Skip to main content

मला देव भेटला होता..



डोळे उघडत होते हळू-हळू..वेगळाच प्रकाश दिसत होता लांबून..खूप सुंदर अनुभव घेतला होता मी..मला देव भेटला होता.

 I.C.U. बाहेरचा तो लांबच लांब कॉरीडोर..भकास..शांत..दोन-तिन बाकडी टाकलेली त्या तिथे..एका स्ट्रेचरवर मी झोपलेली वाट बघत..समोर स्पेशल रूम नं. १ दिसतेय. इतका अविस्मरणिय अनुभव घेऊन मी कधी एकदा आईला भेटेन असं झालेलं मला आणि मला इथेच का ठेवलय? इतकं काय खास झालं होतं?? मला देव भेटला होता.
I.C.U. मधून काढून रूम मध्ये न्यायला इतका का वेळ? माझी चिडचिड व्हायला लागलेली..स्ट्रेचरवर पडल्या-पडल्या मी इकडे-तिकडे बघतेय..शेजारच्या त्या बाकावर एक बाई बसलेली..

कमालीचा ओळखीचा वाटतो नाही का चेहरा हिचा? अगदी शांत, सौम्य वगैरे..वात्सल्याला मूर्त रूप दिलं तर अगदी अशीच दिसेल. मी उगीचच बघतेय का हिच्याकडे केव्हाची? का ही टक लाऊन बसलीआहे माझ्याकडे? बोलावं का काही? हिचं कोणी अ‍ॅडमिट असेल का इथे? नक्कीच बरं झालेलं असेल. इतकी शांत, समाधानी दिसती आहे..की डॉक्टर असेल? पण कपडे तर डॉक्टरचे वाटत नाहीत..

अचानक तिच बोलायला लागते, "बरं वाटंतय का आता?"
किती शांत आणि आपुलकीचा आवाज आहे हिचा..

मी - "अं..हो, बरं वाटतय आता..खूप शांत पण वाटतय.. तूम्ही माझ्या घरच्यांना पाहीला का हो कुठे आसपास? मला आता इथून रूम मध्ये हलवणार आहेत म्हणे"..

ती - "पडून रहा शांत, येतील थोड्या वेळात. "
माझा नुकताच घेतलेला अनुभव सांगावा का हिला? हसेलच मला ही..पण हसेना का?
मी- "अहो, किती वाजलेत? रात्र आहे ना आता?"
ती इतकी गोड हसली,
ती -"नाही गं, दुपार आहे. येतील तुझ्या घरचे..बोलायचय का तुला? बोल माझ्याशी तोपर्यंत.."
मी - "तुमचं कुणी अ‍ॅडमिट आहे का इथं?"
ती - "हो, मैत्रीण आहे माझी"..

प्रस्तावना नं करता पटकन सांगून टाकावं हिला..
मी - "अहो, मला ना, मला देव भेटला होता हो आत्ता.."
ती खळखळून हसली..


मी अतिशय उत्साहाने - "कसं सांगू तुम्हाला, निव्वळ अवर्णनिय..असा निळसर, शांत, केशरी प्रकाश..आणि असा एक आश्वासक हात मला धीर द्यायला..खरं सांगतेय मी..मला बरं नव्हतं ना..मी, मी मरून जाईन असं वाटत होतं. पण मग त्या वरांड्याचा कोपरा दिसतोय ना तो अंधारा,तिथेच होता देव..माझ्याशी बोलला..'तुझी वेळ नाही आली अजून, आत्ता एवढीच भेट पुरे' असं म्हणाला.."

मी इतकी उत्साहाने सांगतेय, आणि हिच्या चेहर्‍यावरची माशी हलेना.
ती- "देव भेटला होता?? बरं..छानच की मग..कसा होता दिसायला? बाई होता, की पुरुष होता?"

