परवा चारचौघी बघून आले. शो हाऊसफुल्ल होता. टिकीट्स मिळत नव्हती, पण राजसीमुळे मिळाली आणि I am greatfull की तिच्यामुळे इतकी सुंदर कलाकृती बघायला मिळाली.
चारचौघी बघून आले आणि डोक्यात चक्रीवादळाने थैमान घातलं. ३१ वर्षानंतर हे नाटक पुन्हा एकदा रंगमंचावर आलं आणि तरीही ते तितकंच रीलेटिव्ह वाटतं, आणि एकंदर आपली समाजव्यवस्था पाहता ते अजून अनेक दशकं ते तितकंच रीलेटीव्ह वाटत राहील.
प्रशांत दळवीने, एका पुरुषानी बाईपणाचे कंगोरे इतक्या बारकाईने मांडणं, आणि त्यांच्या मनातील तुफानाचा ठाव घेणं is really commendable. संहितेला योग्य न्याय दिला आहे त्यांनी. काळाच्या कितीतरी पुढचं आहे हे लिखाण असं म्हणावं तर यातील शब्दन शब्द असंख्य बायकांच्या मनाला स्पर्शून गेलेल्या असतो. काळ कुठलाही असो मग.
चंद्रकांत कुलकर्णी यांचं कौतुक करावं तितकं कमीच आहे, त्यांनी संहितेला खराखुरा न्याय मिळवून दिला आहे. कास्टिंग अफलातून झालं आहे. यातले सारेच कलाकार खूप ताकदीचे आहेत.
या चारचौघींचे भिन्न भिन्न प्रश्न आहेत. सगळ्या सक्षम, सुशिक्षित, सुजाण आहेत. आपल्या पायावर स्वाभिमानाने उभ्या आहेत. या सगळ्याच स्त्रिया त्यांच्या त्यांच्या आयुष्यात खूप सहन करतात. सहनशक्तीचा अगदी कडेलोट होईपर्यंत . यातलं रोहिणी हट्टंगडीने साकारलेल्या आईची भूमिका मला सगळ्यात बंडखोर वाटते. कधी काळी तिच्या हातून चूक झाली, ती विवाहित पुरुषाच्या प्रेमात पडली. लोकांच्या मते ' नादाला लावणारी बाई ' त्या विवाहित पुरुषापासून ३ मुली होतात. पण मग तिने त्या चुकीचं guilt न बाळगत बसता जबाबदारी घेतली. स्वतः शिक्षिका म्हणून काम केलं आणि तिन्ही मुलींना वाढवलं.आई ते मैत्रीण सगळं बनते. यात बंड आहे.
विद्या, सगळ्यात मोठी मुलगी. पतीचं दुसऱ्या बाईबरोबर अफेअर आहे कळल्या नंतर चिडते. तिला त्याच्या अफेअरपेक्षा त्याच्या समर्थनाची, डिफेन्सची जास्त चीड आहे. " तुझ्या आईने वेगळं काय केलं? तुझ्या धमन्यांतूनही अशाच नात्याचे रक्त वाहतेय " हे आरोप जेव्हा तो उलटपक्षी करतो तेव्हा ती पेटून उठते. शेवटी ती एक प्राध्यापिका. तिचे पेपर्स ठिकठिकाणी वाचले जातात. वादात ती सगळ्यांचे मुद्दे सहज खोडू शकते. पण नवऱ्याच्या या प्रश्नांना तिच्याकडे उत्तर नाही याने ती जास्त चिडते आणि त्याला आणि आपल्या २ वर्षाच्या मुलीला सोडून माहेरी परत येते. " आज मला मंगल मावशीच्या (वडिलांची पहिली बायको) , कुशीत जाऊन रडावसं वाटतंय " असं ती म्हणते कारण तिचं दुःख तिला जास्त आपलं वाटतं. थोड्या वेळासाठी ती आईला आरोपीच्या पिंजऱ्यात उभी करते. मुक्ता बर्वेनी जीव ओतलाय विद्याच्या भूमिकेत. तिचा फोनवरचा प्रसंग फारच दाहक आहे. अंगावर शहारे येतात. पण तिच्या घटस्फोटाच्या निर्णयापासून ती डगमगत नाही. आई यातही पाठीशी आहे. यात बंड आहे.
वर वर आनंदी दिसणारे वैजू आणि श्रीकांत. नवऱ्याच्या धरसोड वृत्तीमुळे आणि त्याच्या नाकर्तेपणाचा तिला कंटाळा आला आहे. त्यात होऊ घातलेल्या बाळाच्या जबाबदारीने ती अधिकच खचली आहे. अशा वेळी तिच्या नवऱ्यालाही सूनावायला आई मागे पुढे पाहत नाही. यात बंड आहे.
धाकटी विनी पर्ण पेठेने साकारली आहे. प्रकाश आणि विरेन हे तिचे जवळचे मित्र. दोघेही स्वभावाने, प्रकृतीने अगदी भिन्न पण तरी त्यांची चांगली मैत्री आहे. पण जोडीदार म्हणून निवड करताना तिचा गोंधळ उडाला आहे. तिला प्रकाशही हवा आहे आणि विरेनलाही सोडायचं नाहीये. मग मी जर या दोघांच्याही सोबत राहिले तर असा क्रांतिकारक विचार तिच्या मनात येतो. आई समजुतीच्या चार गोष्टी सांगते पण तिच्या डोक्यातून ही कल्पना काही जात नाही म्हणल्यावर मात्र आई तिला स्पष्ट सांगते, की पूर्ण विचारांती जे करशील ते तू कर. पण त्याची पूर्ण जबाबदारी तू घेशील. काळाच्या पुढचं आणि प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन तू हे करायला सक्षम आहेस का?पूर्णपणे तयार आहेस का? कारण आईला माहित आहे, आपणही काळाच्या पुढचा एक निर्णय घेतला होता. खूप काही बोलले लोक. निंदा नालस्ती झाली. पण त्याची जबाबदारी घेतली, लोकांना निर्भिडपणे सामोरे गेलो आणि मुलींनाही उच्चशिक्षित, स्वाभिमानी आणि त्यांचे निर्णय त्या स्वतः घेऊ शकतील यासाठी तयार केलं. यात बंड आहे.
या चौघींच्याही आयुष्यात वादळासारखे प्रश्न आहेत. पण या चौघी निराळ्या आहेत. रुळलेल्या वाटेवरून जाणं त्यांना मान्य नाही. सो कॉल्ड समाजाने आखलेल्या नीतीमत्तेची बंधने झुगारून देणाऱ्या आहेत. नाटक थांबते ते प्रत्येकीच्या प्रश्नांवर, पण कितीही प्रश्न आले तरी त्या उत्तर शोधून काढतीलच. चूक वा बरोबर ती गोष्ट वेगळी.
नाटकाला टाळ्या देणाऱ्या प्रेक्षकांना मला फक्त विचारावसं वाटतं, यातल्या प्रश्र्नांसारखी परिस्थिती समजा त्यांच्यासोबत घडली तर त्या सामान्य चारचौघींसारख्या हातपाय गाळतील की या चारचौघींसारखं प्रश्नांना भिडतील? समाजाची बंधने झुगारतील? लोक काय म्हणतील यापेक्षा आपल्याला काय वाटतं याचा विचार करत उत्तरं शोधतील? बस्स मीही प्रश्र्नांपाशीच थांबते..
रमा
Comments
You’re a prolific writer tumi laan laan gosti pan observe karta. So Beautiful Rama 👌🏻😊
Keep writing! the way u express as a magic in it just about to reveal itself.
👏🏻👏🏻😊