Skip to main content

आता तरी डोळे उघडा..

गणपती उत्सव अवघ्या महिन्यावर येउन ठेपला आहे. त्या निमित्ताने त्याच्या सार्वजनिक स्वरूपावर थोर सत्यशोधक विचारवंत व सुधारक ना. कै. भास्करराव जाधव यांनी काही परखड मते व्यक्त केलेली आहेत. ती संक्षिप्त रूपाने इथे मांडत आहेत प्रस्तुत लेख हा १९२४ म्हणजे ९० वर्षांपूर्वीचा आहे. या वरून भास्कररावांची दूरदृष्टी आणि सामन्यांचा धर्मानुकरणाच्या नावाखाली अजूनही चाललेला वेडेपणा लक्षात येईल. यात सांगितलेले आर्थिक व्यवहाराचे स्वरूप पाहता त्याची या काळात तुलना केल्यास पैशाचाही किती जास्त अपव्यय आहे हे दिसून येईल.  गणपती उत्सवाचा नावाखाली दर साली होणारा धिंगाणा व त्याद्वारे होणारी धर्माची विटंबना थांबविण्याच्या इच्छेने भास्कररावांनी गणपती उत्सवाच्या मागची मूळ कल्पनाम सद्यस्थिती (तत्कालीन), झालेले दुष्परिणाम इ. चा थोडक्यात पण मार्मिक शब्दात या पत्रिकेत आढावा घेतला आहे.

सत्यशोधक समाज, मुंबई
पत्रक - गणपती उत्सव

गणपती उत्सव या नावाने होणारा दर सालचा 'धिंगाणा' लवकरच सुरू होईल. वाडी-वाडीतून व मोहल्ल्यातून व चाळीचाळींतून मंडळे स्थापन होऊन वर्गण्याही  (बरेचवेळा सक्तीने) जमा केल्या जातील. उत्सवाचा खर्च सढळ हाताने आपल्या इच्छेनुसार कार्यकर्ते करतील. बहुतेक सर्व वर्गणीदार या कारभाराबद्दल कुरकुर करतील ; पण त्यांचे काही एक न चालता अरेराव आपल्या मर्जीप्रमाणे वागतील. हा सर्व देखावा सालोसाल चालू आहेच , तो बंद करण्यासाठी व धर्माच्या नावाखाली जी काही विटंबना चालली आहे ती थांबवण्यासाठी जोरात प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.
पुष्कळ महाराष्ट्रीयांच्या घरी भाद्रपद शु. ४ ला गणपती येतो व दोन किंवा पाच दिवस बसून विसर्जनही होते. पण सार्वजनिक गणपती बसवून ११ दिवस उत्सव करण्याची कल्पना कै. टिळकांनी काढली. गणपतीच्या उत्सवाच्या निमित्ताने सर्व हिंदू एकत्र यावे व त्यांची जूट होऊन त्यायोगे हिंदभूमी स्वतंत्र व्हावी असा या उत्सवाचा उद्देश आरंभी सांगण्यात येत असे. पण या अपेक्षेप्रमाणे हिंदूंची जूट झाली नाही. या उत्सवातून ती पुढे उत्पन्न होईल अशी आशाही नाही. या उत्सवाने हिंदभूमीचे स्वातंत्र्य जवळ येईल असे मानणारा भोळा पुरुष फारसा कोठे आढळत नाही.
मुंब शहरात निदान ५०० तरी सार्वजनिक गणपती बसवले जातात व उत्सवाच्या कामी ३०० तर ५०० रुपये खर्च केले जातात. लालबागच्या उत्सवाला १५०० पेक्षा जास्त खर्च केला जातो. सरासरी रू. ४०० प्रमाणे ५०० उत्सवांचा खर्च धरला असताही ही रक्कम रु. २ लाख पेक्षा कमी होत नाही. ही रक्कम बहुतेक व्यर्थ खर्च होते. उ उत्सवाला ज्ञानसत्र असे म्हणण्यात येते व तसे म्हणण्यात यावे म्हणून वक्त्यांची भाषणेही होतात. पण या भाषणांचा फायदा फारसा होत नाही.
व्याख्यानास गर्दी जमावी म्हणून करमणुकीचे कार्यक्रमही ठरवले जातात. व्याख्यानाच्या वेळी फार थोड्यांचे लक्ष व्याख्यानाकडे असते. व बहुतेक व्याख्याते लोकांचे अज्ञान, धर्मभोळेपणा वगैरे कमी होऊन विचारबुद्धी वाढेल असे प्रयत्न करत नाहीत व कोणी तसे विचार मांडू लागल्यास ऐकणारे फार थोडे.  असल्या उत्सवात निरनिराळ्या करमणुकीच्या कार्याक्रामाचेही स्वरूप बीभत्स होऊ लागले आहे.
अशा उत्सवापासून राजकारणामध्ये प्रगती होत नाही असा अनुभव आहे. व्यापार किंवा कारखाने यांची वृद्धी करण्याचे सामर्थ्य या उत्सवात नाही ;धर्माची उदात्त तत्वे या उत्सवात प्रतिपादली जात नाहीत; जे आचार व विचार पुढे मांडले जातात त्या योगे अज्ञान व भोळेपणा वाढण्यास मदत होते, हे राष्ट्रीय नुकसान आहे.
सुज्ञांनी गणपतीच्या उत्सवास वर्गणीरूपे पैसे देउ नयेत व हे बंद होतील असे प्रयत्न करावेत.

