Skip to main content

सविता दामोदर परांजपे - एक रंगलेले गूढ

लग्नाच्या 8 वर्षानंतरही वरून सुखवस्तू जोडपे शरद व कुसुम अभ्यंकर(सुबोध भावे, तृप्ती तोरडमल) सुखी नाही. कुसुम एका विचित्र शारीरिक, मानसिक स्थितीतून जाऊ लागते ज्याचे वैद्यकशास्त्रात उत्तर नाही. याचा तिच्या वैवाहिक आयुष्यावर होणारा परिणाम, भूतकाळात डोकावून बघताना उलगडलेले एक सत्य, एक स्त्री. 'सविता दामोदर परांजपे'. कोण आहे ही सविता? तिचं आणि शरदचं नातं काय?  या साऱ्याची ही कथा. 80 च्या दशकातल्या याच नावाच्या मूळ नाटकावर बेतलेला हा सिनेमा आहे. नाटकात कै. रीमा लागू यांनी केलेली कुसुमची भूमिका तृप्ती तोरडमल हिने साकारली आहे. तिचे हे यशस्वी पदार्पण म्हणावे लागेल. सुबोध भावेने ही शरदची भूमिका उत्तम वठवली आहे. बाकी भूमिकांमध्ये राकेश बापट, पल्लवी पाटील यांनीही त्यांच्या भूमिकांना न्याय दिला आहे. 

चित्रपटातील गाणी आणि बॅकग्राऊंड साऊंड खूप मस्त. 'वेल्हाळा' आणि 'जादूनगरी' ही गाणी खूपच श्रवणीय. संवादही सुंदर. मराठी भयापटांचा इतिहास पाहता, एक थरार निर्माण करून तो शेवटपर्यंत राखून ठेवण्याचे काम यात चांगल्या रीतीने केले आहे. काहीशी हिंदी चित्रपट 'भूलभुलैय्या' ची झाक यात जाणवते. चित्रपट वेगवान आहे. सिनेमॅटोग्राफी उत्तम.  तांत्रिक दृष्ट्या मराठी सिनेमा खूप प्रगती करतो आहे हे पाहून आनंद वाटतो. 

अलीकडे हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक मंडळी मराठी सिनेमाकडे वळत आहेत. अभिनेता जॉन अब्राहामने या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत निर्माता म्हणून पदार्पण केले आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे स्वप्ना वाघमारे-जोशी यांनी.

चित्रपट पाहिल्यानंतर काही गोष्टी मनात रेंगाळल्या. भ्रमनिरासापोटी मनात मत्सर निर्माण होतो आणि मग अंतरात्मा त्याने पछाडून षड्रिपुंची तीव्रता शरीरात ज्वालामुखीप्रमाणे उसळते. नातेसंबंधाचा पाया म्हणजे प्रेम. नात्यातला विश्वास नष्ट झाला तर आकर्षण कमकुवत होईल. हे सारं केवळ आपलं मन ताब्यात ठेवू शकतं पण आपलं मन हे तर अतिशय गूढ आणि गहन आहे. असे संदर्भ कुठे कुठे चित्रपटात दिसतात. 


ट्रेलर इतके यातले नाट्य अंगावर येत नाही. त्यामुळे घाबरू नका, आणि एकदा जरूर पाहा. 

रेटिंग- 3/5

Comments

Popular posts from this blog

दशक्रिया

मेलेल्या व्यक्तीचे दहन झाल्यानंतर, पुढील काही दिवस 'दशक्रिया विधी' केले जातात. असे समजतात की याने आत्म्याला शांती मिळते, जन्म-मरणाच्या चक्रातून सुटका होते आणि मोक्ष प्राप्त होतो. तिसऱ्या दिवशी राख नदीत सोडण्यापासून ते तेराव्यापर्यंत या विधी चालतात. पवित्र गंगेच्या तीरावर या विधी करतात. महाराष्ट्रातल्या पैठणला दक्षिण काशी मानतात त्यामुळे इथली गोदावरीही गंगेसारखीच पवित्र (आणि प्रदूषित) आहे. हिच्या घाटावरही हे क्रियाकर्म चालते. ब्राह्मणातील किरवंत या पोटजातीचे लोक हे विधी करतात. आणि तेच त्यांचे उपजीविकेचे साधन असते. यांना ब्राह्मणातील इतर पोटजातीहून कमी लेखले जाते. त्यांना शुभ सभारंभाला न बोलावणे, मंदिरात गंध-पूजेचा मान न देणे अशा प्रकारे अवहेलना करून केवळ मर्तिकालाच त्यांचे स्मरण होते. पण यांच्यातील काही लोकही 'दशक्रिया विधींचं' व्यावसायिकरण करून, मृत व्यक्तीच्या आधीच दुःखी-कष्टी नातेवाईकांना अमूक अमूक विधी न केल्यास आत्म्यास शांती मिळणार नाही अशी भीती घालून समाजातील इतर लोकांचे शोषण करतात. काहीजण निर्ढावून अक्षरशः आपले दुकान मांडून लोकांना गिऱ्हाईक बनवून, इतकेच नव्हे त

