Skip to main content

वो जिंदगी का साथ निभाता चला गया....


3 डिसेंम्बर 2011, लंडनमधील उच्चवर्गीय भाग मेफेअर येथील वॉशिंग्टन हॉटेल मध्ये अचानक गोंधळ सुरू झाला. बाहेर दोन अँब्युलन्स आल्या. दोन पॅरामेडिक्स लगबगीने हॉटेल लॉबीत पोहोचले. रिसेप्शनिस्ट ओरडले "रूम 207". पॅरामेडिक त्यांची प्रथमोपचार साधने घेऊन लिफ्टकडे धावले. पण 207 मध्ये सारं काही संपलं होतं. सुप्रसिद्ध नायक देव आनंद यांचा हृदयविकाराचा मोठा झटका येऊन अंत झाला. 



देव आनंद हा वर्तमानात जगणारा माणूस होता, पण त्याला भविष्याकडे पाहून काम करणं  चांगलंच ठाऊक होतं. . वयाची ऐंशी पार केल्यानंतरही, यश मिळो किंवा अपयश, टीका असो किंवा शेवटच्या काळात त्याची खिल्ली उडवलेली असो त्याचा वेळ, ऊर्जा आणि कल नवनवीन चित्रपट बनवण्यासाठी होता. या दुर्दम्य महत्वाकांक्षी व्यक्तिमत्त्वाला 'अशक्य' शब्दच जणू माहीत नव्हता. तो होता ख़ुशमिज़ाज, परिपूर्ण, देखणा.. देव आनंद! 

देव आनंदच्या करिअरची विभागणी साधारणपणे अशी करता येईल- त्याचा 'कृष्णधवल काळ' जिथे त्याच्या बहुतेक दिग्दर्शकांनी (जास्त करून त्याचा भाऊ-विजय आनंद) त्याच्या अति टोकाला जायच्या प्रवृत्तीला काबूत ठेवलं होतं, आणि 'रंगीत काळ' ज्यात फार मोठी विविधता आली. एके काळाचा फॅशनेबल, ट्रेंडसेटर देव आनंद, आत्मपूजक बनला. स्वतःच्याच प्रेमात आकंठ बुडाला आणि हळूहळू त्याची प्रतिमा अत्यंत भडक (कपड्यांच्या निवडीतही) आणि न शोभणारी बनत गेली. त्याच्या शेवटच्या काळातल्या सिनेमांमध्ये हे सिद्ध झालं की त्याच्याकडे दिग्दर्शकाची दृष्टी नाही. पण त्याचे विषय, कथा, काळाला अनुसरून आणि महत्त्वाचे म्हणजे 'मूळस्वरूप', खऱ्या होत्या. 

तो आपल्यात नाही यावर विश्वासच बसत नाही.  वय वाढला की माणूस म्हातारा होतो असं न समजणारा माणूस. चैतन्याने भरलेला, उर्जावान, उमदा माणूस, त्याच्या चित्रपट, गाण्यातून सतत जिवंत राहील.


माझ्या मते, खालील काही गाण्यातून या महानायकाचे चरित्र डोकावते, ज्याने मला मनोरंजनाचा अनमोल ठेवा दिला.

"तदबीरसे बिगडी हुई तक़दीर बनाले"(बाज़ी)
सतत रिस्क घेणाऱ्या देव आनंदचं जीवन तत्व यात दिसून येतं. बॉक्स ऑफिसावरील नशीब काही का असेना, एका मागोमाग एक चित्रपट बनवत राहणे. असा हा खऱ्या आयुष्यातील 'गँबलर'. 'बाज़ी' ही नवकेतनची पहिली मोठी यशस्वी फिल्म. या चित्रपटाशी संबंधित सर्वांच्याच करियरला या चित्रपटाच्या यशामुळे मोठे प्रोत्साहन मिळाले. गुरु दत्त, गीता बाली, देव आनंद, एस.डी.बर्मन, साहिर लुधियानवी.

"मै जिंदगी का साथ निभाता चला गया" (हम दोनो)
देव आनंदच्या म्हणण्यानुसार हेच त्याचं जीवनविषयक तत्वज्ञान होतं.
 "जो मिल गया उसी को मुकद्दर समझ लिया 
जो खो गया मैं उसको भुलाता चला गया" 
साहिरच्या या ओळींप्रमाणेच विचार करत तो पुढे काय करता येईल हे शोधत गेला. 

