Skip to main content

पिकलपोनी

एक होती पिकलपोनी..गोबरे गाल, नकटं नाक,अतिशय हट्टी..नाकावर राग..आई-बापूची एकदम लाडकी. एकदा तिने बापूजवळ धरला हट्ट, "मला बाहेर घेऊन जा, जा म्हणजे जा.. आत्ताच्या आत्ता.. "
बापू पण लग्गेच तय्यार. म्हणाला, "चल, पटकन तयार हो, निघूया.. " 

आई म्हणाली, "अहो, आता अंधारून आलय, आता कशाला जाताय ?.. अगं पिकलपोनी उशीर झालाय आता, आता उद्या जा हा" .

आई असं म्हंटल्यावर बापू जरा डळमळला, "हो, हो, उद्या जायचं का मग आपण?"

पिकलपोनीने गाल फुगवले, डोळे मोठ्ठे केले, ओठांचा चंबू केला (नेहमीप्रमाणे) एक हात कमरेवर आणि एक पाय तालावर आपटत आपलं पेटंट गाणं सुरु केलं.. 
"जा बाबा बापू, असच कर तू.. सगळे असच करतात.. माझे कुणीच लाड नाही करत. जा बाबा. . "

शेवटी आई म्हणाली "जा बाई, जा. .  पण लग्गेच परत यायचं. . पाण्याची बाटली घेउन जा बरोबर, खबरदार बाहेरचं काही खाल्लं तर.  गप घरी वरण-भात खायचा. आणि दादालापण न्या सोबत. अभ्यास केलाय त्याने दिवसभर. पिकलपोनी पटकन तयार झाली आणि बापू, पिकलपोनी आणि पिकलबंबू यांची स्वारी निघाली फिरायला. . 

फिर-फिर फिरले. . आणि मग तिघांनाही लागली भूक (नेहमीप्रमाणे). . ते गेले राजभाऊ कडे, भेळबीळ खाल्ली, मग सुरेख लस्सी वाल्याकडे शिरून ३ ग्लास लस्सी रिचवली. तिथून निघतात तोच त्यांना दिसला एक फुगेवाला. . 
"लेलो, लेलो, गुब्बारे. . रंगीन, हसीन गुब्बारे. . हरे, निले. पिले, लाल, लेलो लेलो गुब्बारे". . . 

पिकलपोनीने हळूच दादूकडे बघितलं. त्यानेपण मानेने हळूच होकार दिला. दोघांनी एकदम पुकारा केला. . 
"बापू द ग्रेट, आपण घेऊया ना हो प्लीज गुब्बारे. ."

बापू म्हणाला, "ए आता आई ओरडेल हा. . भेळ काय, लस्सी काय. . आता काय तर म्हणे फुगे. . दादू तू तर मोठा आहेस ना? हा काय वेडेपणा, बास झाला आता " 

पिकलपोनी आणि दादू वस्ताद बहीणभाऊ.दोघांनी केविलवाणे चेहरे केले (नेहमीप्रमाणे). बापूला अगदी पाहवेना. त्याने दोघांना दोन फुगे  घेउन दिले. "चला आता लवकर, नाहीतर आईचा फुगा फुटेल." तिघे हसत हसत घरी जायला निघाले. 

अचानक पिकलपोनीचा फुगा सुटला आणि ती बापूचा हात सोडून लागली की पळायला..बापू ओरडतोय, "थांब, थांब" ..दादू ओरडतोय, "थांब, थांब". . पण ही शहाणी कुठली ऐकतेय. . 





शेवटी फुगाही हरवला आणि पिकलपोनीपण . आता लागली रडायला.. भ्याSSS करून. रडता रडता एका बाकावर बसून झोपून गेली. तिथं आली काही मुलं, म्हणाली, 

"हरवलीस का? बरं झालं. . 
चल, ये आमच्या देशात. 
वेडी-वाकडी आमची चाल, 
गाण्यांना नाही आमच्या ताल.. 
अभ्यास आम्हाला चालत नाही, 
मोठ्यांचं आम्ही ऐकत नाही . 
पण आमच्या देशात असते मजा,
न कुठले बंधन, न कुठली सजा" .. 

