Skip to main content

Pursuit of Happiness : आनंदाचा अथक शोध

परसूट ऑफ हॅपिनेस : आनंदाचा अथक शोध

आयुष्यात आनंद कुणाला नको असतो? कुणाला भौतिक सुखात तर कुणाला आत्मिक समाधानात आनंद मिळतो. जो तो आनंदाच्या शोधात आहे, सगळ्यांचं एकच ध्येय आहे. Pursuit of Happiness. 



या सिनेमाची कथाही एक खऱ्या चरित्रावर बेतलेली आहे. ख्रिस गार्डनर ( विल स्मिथ ), ख्रिस्तोफर ज्युनिअर ( जेडन स्मिथ ) हे खऱ्या जीवनातले बापलेकच यात दाखवले आहेत. एक बोन डेन्सीटी स्कॅनर मशीन, ज्याला फारशी मागणी नाही विकणारा सेल्समन ख्रिस व्यावसायिक पतनामुळे हैराण असतो. त्याची बायको मुलाला त्याच्यापाशी ठेवून निघून जाते, राहतं भाड्याचे घर जाते, शेअर बाजारात काम करण्यासाठी इंटर्न म्हणून विनापैसा ख्रिसला काम मिळते आणि मग सुरू होतो एक संघर्ष. आनंदाचा अथक शोध. घर नाही तर कधी पब्लिक टॉयलेटमध्ये तर कधी ट्रेन, बसमध्ये, स्वस्त डॉर्मिटरी मिळेल तिथे मुलाला घेऊन राहणे, खिशात, बँकेत पैशाचा खडखडाट असून सकारात्मक राहून गुजराण करण्यासाठी त्याची राहिलेली मशिन्स त्याला विकायची असतात. अनेक संकटांना सामोरं जाताना हा सिनेमा आपल्याला खूप काही शिकवतो. सकारात्मक दृष्टिकोन, हार न मानणे, स्वप्नांच्या पूर्तीसाठी झटत राहणे. नैसर्गिक अभिनय, अप्रतिम संवाद, साजेसं पार्श्वसंगीत याने हा सिनेमा एक क्लासिक बनला आहे. 

शेवटच्या सीनमध्ये केवळ विल स्मिथच्याच नाही, प्रेक्षकांच्याही डोळ्यात पाणी तरळतं. इतकं खरे आणि मनाला भिडणारे त्याचे आनंदाश्रू आहेत. हा सिनेमा थोडा स्लो वाटू शकतो, पण संवाद असे मन लावून ऐकले की पुन्हा बघावसा वाटतो. 

चर्च मधील सीन मध्ये गाण्याच्या ओळीत तेथील गायक परमेश्वराची आळवणी करतात, " हे देवा,  माझ्या मार्गातील पर्वत हलवू नकोस, पण तो चढून जाण्याची शक्ती मला दे " या पलीकडे जाऊन, इतका निर्मळ, आनंदाचा वेगळा पाठपुरावा कोणता असेल? 

जरूर पाहावा असा हा चित्रपट. 
4/5

- रमा

Comments

Popular posts from this blog

दशक्रिया

मेलेल्या व्यक्तीचे दहन झाल्यानंतर, पुढील काही दिवस 'दशक्रिया विधी' केले जातात. असे समजतात की याने आत्म्याला शांती मिळते, जन्म-मरणाच्या चक्रातून सुटका होते आणि मोक्ष प्राप्त होतो. तिसऱ्या दिवशी राख नदीत सोडण्यापासून ते तेराव्यापर्यंत या विधी चालतात. पवित्र गंगेच्या तीरावर या विधी करतात. महाराष्ट्रातल्या पैठणला दक्षिण काशी मानतात त्यामुळे इथली गोदावरीही गंगेसारखीच पवित्र (आणि प्रदूषित) आहे. हिच्या घाटावरही हे क्रियाकर्म चालते. ब्राह्मणातील किरवंत या पोटजातीचे लोक हे विधी करतात. आणि तेच त्यांचे उपजीविकेचे साधन असते. यांना ब्राह्मणातील इतर पोटजातीहून कमी लेखले जाते. त्यांना शुभ सभारंभाला न बोलावणे, मंदिरात गंध-पूजेचा मान न देणे अशा प्रकारे अवहेलना करून केवळ मर्तिकालाच त्यांचे स्मरण होते. पण यांच्यातील काही लोकही 'दशक्रिया विधींचं' व्यावसायिकरण करून, मृत व्यक्तीच्या आधीच दुःखी-कष्टी नातेवाईकांना अमूक अमूक विधी न केल्यास आत्म्यास शांती मिळणार नाही अशी भीती घालून समाजातील इतर लोकांचे शोषण करतात. काहीजण निर्ढावून अक्षरशः आपले दुकान मांडून लोकांना गिऱ्हाईक बनवून, इतकेच नव्हे त

