेच्याही खरोखरीच पलीकडचे आहे. आपण सादर करणारी कलाकृती आपण पाहू शकत नाही, पण एक चांगली कलाकृती आपण सादर करतो आहोत याचा आनंद प्रत्येक कलाकाराच्या चेहऱ्यावर होता.


नाटकाचे लेखक, निर्माते यांच्या सोबत दिग्दर्शक स्वागत थोरात यांचे काम खूप मोठे आहे.जे ‘ब्रेल मॅन ऑफ इंडिया’ या नावाने सर्वपरिचित आहेत. गेली २५ वर्ष ते अंधांसाठी काम करत आहेत. ब्रेल नियतकालिक काढण्यापासून, डॉक्युमेंटरी बनवणे ते विविध कलाविष्कारांचा नेत्रहीन कसा आनंद घेऊ शकतील त्या गोष्टींचा पाठपुरावा करणे यासाठी ते झटत असतात. या सगळ्यापाठीमागची निस्वार्थ मेहनत त्यांच्या बोलण्यातून दिसून येत होती. आपली मुले वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत स्वावलंबी जीवन जगतात हे सांगताना हळवे झाले. त्यातून त्यांचे कलाकृतीशी आणि कलाकारांशी जडलेले निस्सीम बंध दिसून येत होते. या मुलांना दृष्टी नसली तरी दृष्टिकोन आहे, आणि तोच किती महत्त्वाचा आहे हे त्यांनी सांगितलं.

ही मुले केवळ नेत्रहीन आहेत म्हणून हे नाटक पाहावे असे नाही, या मुलांनी हे नाटक 'पाहण्याजोगे' केलेलेच आहे. माझे सौभाग्यच की अशी दुर्दम्य इच्छाशक्ती आणि कष्टाळू माणसं मला पावलोपावली भेटत आहेत. आज मला या प्रज्ञाचक्षूंनी एक नजर दिली आहे. प्रकाशवाटा पाहण्याची. अपूर्व प्रकाशवाटा.

- रमा

Comments

Popular posts from this blog

दशक्रिया

मेलेल्या व्यक्तीचे दहन झाल्यानंतर, पुढील काही दिवस 'दशक्रिया विधी' केले जातात. असे समजतात की याने आत्म्याला शांती मिळते, जन्म-मरणाच्या चक्रातून सुटका होते आणि मोक्ष प्राप्त होतो. तिसऱ्या दिवशी राख नदीत सोडण्यापासून ते तेराव्यापर्यंत या विधी चालतात. पवित्र गंगेच्या तीरावर या विधी करतात. महाराष्ट्रातल्या पैठणला दक्षिण काशी मानतात त्यामुळे इथली गोदावरीही गंगेसारखीच पवित्र (आणि प्रदूषित) आहे. हिच्या घाटावरही हे क्रियाकर्म चालते. ब्राह्मणातील किरवंत या पोटजातीचे लोक हे विधी करतात. आणि तेच त्यांचे उपजीविकेचे साधन असते. यांना ब्राह्मणातील इतर पोटजातीहून कमी लेखले जाते. त्यांना शुभ सभारंभाला न बोलावणे, मंदिरात गंध-पूजेचा मान न देणे अशा प्रकारे अवहेलना करून केवळ मर्तिकालाच त्यांचे स्मरण होते. पण यांच्यातील काही लोकही 'दशक्रिया विधींचं' व्यावसायिकरण करून, मृत व्यक्तीच्या आधीच दुःखी-कष्टी नातेवाईकांना अमूक अमूक विधी न केल्यास आत्म्यास शांती मिळणार नाही अशी भीती घालून समाजातील इतर लोकांचे शोषण करतात. काहीजण निर्ढावून अक्षरशः आपले दुकान मांडून लोकांना गिऱ्हाईक बनवून, इतकेच नव्हे त...

गीताई आणि आई

"आई आम्हाला ना गीताई शिकवत आहेत त्या नवीन मॅडम. तू मला आणि दादूला म्हणायला लावायचीस बघ. ते आत्ता शाळेत म्हणायला आहे." "अरे वा! अगं पिकू, अजूनही सांगतेच की मी, की करा पाठ, म्हणा, शिकवलेली स्तोत्रं, रामरक्षा, मनाचे श्लोक, अथर्वशीर्ष. पण वेळच नसतो तुम्हाला. आमच्या लहानपणी..असो.. "ए दादू, ये इकडे. बघ बघ. ते बघ आई परत स्वतःशी पुटपुटायला लागली" "काय विषय काय आहे?" - दादू "दादू, पिकू या असे समोर बरं" "आई मला अभ्यास आहे आणि दादूला टेनिस ला जायचंय म्हणतोय. हो ना रे?" "2 मिनिट थांब दादू. या दोघे समोर. खूप दिवस माझ्या मनात होतं हे, आणि त्यामागे काही कारणेही आहेत.  तुम्ही शांतपणे अर्धा तास तरी यासाठी देऊच शकता ना, टीव्ही आणि कॉम्प्युटर बंद करून? मग नंतर जा खेळायला आणि अभ्यासाला. कारण तेही महत्वाचं आहेच." " अगं आम्हाला 0 काही कळत नाही आणि कशाला उगाच म्हणायचं? आम्हाला कंटाळा येतो." "तुम्हाला माहीत आहे, हे सारं आम्ही का म्हणायला सांगतो? यामागे काही धार्मिक कारणं नाहीयेत. तुमचं पाठां...

सलील चौधरी : एक श्रद्धांजली

बंगाल प्रांत हा मुळातच मुग्ध करणारा प्रदेश आहे. कलाप्रेमींवर तर बंगालची कायमच जादू राहिली आहे. के एल सेहगल पासून अनिल बिस्वास, एस डी, आर डी, हेमंतकुमार, किशोरकुमार, मन्ना डे ते लोकगीतं गाणारे कुणी अनामिक, इथलं संगीत अत्यंत मधुर, मोहक संगीत आहे. या सर्वांतच मला 'सलील चौधरी' या संगीतकाराने नेहमीच मोहवून टाकलं आहे. आज सलील चौधरी यांचा जन्मदिवस. सुरुवात झाली 'मधुमतीने'. एकूण 12 गाण्यांचं अप्रतिम प्रदर्शन. मुकेशची तरल "दिल तडप तडप" आणि "सुहाना सफर और ये मौसम हसीं", एकीकडे लताची आर्त हाक  "आजा रे परदेसी", खेळकर "घडी घडी मोरा दिल धडके" आणि "जुल्मी संग आँख लडी" तर दुसरीकडे मोहम्मद रफीची "टुटे हुए ख्वाबोंने" ते "जंगलमे मोर नाचा" अशी बहुरंगी गाणी. "दैय्या रे, दैय्या रे चढ गयो पापी बिछुआ" गाण्याप्रमाणे  लहानपणापासूनच सलीलदांनी मला झपाटून टाकलं. आणि फिल्मी गीतांच्या जादुई दुनियेत मी प्रवेश केला. मुकेशने सलीलदांच्या निर्देशनखाली ज्याप्रमाणे गायले आहे ते खरंच उल्लेखनीय आहे. अगदी ...