गीताई आणि आई

"आई आम्हाला ना गीताई शिकवत आहेत त्या नवीन मॅडम. तू मला आणि दादूला म्हणायला लावायचीस बघ. ते आत्ता शाळेत म्हणायला आहे." "अरे वा! अगं पिकू, अजूनही सांगतेच की मी, की करा पाठ, म्हणा, शिकवलेली स्तोत्रं, रामरक्षा, मनाचे श्लोक, अथर्वशीर्ष. पण वेळच नसतो तुम्हाला. आमच्या लहानपणी..असो.. "ए दादू, ये इकडे. बघ बघ. ते बघ आई परत स्वतःशी पुटपुटायला लागली" "काय विषय काय आहे?" - दादू "दादू, पिकू या असे समोर बरं" "आई मला अभ्यास आहे आणि दादूला टेनिस ला जायचंय म्हणतोय. हो ना रे?" "2 मिनिट थांब दादू. या दोघे समोर. खूप दिवस माझ्या मनात होतं हे, आणि त्यामागे काही कारणेही आहेत.  तुम्ही शांतपणे अर्धा तास तरी यासाठी देऊच शकता ना, टीव्ही आणि कॉम्प्युटर बंद करून? मग नंतर जा खेळायला आणि अभ्यासाला. कारण तेही महत्वाचं आहेच." " अगं आम्हाला 0 काही कळत नाही आणि कशाला उगाच म्हणायचं? आम्हाला कंटाळा येतो." "तुम्हाला माहीत आहे, हे सारं आम्ही का म्हणायला सांगतो? यामागे काही धार्मिक कारणं नाहीयेत. तुमचं पाठां

चारचौघी

परवा चारचौघी बघून आले. शो हाऊसफुल्ल होता. टिकीट्स मिळत नव्हती, पण राजसीमुळे मिळाली आणि I am greatfull की तिच्यामुळे इतकी सुंदर कलाकृती बघायला मिळाली. चारचौघी बघून आले आणि डोक्यात चक्रीवादळाने थैमान घातलं. ३१ वर्षानंतर हे नाटक पुन्हा एकदा रंगमंचावर आलं आणि तरीही ते तितकंच रीलेटिव्ह वाटतं, आणि एकंदर आपली समाजव्यवस्था पाहता ते अजून अनेक दशकं ते तितकंच रीलेटीव्ह वाटत राहील. प्रशांत दळवीने, एका पुरुषानी बाईपणाचे कंगोरे इतक्या बारकाईने मांडणं, आणि त्यांच्या मनातील तुफानाचा ठाव घेणं is really commendable. संहितेला योग्य न्याय दिला आहे त्यांनी. काळाच्या कितीतरी पुढचं आहे हे लिखाण असं म्हणावं तर यातील शब्दन शब्द असंख्य बायकांच्या मनाला स्पर्शून गेलेल्या असतो. काळ कुठलाही असो मग. चंद्रकांत कुलकर्णी यांचं कौतुक करावं तितकं कमीच आहे, त्यांनी संहितेला खराखुरा न्याय मिळवून दिला आहे. कास्टिंग अफलातून झालं आहे. यातले सारेच कलाकार खूप ताकदीचे आहेत. या चारचौघींचे भिन्न भिन्न प्रश्न आहेत. सगळ्या सक्षम, सुशिक्षित, सुजाण आहेत. आपल्या पायावर स्वाभिमानाने उभ्या आहेत. या सगळ्याच स्त्रिया त्यांच्या त्यांच्या आ