Skip to main content

दशक्रिया

मेलेल्या व्यक्तीचे दहन झाल्यानंतर, पुढील काही दिवस 'दशक्रिया विधी' केले जातात. असे समजतात की याने आत्म्याला शांती मिळते, जन्म-मरणाच्या चक्रातून सुटका होते आणि मोक्ष प्राप्त होतो. तिसऱ्या दिवशी राख नदीत सोडण्यापासून ते तेराव्यापर्यंत या विधी चालतात. पवित्र गंगेच्या तीरावर या विधी करतात. महाराष्ट्रातल्या पैठणला दक्षिण काशी मानतात त्यामुळे इथली गोदावरीही गंगेसारखीच पवित्र (आणि प्रदूषित) आहे. हिच्या घाटावरही हे क्रियाकर्म चालते. ब्राह्मणातील किरवंत या पोटजातीचे लोक हे विधी करतात. आणि तेच त्यांचे उपजीविकेचे साधन असते. यांना ब्राह्मणातील इतर पोटजातीहून कमी लेखले जाते. त्यांना शुभ सभारंभाला न बोलावणे, मंदिरात गंध-पूजेचा मान न देणे अशा प्रकारे अवहेलना करून केवळ मर्तिकालाच त्यांचे स्मरण होते. पण यांच्यातील काही लोकही 'दशक्रिया विधींचं' व्यावसायिकरण करून, मृत व्यक्तीच्या आधीच दुःखी-कष्टी नातेवाईकांना अमूक अमूक विधी न केल्यास आत्म्यास शांती मिळणार नाही अशी भीती घालून समाजातील इतर लोकांचे शोषण करतात. काहीजण निर्ढावून अक्षरशः आपले दुकान मांडून लोकांना गिऱ्हाईक बनवून, इतकेच नव्हे तर इतर किरवंतांकडूनही त्यांचे उपजीविकेचे साधन हिरावून घेणे वगैरे प्रकाराने त्यांचेही शोषण करतात.

हिंदू धर्मातील दशक्रिया विधींसह एकूणच प्रथा, परंपरेवर चित्रपटातून परखड भाष्य करण्यात आले आहे. ब्राह्मणी कर्मकांडावर, जातींच्या उतरंडीवर बोलणारा हा सिनेमा २५ वर्षांपूर्वी आलेल्या बाबा भांड यांच्या कादंबरीवर आधारीत आहे. त्यामुळे ब्राह्मण महासंघाचा यावरील आत्ताचा हल्ला निव्वळ हास्यास्पद आहे. सगळे किरवंत लूट करतात असे यात दाखवले आहे का? नाही! त्यांनाही गरिबी आणि कुचेष्टेला सामोरे जावे लागते असेच यात दाखवले आहे. यात कुठेही ब्राह्मणांचा व विशेष करून किरवंतांचा अपमान करण्याचा हेतू दिसून येत नाही. न्हावी त्याचे दुकान मांडून बसलेला आहे, माणूस मेल्यावर क्रियाकर्मासाठी जे साहित्य लागतं त्याचेही दुकान आहेच. मृत व्यक्तीच्या घरातील माणसे दुःखात बुडालेले असतात व विशिष्ट गोष्टी केल्याशिवाय मेलेलं माणूससुद्धा कर्मकांडांच्या कचाट्यातून सुटत नाही हेच यात दाखवले आहे .

किरवंतांचं दुःखही या सिनेमात दाखवले आहेच. दक्षिणा न मिळाल्याने गरीब, फाटका, उपाशी असा  किरवंत मिलिंद फाटक यांनी त्यांची भूमिका उत्तम साकारली आहे. केशव भटजी हे एरवी मेलेल्यासही पिळून काढणारे किरवंत, पण गुढी पाडव्याच्या कार्यक्रमाला अपमान झाल्यावर त्याच्या डोळ्यातल्या संतापाबरोबरच, दुखावले जाऊन आलेले अश्रूही मनोज जोशीने तितक्याच कसोशीने दाखवले आहेत.

केवळ वास्तव आणि वास्तव दाखवलेने हिंदू धर्माला सतत चटके का बसतात कळत नाही. गम्मत जम्मत नावाच्या कार्यक्रमात अरुण नलावडेने एक चांगला किरवंत ब्राह्मण साकारला आहे. म्हणजे कलाकृती वेगवेगळा विषय घेऊन बनलेल्या असतात, तशी तशी पात्रं चांगली वाईट साकारलेली असतात. माणूस हा काही फक्त कृष्ण धवल असत नाही. त्यामुळे कुठलाही एक माणूस पूर्णपणे आदर्शाचा पुतळा किंवा पूर्णपणे वाईट असत नाही. चांगल्या वाईटपणाच्या कमी जास्त छटा असतात. समाज माणसांनी बनलेला असतो, त्यामुळे तर तो अनेकविध छटांचा असतो. चांगल्या-वाईटांनी बनलेला असतो. मग त्यातल्या एखाद्या छटेकडे लक्ष वेधलं तर याचा अर्थ असा नाही की दुसरे रंग अस्तित्वातच नाहीत.

कलाकृतीने धर्म बाटतो ही पाचकळ कल्पना ज्यांनी मांडली त्यांनी पहिल्यांदा ती कृती पाहावी, समजून घ्यावी आणि मग त्यावर बोलावे. चित्रपट माझ्यादृष्टीने एक चांगली कृती आहे. पहिला भाग जरासा संथ आहे, गाणीही गाळली असती (कीर्तन गीत सोडून) तर चित्रपटाला अजून वेग आला असता असं वाटतं. एका लहान मुलाची धर्मविधींकडे पाहण्याची दृष्टी, कुतूहल हे सगळं त्या मुलाने छान वठवले आहे. चित्रपटाचा अंत हा नवीन गोष्टींना, प्रश्नांना जन्म देणारा आहे.