पिकलपोनी गेली हरखून. तिला वाटलं जावं यांच्या देशात. ती गेली त्यांच्यासोबत नाचत त्यांच्या देशात. तिथे खरच मजा होती. ओरडायला कुणीच नव्हतं. नुसते खेळ. . नुसता खाऊ. 

पण चारच दिवसात पिकालपोनी कंटाळली. तिला दादू आठवला. आई-बाबा आठवले. घर आठवलं. ती लागली रडायला. पण हे लोक कुठले तिला सोडायला तयार. . ती अगदी घायकुतीला आली. गयावया करायला लागली. "प्लीज, प्लीज सोडा हो मला, माझी वाट बघत असतील घरी सगळे. " 

शेवटी आला एक म्हातारा, "हे बघ पिकलपोनी , हा मंत्र घे, तुला हवं ते मिळेल, पण तसं वागायला पण लागेल."
ती म्हणाली हो, हो, तुम्ही सांगता तस्सच करेन मी. 
तीने डोळे मिटले आणि म्हणायला लागली , 

जंतर-मंतर, जादू कलंदर,
सोडणार नाही बापूचा हात 
करणार नाही कसलाच हट्ट 
गप खाणार वरण-भात 
          मी आहे पिकलपोनी, भाऊ माझा दादू
                                                    घरी पाठवा माझ्या मला, रडतोय माझा बापू 

डोळे उघडून बघतेय तर काय? ती होती स्वता:च्या घरात. आपल्या खोलीत. आपल्या पलंगावर चक्क. बापू उठवत होता तिला, 
"कित्ती वेळ झोपणार, चला, उठा बाब्या, जाउया न फिरायला? "
पिकलपोनीने आई-बापू आणि दादुला घट्ट मिठी मारली (नेहमीप्रमाणे) आणि म्हणाली.. "जाऊया. पण आता मी मुळीच हट्ट करणार नाहिये." सगळे हसले, आणि पुन्हा मिठीत शिरले. 

आता तेव्हापासून पिकलपोनीनं अगदी शहाण्यासारखं वागायचं ठरवलंय! बघू आता किती जमतंय!! 



Comments

Ru2ja said…
Kon hi Pikalponi?? Rama ka?
Kuthun itki chan nava suchtat?
sukhada said…
Khuuupch god, niragas ani chan :)
जंतर-मंतर, जादू कलंदर,
सोडणार नाही बापूचा हात
करणार नाही कसलाच हट्ट
गप खाणार वरण-भात
मी आहे पिकलपोनी, भाऊ माझा अगडबंबु,
घरी पाठवा माझ्या मला, रडतोय माझा बापू जंबू ...<<<
किती बरे झाले असतेना असा एखादा मंत्र बोलले कि हरवलेली नाती परत भेटली असती तर ……!!!


"पिकलपोनी.."
हि एक सुंदर "बाल कथा " आहे !

Popular posts from this blog

दशक्रिया

मेलेल्या व्यक्तीचे दहन झाल्यानंतर, पुढील काही दिवस 'दशक्रिया विधी' केले जातात. असे समजतात की याने आत्म्याला शांती मिळते, जन्म-मरणाच्या चक्रातून सुटका होते आणि मोक्ष प्राप्त होतो. तिसऱ्या दिवशी राख नदीत सोडण्यापासून ते तेराव्यापर्यंत या विधी चालतात. पवित्र गंगेच्या तीरावर या विधी करतात. महाराष्ट्रातल्या पैठणला दक्षिण काशी मानतात त्यामुळे इथली गोदावरीही गंगेसारखीच पवित्र (आणि प्रदूषित) आहे. हिच्या घाटावरही हे क्रियाकर्म चालते. ब्राह्मणातील किरवंत या पोटजातीचे लोक हे विधी करतात. आणि तेच त्यांचे उपजीविकेचे साधन असते. यांना ब्राह्मणातील इतर पोटजातीहून कमी लेखले जाते. त्यांना शुभ सभारंभाला न बोलावणे, मंदिरात गंध-पूजेचा मान न देणे अशा प्रकारे अवहेलना करून केवळ मर्तिकालाच त्यांचे स्मरण होते. पण यांच्यातील काही लोकही 'दशक्रिया विधींचं' व्यावसायिकरण करून, मृत व्यक्तीच्या आधीच दुःखी-कष्टी नातेवाईकांना अमूक अमूक विधी न केल्यास आत्म्यास शांती मिळणार नाही अशी भीती घालून समाजातील इतर लोकांचे शोषण करतात. काहीजण निर्ढावून अक्षरशः आपले दुकान मांडून लोकांना गिऱ्हाईक बनवून, इतकेच नव्हे त