खरच की, मला आतापर्यंत हा प्रश्नच पडला नव्हता, खरच कसा होता दिसायला??
मी- "नाही हो, असा चेहरा नव्हता..आणि बाई की पुरुष काही आठवत नाहीये, पण मला खरच त्या तिथल्या कोपर्‍यात दिसला त्या प्रकाशात देव. "

ती नुसतीच बघत माझ्याकडे..माझी आता चिडचिड व्हायला लागली, मी इतका उत्कट प्रसंग शेअर करतेय आणि ही आपली खिल्ली उडवतेय की काय? जाऊ देत. मला काय करायचय?घरचे का येत नाही आहेत अजून? किती वेळ झालाय..माझा धीर सुटत चाललेला आता..
"डॉक्टर, नर्स.." मी ओरडतेय पण कोणी ढिम्म थांबायला तयार नाही. कोण, कुठली ही बाई, आणि एखाद्या जुन्या मैत्रीणीसारखी गप्पा मारतेय.

ती- "कोल्हापूरची ना तू?"
मला परत उत्साह - "हो, तुम्ही कसं ओळखलं?"
ती- "तू गीता पाठांतर स्पर्धेत भाग घेतला होतास ना? पाहिलय मी तुला.."
मी-"अहो, पण ते शाळेत..खूप, खूप वर्ष झाली त्याला..
ती - "तो श्लोक आठवतोय का?
"नैनं छिन्दन्ति शस्त्राणि, नैनं दहति पावकः"
आठवतोय का अर्थ??"
मी, ब्लँक- "हो म्हणजे,थोडा, थोडा..त्याचं एकंदर सार म्हणजे, आत्म्याचा नाश कधीही होत नाही, तो अविनाशी आहे..असं काहीसं आहे ना? कोणतेही शस्त्र त्याचे तुकडे करू शकत नाही की, कोणतेही..."
माझे शब्द विरत जात आहेत, आणि माझा स्ट्रेचर हालायला लागतो, आणि हे काय मी इथेच आहे अजून हिच्याशी बोलत,
"अहो, मला घेऊन जा ना, मी इथे आहे"
शेवटी मीच पळत जाऊन बेड मध्ये शिरते..खूप सारा निळा प्रकाश सगळीकडे..डोळे दिपून जातात परत..डोळे उघडले तर आई-बाबा समोर , "आत्ता उठलीस, बरं वाटतय का बब्या, आम्ही इथेच आहोत तुझ्यासोबत"

मी बाहेर बघतेय, ती कुठे गेली? बाहेर त्या लांब कॉरीडोर मध्ये कुणीच नाही. अचानक त्या कोपर्‍यात ती म्हणत जाताना दिसते, "नैनं छिन्दन्ति शस्त्राणि, नैनं दहति पावकः"..
परत वात्यल्यरूपी चेहरा आणि तोच शांत आवाज
."तुझी वेळ नाही आली अजून, आत्ता एवढीच भेट पुरे"

Comments

pravin wadnere said…
सुंदर लिहिलंय हे...अगदी खिळवून ठेवणारं....!
pravin wadnere said…
सुंदर लिहिलंय हे...अगदी खिळवून ठेवणारं....!

Popular posts from this blog

दशक्रिया

मेलेल्या व्यक्तीचे दहन झाल्यानंतर, पुढील काही दिवस 'दशक्रिया विधी' केले जातात. असे समजतात की याने आत्म्याला शांती मिळते, जन्म-मरणाच्या चक्रातून सुटका होते आणि मोक्ष प्राप्त होतो. तिसऱ्या दिवशी राख नदीत सोडण्यापासून ते तेराव्यापर्यंत या विधी चालतात. पवित्र गंगेच्या तीरावर या विधी करतात. महाराष्ट्रातल्या पैठणला दक्षिण काशी मानतात त्यामुळे इथली गोदावरीही गंगेसारखीच पवित्र (आणि प्रदूषित) आहे. हिच्या घाटावरही हे क्रियाकर्म चालते. ब्राह्मणातील किरवंत या पोटजातीचे लोक हे विधी करतात. आणि तेच त्यांचे उपजीविकेचे साधन असते. यांना ब्राह्मणातील इतर पोटजातीहून कमी लेखले जाते. त्यांना शुभ सभारंभाला न बोलावणे, मंदिरात गंध-पूजेचा मान न देणे अशा प्रकारे अवहेलना करून केवळ मर्तिकालाच त्यांचे स्मरण होते. पण यांच्यातील काही लोकही 'दशक्रिया विधींचं' व्यावसायिकरण करून, मृत व्यक्तीच्या आधीच दुःखी-कष्टी नातेवाईकांना अमूक अमूक विधी न केल्यास आत्म्यास शांती मिळणार नाही अशी भीती घालून समाजातील इतर लोकांचे शोषण करतात. काहीजण निर्ढावून अक्षरशः आपले दुकान मांडून लोकांना गिऱ्हाईक बनवून, इतकेच नव्हे त