"जीवन के सफरमें राही"(मुनिमजी)
जसा मुकेश राज कपूरचा तसा किशोर कुमार देव आनंदचा आवाज होता असे बरेचजण म्हणतात. (माझ्यासाठी रफी).  किशोर कुमारच्या करिअरचे पहिले वहिले गाणे देव आनंदसाठी होते, *फिल्म 'जिद्दी' साठी. "मरने की दुवाए क्यू मांगू"). "जीवन के सफर में राही" कायमच किशोर कुमार आणि देव आनंद यांच्या जिवलग मैत्रीला संबोधून राहिले. आणि देव साहेबांच्या फॅन्ससाठी "और दे जाते है यादें, तनहाईमें तडपानेको" या ओळी आजही लागू होतात.

"हम है राही प्यार के"(नौ, दो, ग्यारह)
'नौ दो ग्यारह' ही गोल्डी(विजय आनंद) ची नवकेतनसाठी पहिली फिल्म होती. या गाण्यातही देव आनंदची जीवनाकडे पाहण्याची दृष्टी दिसून येते. "धूप थी नसीब में, तो धूप में लिया है दम, चाँदनी मिली तो हम चाँदनी में सो लिए"

"है अपना दिल तो आवारा"(सोलवाह साल)
अशाच पद्धतीने आपल्याला ओळखण्यात यावं असं देव आनंद ला वाटत असावं. पडद्यावर सुंदर सुंदर नायिकांवर प्रेम उधळणारा तो आणि आणि त्याच्यावर प्रत्यक्षात जान छिडकणारा हजारो स्त्री फॅन्सचा वर्ग.

"ये दिल ना होता बेचारा"(ज्वेल थीफ)
फक्त देव आनंदमुळेच प्लास्टिकच्या माशाला 'कूल लुक' येऊ शकतो. रस्त्याच्या मध्यातून आनंदाने फिरताना आणि तनुजाला पुढे न जाऊ देता तो शेवटी गाणं संपवतो तिच्या कार च्या बॉनेटवर बसून. एस.डी यांची ही चाल "ब्रिज ऑन द रिव्हर क्वाय" मधील "कर्नल बोगी मार्च" वरून घेतली आहे.

"उपरवाला जानकर अनजान है" (काला बझार)
देव आनंदच्या माझ्या सर्वांत आवडत्या गाण्यांपैकी एक. प्रत्येक ओळ म्हणजे श्लेषच. इतरांसाठी भगवंताची आळवणी करणारा देव आनंद, वरच्या बर्थ वरील वहिदा रेहमानला 'उपरवाला' संबोधून गातो. त्याच्या चेहऱ्यावरील भावातील निरागसता आणि मनातील खट्याळपणा खूपच सुंदर आहे. 

"ये रात, ये चाँदनी फिर कहाँ"(जाल)
हेमंत कुमार देखील देव आनंदचा आवाज म्हणून शोभतो. या गाण्याचे चित्रीकरण अप्रतिम आहे. देव आणि गीता बाली दोन वेगवेगळ्या बिल्डिंग मध्ये आहेत पण त्यांच्या प्रतिक्रिया सुरेख दाखवल्या आहेत.

"ये आँखे उफ्फ यूंम्मा" (जब प्यार किसीसे होता है)
याच चित्रपटातील "जिया हो, जिया हो जिया कुछ बोल दो" हे जास्त लोकप्रिय गीत असूनही हे माझे आवडते गाणे आहे. रफीचा खेळकरपणा, त्याची सहजता. रफीची प्रत्येक नायकासाठी वेगळा आवाज देता येण्याची वैविध्यपूर्ण गायकी. कधी कधी देव आनंदने रफी सोडून किशोर कुमार का स्वीकारला नवल वाटतं. 