थोडे माझे -

गणपती उत्सवामुळे सामान्य जनतेच्या धर्माच्या उदात्त तत्वाचे प्रतिपादन तर होत नाहीच पण अज्ञान व  भोळेपणा यांच्या वाढीस मदत होते, फंड गुंडगिरीला प्रोत्साहन मिळते असेही मत त्यांनी मांडले आहे. यामुळे मूर्तीपूजेस चालना मिळते , फायदा मात्र मुळीच  होत नाही. गणपती हे दैवतच धर्मभावनेस धक्का देणारे कसे आहे हे ते साधार स्पष्ट करतात. 'दुर्जनं प्रथमं वन्दे, सज्जनं तदनंतरं'  असे सुभाषित देउन ते सुज्ञास विचार करण्यास भाग पाडतात. प्रतिमापूजा हा भक्तीमार्गातील अखेरचा मार्ग आहे व यातून अध्यात्मिक उन्नती होण्यास बरेच अडथळे येतात, लेखातील काही भागामुळे काहींच्या भावना दुखवू शकतात म्हणून तो भाग गाळण्यात आला आहे. (जात येता त्यांच्या भावना दुखावतच असतात) . पैशाच्या अपव्ययासोबतच अशा प्रकारच्या कार्यक्रमाने पर्यावरणाचीही अतोनात हानी चालू असते. आपण सर्वानीच आता डोळसपणे याकडे पाहून वेळीच पावले उचलली पहिजेत. अजूनही वेळ आहे. आता तरी डोळे उघडा.

Comments

Popular posts from this blog

दशक्रिया

मेलेल्या व्यक्तीचे दहन झाल्यानंतर, पुढील काही दिवस 'दशक्रिया विधी' केले जातात. असे समजतात की याने आत्म्याला शांती मिळते, जन्म-मरणाच्या चक्रातून सुटका होते आणि मोक्ष प्राप्त होतो. तिसऱ्या दिवशी राख नदीत सोडण्यापासून ते तेराव्यापर्यंत या विधी चालतात. पवित्र गंगेच्या तीरावर या विधी करतात. महाराष्ट्रातल्या पैठणला दक्षिण काशी मानतात त्यामुळे इथली गोदावरीही गंगेसारखीच पवित्र (आणि प्रदूषित) आहे. हिच्या घाटावरही हे क्रियाकर्म चालते. ब्राह्मणातील किरवंत या पोटजातीचे लोक हे विधी करतात. आणि तेच त्यांचे उपजीविकेचे साधन असते. यांना ब्राह्मणातील इतर पोटजातीहून कमी लेखले जाते. त्यांना शुभ सभारंभाला न बोलावणे, मंदिरात गंध-पूजेचा मान न देणे अशा प्रकारे अवहेलना करून केवळ मर्तिकालाच त्यांचे स्मरण होते. पण यांच्यातील काही लोकही 'दशक्रिया विधींचं' व्यावसायिकरण करून, मृत व्यक्तीच्या आधीच दुःखी-कष्टी नातेवाईकांना अमूक अमूक विधी न केल्यास आत्म्यास शांती मिळणार नाही अशी भीती घालून समाजातील इतर लोकांचे शोषण करतात. काहीजण निर्ढावून अक्षरशः आपले दुकान मांडून लोकांना गिऱ्हाईक बनवून, इतकेच नव्हे त