गीताई आणि आई

"आई आम्हाला ना गीताई शिकवत आहेत त्या नवीन मॅडम. तू मला आणि दादूला म्हणायला लावायचीस बघ. ते आत्ता शाळेत म्हणायला आहे." "अरे वा! अगं पिकू, अजूनही सांगतेच की मी, की करा पाठ, म्हणा, शिकवलेली स्तोत्रं, रामरक्षा, मनाचे श्लोक, अथर्वशीर्ष. पण वेळच नसतो तुम्हाला. आमच्या लहानपणी..असो.. "ए दादू, ये इकडे. बघ बघ. ते बघ आई परत स्वतःशी पुटपुटायला लागली" "काय विषय काय आहे?" - दादू "दादू, पिकू या असे समोर बरं" "आई मला अभ्यास आहे आणि दादूला टेनिस ला जायचंय म्हणतोय. हो ना रे?" "2 मिनिट थांब दादू. या दोघे समोर. खूप दिवस माझ्या मनात होतं हे, आणि त्यामागे काही कारणेही आहेत.  तुम्ही शांतपणे अर्धा तास तरी यासाठी देऊच शकता ना, टीव्ही आणि कॉम्प्युटर बंद करून? मग नंतर जा खेळायला आणि अभ्यासाला. कारण तेही महत्वाचं आहेच." " अगं आम्हाला 0 काही कळत नाही आणि कशाला उगाच म्हणायचं? आम्हाला कंटाळा येतो." "तुम्हाला माहीत आहे, हे सारं आम्ही का म्हणायला सांगतो? यामागे काही धार्मिक कारणं नाहीयेत. तुमचं पाठां

चारचौघी

परवा चारचौघी बघून आले. शो हाऊसफुल्ल होता. टिकीट्स मिळत नव्हती, पण राजसीमुळे मिळाली आणि I am greatfull की तिच्यामुळे इतकी सुंदर कलाकृती बघायला मिळाली. चारचौघी बघून आले आणि डोक्यात चक्रीवादळाने थैमान घातलं. ३१ वर्षानंतर हे नाटक पुन्हा एकदा रंगमंचावर आलं आणि तरीही ते तितकंच रीलेटिव्ह वाटतं, आणि एकंदर आपली समाजव्यवस्था पाहता ते अजून अनेक दशकं ते तितकंच रीलेटीव्ह वाटत राहील. प्रशांत दळवीने, एका पुरुषानी बाईपणाचे कंगोरे इतक्या बारकाईने मांडणं, आणि त्यांच्या मनातील तुफानाचा ठाव घेणं is really commendable. संहितेला योग्य न्याय दिला आहे त्यांनी. काळाच्या कितीतरी पुढचं आहे हे लिखाण असं म्हणावं तर यातील शब्दन शब्द असंख्य बायकांच्या मनाला स्पर्शून गेलेल्या असतो. काळ कुठलाही असो मग. चंद्रकांत कुलकर्णी यांचं कौतुक करावं तितकं कमीच आहे, त्यांनी संहितेला खराखुरा न्याय मिळवून दिला आहे. कास्टिंग अफलातून झालं आहे. यातले सारेच कलाकार खूप ताकदीचे आहेत. या चारचौघींचे भिन्न भिन्न प्रश्न आहेत. सगळ्या सक्षम, सुशिक्षित, सुजाण आहेत. आपल्या पायावर स्वाभिमानाने उभ्या आहेत. या सगळ्याच स्त्रिया त्यांच्या त्यांच्या आ