"हम बेख़ुदी में तुमको पुकारे चले गये"(काला पानी)
हे गाणं ऐका निव्वळ रफी च्या जादुई आवाजासाठी. रफीचा आवाज आणि मेलडी अशी जमून आली आहे की तुम्ही जवळजवळ वाद्यांची सोबत विसरून जाता. इतर 'कोठा गीतांपेक्षा' हे खूप शांत आणि कानाला हळुवार असे आहे. संगीत फक्त मोहम्मद रफीच्या आवाजाला मार्मिकता देण्यापूरते साजेसे दिले आहे. सचिनदांनी जणू काही नवकेतन साठी आपल्या उत्तम रचना ठेवल्या होत्या. आणि त्यातील उत्तम त्यांनी रफीसाठी योजून ठेवल्या होत्या.

"दिन ढल जाए हाय, रात न जाये"(गाईड)
देव आनंद च्या सर्वोत्तम कामांपैकी एक. या गीतात भावनांचा संघर्ष उत्तम प्रदर्शित झाला आहे. हरवलेल्या प्रेमासाठी खेद, आयुष्यात घडू न शकलेल्या गोष्टींसाठी दुःख, विश्वासघाताप्रति कडवटपणा, आणि सगळ्यात मोठा म्हणजे प्रेमभंग- "तू तो न आये, तेरी याद सताये"...आणि याचे चित्रीकरण, ज्यात  पायऱ्यांच्या जोडलेल्या शृंखलेचा हुशारीने वापर केला आहे. ज्याने  अंकित होतो रोझी आणि राजुमधील भावनिक अवरोध आणि वहिदाच्या चेहऱ्यावरील उदासीनता आणि नैराश्य जेव्हा ती त्याची असह्य पीडा ऐकते आपल्याला मिळते एक उत्कृष्ट कालातीत गीत.

"तू कहाँ ये बता (तेरे घरके सामने)
धुक्याची रात्र, रफीचा मधाळ आवाज, देव आनंदची जादू आणि नूतनचं रात्रीला उजळवणारं प्रज्वलित हास्य. देव आनंदचे उत्तम प्रेम प्रसंग म्हणावे असे. (अजून एक रोमँटिक गाणे मनात येते ते म्हणजे पतिता मधलं, "याद किया दिलने कहाँ हो तूम"..अजून शांत आणि हलकं फुलकं तरी गोड)

देव आनंद मरुच शकत नाही. मृत्यूनंतरही आपल्यातल्या कित्येक जिवंत व्यक्तींपेक्षा तो जास्त जिवंत आहे. इतकं भरभरून आयुष्य तो जगला, पूर्ण उत्साहाने, आनंदाने, उत्तेजनेने. कुठलीही इच्छा अपूर्ण नाही की कसलं दुःख मागे नाही. त्याच्याच शब्दांत सांगायचं तर, "जेव्हा माझी वेळ येईल, मला एकदम गायब व्हायचं आहे. जसा वाऱ्याचा झोत झुळुकीत वाहतो, जशी फडफडणारी ज्योत, दाहक अग्नी बनते, किंवा पाण्याचा एक थेंब, वाहत्या प्रवाहाबरोबर वाहू लागतो. मला वाटतं कुणीच कधी मला  मरताना किंवा संपलेला पाहू नये" (त्याचे आत्मचरित्र "Romancing with Life मधून)

- रमा जाधव (अनुवादित)
मूळ - विक्रम आप्पासाहेब जाधव
03 December 2018

Comments

Popular posts from this blog

दशक्रिया

मेलेल्या व्यक्तीचे दहन झाल्यानंतर, पुढील काही दिवस 'दशक्रिया विधी' केले जातात. असे समजतात की याने आत्म्याला शांती मिळते, जन्म-मरणाच्या चक्रातून सुटका होते आणि मोक्ष प्राप्त होतो. तिसऱ्या दिवशी राख नदीत सोडण्यापासून ते तेराव्यापर्यंत या विधी चालतात. पवित्र गंगेच्या तीरावर या विधी करतात. महाराष्ट्रातल्या पैठणला दक्षिण काशी मानतात त्यामुळे इथली गोदावरीही गंगेसारखीच पवित्र (आणि प्रदूषित) आहे. हिच्या घाटावरही हे क्रियाकर्म चालते. ब्राह्मणातील किरवंत या पोटजातीचे लोक हे विधी करतात. आणि तेच त्यांचे उपजीविकेचे साधन असते. यांना ब्राह्मणातील इतर पोटजातीहून कमी लेखले जाते. त्यांना शुभ सभारंभाला न बोलावणे, मंदिरात गंध-पूजेचा मान न देणे अशा प्रकारे अवहेलना करून केवळ मर्तिकालाच त्यांचे स्मरण होते. पण यांच्यातील काही लोकही 'दशक्रिया विधींचं' व्यावसायिकरण करून, मृत व्यक्तीच्या आधीच दुःखी-कष्टी नातेवाईकांना अमूक अमूक विधी न केल्यास आत्म्यास शांती मिळणार नाही अशी भीती घालून समाजातील इतर लोकांचे शोषण करतात. काहीजण निर्ढावून अक्षरशः आपले दुकान मांडून लोकांना गिऱ्हाईक बनवून, इतकेच नव्हे त