गीताई आणि आई

"आई आम्हाला ना गीताई शिकवत आहेत त्या नवीन मॅडम. तू मला आणि दादूला म्हणायला लावायचीस बघ. ते आत्ता शाळेत म्हणायला आहे." "अरे वा! अगं पिकू, अजूनही सांगतेच की मी, की करा पाठ, म्हणा, शिकवलेली स्तोत्रं, रामरक्षा, मनाचे श्लोक, अथर्वशीर्ष. पण वेळच नसतो तुम्हाला. आमच्या लहानपणी..असो.. "ए दादू, ये इकडे. बघ बघ. ते बघ आई परत स्वतःशी पुटपुटायला लागली" "काय विषय काय आहे?" - दादू "दादू, पिकू या असे समोर बरं" "आई मला अभ्यास आहे आणि दादूला टेनिस ला जायचंय म्हणतोय. हो ना रे?" "2 मिनिट थांब दादू. या दोघे समोर. खूप दिवस माझ्या मनात होतं हे, आणि त्यामागे काही कारणेही आहेत.  तुम्ही शांतपणे अर्धा तास तरी यासाठी देऊच शकता ना, टीव्ही आणि कॉम्प्युटर बंद करून? मग नंतर जा खेळायला आणि अभ्यासाला. कारण तेही महत्वाचं आहेच." " अगं आम्हाला 0 काही कळत नाही आणि कशाला उगाच म्हणायचं? आम्हाला कंटाळा येतो." "तुम्हाला माहीत आहे, हे सारं आम्ही का म्हणायला सांगतो? यामागे काही धार्मिक कारणं नाहीयेत. तुमचं पाठां

चारचौघी

परवा चारचौघी बघून आले. शो हाऊसफुल्ल होता. टिकीट्स मिळत नव्हती, पण राजसीमुळे मिळाली आणि I am greatfull की तिच्यामुळे इतकी सुंदर कलाकृती बघायला मिळाली. चारचौघी बघून आले आणि डोक्यात चक्रीवादळाने थैमान घातलं. ३१ वर्षानंतर हे नाटक पुन्हा एकदा रंगमंचावर आलं आणि तरीही ते तितकंच रीलेटिव्ह वाटतं, आणि एकंदर आपली समाजव्यवस्था पाहता ते अजून अनेक दशकं ते तितकंच रीलेटीव्ह वाटत राहील. प्रशांत दळवीने, एका पुरुषानी बाईपणाचे कंगोरे इतक्या बारकाईने मांडणं, आणि त्यांच्या मनातील तुफानाचा ठाव घेणं is really commendable. संहितेला योग्य न्याय दिला आहे त्यांनी. काळाच्या कितीतरी पुढचं आहे हे लिखाण असं म्हणावं तर यातील शब्दन शब्द असंख्य बायकांच्या मनाला स्पर्शून गेलेल्या असतो. काळ कुठलाही असो मग. चंद्रकांत कुलकर्णी यांचं कौतुक करावं तितकं कमीच आहे, त्यांनी संहितेला खराखुरा न्याय मिळवून दिला आहे. कास्टिंग अफलातून झालं आहे. यातले सारेच कलाकार खूप ताकदीचे आहेत. या चारचौघींचे भिन्न भिन्न प्रश्न आहेत. सगळ्या सक्षम, सुशिक्षित, सुजाण आहेत. आपल्या पायावर स्वाभिमानाने उभ्या आहेत. या सगळ्याच स्त्रिया त्यांच्या त्यांच्या आ