आमच्या घरी कुणी गेले, की घाटावरून आले की बास. कसले दिवस नाहीत, कसले विधी नाहीत. देव असलाच तर त्याच्या आणि आपल्यामध्ये कोणीही मध्यस्त नको ही आमची विचारसरणी. सगळे मिळून गेलेल्या व्यक्तीचं स्मरण करून प्रार्थना करतो फक्त. तेही त्याचा अर्थ जाणून, सर्व प्राणिमात्र सुखी राहोत, आरोग्यदायी राहोत, चांगले पाहोत, कुणाला कसले दुःख नसावे. आपण सारे एकत्र येऊन, एकत्र या जगण्याचा आनंद घेऊ असे मागणे मागतो. त्यामुळे चित्रपट पाहून माझ्या पोटात खड्डाच पडला.. हे इतकं सारं? जिवंत असताना दिलखुलास जगायचं सोडून मेल्यानंतर कसली सुटका मागतो माणूस, असे वाटले. सत्यशोधक भास्करराव जाधव या माझ्या पणजोबांनी तसा पायंडा पाडला नसता तर आम्हीही कदाचित रूढींच्या चक्रात अडकलो असतो या विचाराने जास्त खड्डा पडला. माझ्या काकांनी अत्यंत दुःखद शारीर वेदना सहन करत, कॅन्सर सारख्या आजाराशी झुंजत असतानाही आपल्यानंतर सगळ्यांनी अडकून न पडता आपापल्या कर्मास लागावे हे सांगणारे मृत्यूपत्र  केले होते. मला वाटतं कुणी तसे वागले तर दशक्रियाच काय, जन्म-मृत्यू शिकवणारा त्याहून मोठा विधी नसेल.

- रमा

Comments

Popular posts from this blog

गीताई आणि आई

"आई आम्हाला ना गीताई शिकवत आहेत त्या नवीन मॅडम. तू मला आणि दादूला म्हणायला लावायचीस बघ. ते आत्ता शाळेत म्हणायला आहे." "अरे वा! अगं पिकू, अजूनही सांगतेच की मी, की करा पाठ, म्हणा, शिकवलेली स्तोत्रं, रामरक्षा, मनाचे श्लोक, अथर्वशीर्ष. पण वेळच नसतो तुम्हाला. आमच्या लहानपणी..असो.. "ए दादू, ये इकडे. बघ बघ. ते बघ आई परत स्वतःशी पुटपुटायला लागली" "काय विषय काय आहे?" - दादू "दादू, पिकू या असे समोर बरं" "आई मला अभ्यास आहे आणि दादूला टेनिस ला जायचंय म्हणतोय. हो ना रे?" "2 मिनिट थांब दादू. या दोघे समोर. खूप दिवस माझ्या मनात होतं हे, आणि त्यामागे काही कारणेही आहेत.  तुम्ही शांतपणे अर्धा तास तरी यासाठी देऊच शकता ना, टीव्ही आणि कॉम्प्युटर बंद करून? मग नंतर जा खेळायला आणि अभ्यासाला. कारण तेही महत्वाचं आहेच." " अगं आम्हाला 0 काही कळत नाही आणि कशाला उगाच म्हणायचं? आम्हाला कंटाळा येतो." "तुम्हाला माहीत आहे, हे सारं आम्ही का म्हणायला सांगतो? यामागे काही धार्मिक कारणं नाहीयेत. तुमचं पाठां

चारचौघी

परवा चारचौघी बघून आले. शो हाऊसफुल्ल होता. टिकीट्स मिळत नव्हती, पण राजसीमुळे मिळाली आणि I am greatfull की तिच्यामुळे इतकी सुंदर कलाकृती बघायला मिळाली. चारचौघी बघून आले आणि डोक्यात चक्रीवादळाने थैमान घातलं. ३१ वर्षानंतर हे नाटक पुन्हा एकदा रंगमंचावर आलं आणि तरीही ते तितकंच रीलेटिव्ह वाटतं, आणि एकंदर आपली समाजव्यवस्था पाहता ते अजून अनेक दशकं ते तितकंच रीलेटीव्ह वाटत राहील. प्रशांत दळवीने, एका पुरुषानी बाईपणाचे कंगोरे इतक्या बारकाईने मांडणं, आणि त्यांच्या मनातील तुफानाचा ठाव घेणं is really commendable. संहितेला योग्य न्याय दिला आहे त्यांनी. काळाच्या कितीतरी पुढचं आहे हे लिखाण असं म्हणावं तर यातील शब्दन शब्द असंख्य बायकांच्या मनाला स्पर्शून गेलेल्या असतो. काळ कुठलाही असो मग. चंद्रकांत कुलकर्णी यांचं कौतुक करावं तितकं कमीच आहे, त्यांनी संहितेला खराखुरा न्याय मिळवून दिला आहे. कास्टिंग अफलातून झालं आहे. यातले सारेच कलाकार खूप ताकदीचे आहेत. या चारचौघींचे भिन्न भिन्न प्रश्न आहेत. सगळ्या सक्षम, सुशिक्षित, सुजाण आहेत. आपल्या पायावर स्वाभिमानाने उभ्या आहेत. या सगळ्याच स्त्रिया त्यांच्या त्यांच्या आ