गीताई आणि आई

"आई आम्हाला ना गीताई शिकवत आहेत त्या नवीन मॅडम. तू मला आणि दादूला म्हणायला लावायचीस बघ. ते आत्ता शाळेत म्हणायला आहे." "अरे वा! अगं पिकू, अजूनही सांगतेच की मी, की करा पाठ, म्हणा, शिकवलेली स्तोत्रं, रामरक्षा, मनाचे श्लोक, अथर्वशीर्ष. पण वेळच नसतो तुम्हाला. आमच्या लहानपणी..असो.. "ए दादू, ये इकडे. बघ बघ. ते बघ आई परत स्वतःशी पुटपुटायला लागली" "काय विषय काय आहे?" - दादू "दादू, पिकू या असे समोर बरं" "आई मला अभ्यास आहे आणि दादूला टेनिस ला जायचंय म्हणतोय. हो ना रे?" "2 मिनिट थांब दादू. या दोघे समोर. खूप दिवस माझ्या मनात होतं हे, आणि त्यामागे काही कारणेही आहेत.  तुम्ही शांतपणे अर्धा तास तरी यासाठी देऊच शकता ना, टीव्ही आणि कॉम्प्युटर बंद करून? मग नंतर जा खेळायला आणि अभ्यासाला. कारण तेही महत्वाचं आहेच." " अगं आम्हाला 0 काही कळत नाही आणि कशाला उगाच म्हणायचं? आम्हाला कंटाळा येतो." "तुम्हाला माहीत आहे, हे सारं आम्ही का म्हणायला सांगतो? यामागे काही धार्मिक कारणं नाहीयेत. तुमचं पाठां

चारचौघी

परवा चारचौघी बघून आले. शो हाऊसफुल्ल होता. टिकीट्स मिळत नव्हती, पण राजसीमुळे मिळाली आणि I am greatfull की तिच्यामुळे इतकी सुंदर कलाकृती बघायला मिळाली. चारचौघी बघून आले आणि डोक्यात चक्रीवादळाने थैमान घातलं. ३१ वर्षानंतर हे नाटक पुन्हा एकदा रंगमंचावर आलं आणि तरीही ते तितकंच रीलेटिव्ह वाटतं, आणि एकंदर आपली समाजव्यवस्था पाहता ते अजून अनेक दशकं ते तितकंच रीलेटीव्ह वाटत राहील. प्रशांत दळवीने, एका पुरुषानी बाईपणाचे कंगोरे इतक्या बारकाईने मांडणं, आणि त्यांच्या मनातील तुफानाचा ठाव घेणं is really commendable. संहितेला योग्य न्याय दिला आहे त्यांनी. काळाच्या कितीतरी पुढचं आहे हे लिखाण असं म्हणावं तर यातील शब्दन शब्द असंख्य बायकांच्या मनाला स्पर्शून गेलेल्या असतो. काळ कुठलाही असो मग. चंद्रकांत कुलकर्णी यांचं कौतुक करावं तितकं कमीच आहे, त्यांनी संहितेला खराखुरा न्याय मिळवून दिला आहे. कास्टिंग अफलातून झालं आहे. यातले सारेच कलाकार खूप ताकदीचे आहेत. या चारचौघींचे भिन्न भिन्न प्रश्न आहेत. सगळ्या सक्षम, सुशिक्षित, सुजाण आहेत. आपल्या पायावर स्वाभिमानाने उभ्या आहेत. या सगळ्याच स्त्रिया त्यांच्या त्यांच्या आ