लग्नाच्या 8 वर्षानंतरही वरून सुखवस्तू जोडपे शरद व कुसुम अभ्यंकर(सुबोध भावे, तृप्ती तोरडमल) सुखी नाही. कुसुम एका विचित्र शारीरिक, मानसिक स्थितीतून जाऊ लागते ज्याचे वैद्यकशास्त्रात उत्तर नाही. याचा तिच्या वैवाहिक आयुष्यावर होणारा परिणाम, भूतकाळात डोकावून बघताना उलगडलेले एक सत्य, एक स्त्री. 'सविता दामोदर परांजपे'. कोण आहे ही सविता? तिचं आणि शरदचं नातं काय? या साऱ्याची ही कथा. 80 च्या दशकातल्या याच नावाच्या मूळ नाटकावर बेतलेला हा सिनेमा आहे. नाटकात कै. रीमा लागू यांनी केलेली कुसुमची भूमिका तृप्ती तोरडमल हिने साकारली आहे. तिचे हे यशस्वी पदार्पण म्हणावे लागेल. सुबोध भावेने ही शरदची भूमिका उत्तम वठवली आहे. बाकी भूमिकांमध्ये राकेश बापट, पल्लवी पाटील यांनीही त्यांच्या भूमिकांना न्याय दिला आहे.
चित्रपटातील गाणी आणि बॅकग्राऊंड साऊंड खूप मस्त. 'वेल्हाळा' आणि 'जादूनगरी' ही गाणी खूपच श्रवणीय. संवादही सुंदर. मराठी भयापटांचा इतिहास पाहता, एक थरार निर्माण करून तो शेवटपर्यंत राखून ठेवण्याचे काम यात चांगल्या रीतीने केले आहे. काहीशी हिंदी चित्रपट 'भूलभुलैय्या' ची झाक यात जाणवते. चित्रपट वेगवान आहे. सिनेमॅटोग्राफी उत्तम. तांत्रिक दृष्ट्या मराठी सिनेमा खूप प्रगती करतो आहे हे पाहून आनंद वाटतो.
अलीकडे हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक मंडळी मराठी सिनेमाकडे वळत आहेत. अभिनेता जॉन अब्राहामने या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत निर्माता म्हणून पदार्पण केले आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे स्वप्ना वाघमारे-जोशी यांनी.
चित्रपट पाहिल्यानंतर काही गोष्टी मनात रेंगाळल्या. भ्रमनिरासापोटी मनात मत्सर निर्माण होतो आणि मग अंतरात्मा त्याने पछाडून षड्रिपुंची तीव्रता शरीरात ज्वालामुखीप्रमाणे उसळते. नातेसंबंधाचा पाया म्हणजे प्रेम. नात्यातला विश्वास नष्ट झाला तर आकर्षण कमकुवत होईल. हे सारं केवळ आपलं मन ताब्यात ठेवू शकतं पण आपलं मन हे तर अतिशय गूढ आणि गहन आहे. असे संदर्भ कुठे कुठे चित्रपटात दिसतात.
ट्रेलर इतके यातले नाट्य अंगावर येत नाही. त्यामुळे घाबरू नका, आणि एकदा जरूर पाहा.
रेटिंग- 3/5
Comments