गीताई आणि आई

"आई आम्हाला ना गीताई शिकवत आहेत त्या नवीन मॅडम. तू मला आणि दादूला म्हणायला लावायचीस बघ. ते आत्ता शाळेत म्हणायला आहे." "अरे वा! अगं पिकू, अजूनही सांगतेच की मी, की करा पाठ, म्हणा, शिकवलेली स्तोत्रं, रामरक्षा, मनाचे श्लोक, अथर्वशीर्ष. पण वेळच नसतो तुम्हाला. आमच्या लहानपणी..असो.. "ए दादू, ये इकडे. बघ बघ. ते बघ आई परत स्वतःशी पुटपुटायला लागली" "काय विषय काय आहे?" - दादू "दादू, पिकू या असे समोर बरं" "आई मला अभ्यास आहे आणि दादूला टेनिस ला जायचंय म्हणतोय. हो ना रे?" "2 मिनिट थांब दादू. या दोघे समोर. खूप दिवस माझ्या मनात होतं हे, आणि त्यामागे काही कारणेही आहेत.  तुम्ही शांतपणे अर्धा तास तरी यासाठी देऊच शकता ना, टीव्ही आणि कॉम्प्युटर बंद करून? मग नंतर जा खेळायला आणि अभ्यासाला. कारण तेही महत्वाचं आहेच." " अगं आम्हाला 0 काही कळत नाही आणि कशाला उगाच म्हणायचं? आम्हाला कंटाळा येतो." "तुम्हाला माहीत आहे, हे सारं आम्ही का म्हणायला सांगतो? यामागे काही धार्मिक कारणं नाहीयेत. तुमचं पाठां

चारचौघी

परवा चारचौघी बघून आले. शो हाऊसफुल्ल होता. टिकीट्स मिळत नव्हती, पण राजसीमुळे मिळाली आणि I am greatfull की तिच्यामुळे इतकी सुंदर कलाकृती बघायला मिळाली. चारचौघी बघून आले आणि डोक्यात चक्रीवादळाने थैमान घातलं. ३१ वर्षानंतर हे नाटक पुन्हा एकदा रंगमंचावर आलं आणि तरीही ते तितकंच रीलेटिव्ह वाटतं, आणि एकंदर आपली समाजव्यवस्था पाहता ते अजून अनेक दशकं ते तितकंच रीलेटीव्ह वाटत राहील. प्रशांत दळवीने, एका पुरुषानी बाईपणाचे कंगोरे इतक्या बारकाईने मांडणं, आणि त्यांच्या मनातील तुफानाचा ठाव घेणं is really commendable. संहितेला योग्य न्याय दिला आहे त्यांनी. काळाच्या कितीतरी पुढचं आहे हे लिखाण असं म्हणावं तर यातील शब्दन शब्द असंख्य बायकांच्या मनाला स्पर्शून गेलेल्या असतो. काळ कुठलाही असो मग. चंद्रकांत कुलकर्णी यांचं कौतुक करावं तितकं कमीच आहे, त्यांनी संहितेला खराखुरा न्याय मिळवून दिला आहे. कास्टिंग अफलातून झालं आहे. यातले सारेच कलाकार खूप ताकदीचे आहेत. या चारचौघींचे भिन्न भिन्न प्रश्न आहेत. सगळ्या सक्षम, सुशिक्षित, सुजाण आहेत. आपल्या पायावर स्वाभिमानाने उभ्या आहेत. या सगळ्याच स्त्रिया त्यांच्या त्यांच्या आ