गीताई आणि आई

"आई आम्हाला ना गीताई शिकवत आहेत त्या नवीन मॅडम. तू मला आणि दादूला म्हणायला लावायचीस बघ. ते आत्ता शाळेत म्हणायला आहे." "अरे वा! अगं पिकू, अजूनही सांगतेच की मी, की करा पाठ, म्हणा, शिकवलेली स्तोत्रं, रामरक्षा, मनाचे श्लोक, अथर्वशीर्ष. पण वेळच नसतो तुम्हाला. आमच्या लहानपणी..असो.. "ए दादू, ये इकडे. बघ बघ. ते बघ आई परत स्वतःशी पुटपुटायला लागली" "काय विषय काय आहे?" - दादू "दादू, पिकू या असे समोर बरं" "आई मला अभ्यास आहे आणि दादूला टेनिस ला जायचंय म्हणतोय. हो ना रे?" "2 मिनिट थांब दादू. या दोघे समोर. खूप दिवस माझ्या मनात होतं हे, आणि त्यामागे काही कारणेही आहेत.  तुम्ही शांतपणे अर्धा तास तरी यासाठी देऊच शकता ना, टीव्ही आणि कॉम्प्युटर बंद करून? मग नंतर जा खेळायला आणि अभ्यासाला. कारण तेही महत्वाचं आहेच." " अगं आम्हाला 0 काही कळत नाही आणि कशाला उगाच म्हणायचं? आम्हाला कंटाळा येतो." "तुम्हाला माहीत आहे, हे सारं आम्ही का म्हणायला सांगतो? यामागे काही धार्मिक कारणं नाहीयेत. तुमचं पाठां

चारचौघी

परवा चारचौघी बघून आले. शो हाऊसफुल्ल होता. टिकीट्स मिळत नव्हती, पण राजसीमुळे मिळाली आणि I am greatfull की तिच्यामुळे इतकी सुंदर कलाकृती बघायला मिळाली. चारचौघी बघून आले आणि डोक्यात चक्रीवादळाने थैमान घातलं. ३१ वर्षानंतर हे नाटक पुन्हा एकदा रंगमंचावर आलं आणि तरीही ते तितकंच रीलेटिव्ह वाटतं, आणि एकंदर आपली समाजव्यवस्था पाहता ते अजून अनेक दशकं ते तितकंच रीलेटीव्ह वाटत राहील. प्रशांत दळवीने, एका पुरुषानी बाईपणाचे कंगोरे इतक्या बारकाईने मांडणं, आणि त्यांच्या मनातील तुफानाचा ठाव घेणं is really commendable. संहितेला योग्य न्याय दिला आहे त्यांनी. काळाच्या कितीतरी पुढचं आहे हे लिखाण असं म्हणावं तर यातील शब्दन शब्द असंख्य बायकांच्या मनाला स्पर्शून गेलेल्या असतो. काळ कुठलाही असो मग. चंद्रकांत कुलकर्णी यांचं कौतुक करावं तितकं कमीच आहे, त्यांनी संहितेला खराखुरा न्याय मिळवून दिला आहे. कास्टिंग अफलातून झालं आहे. यातले सारेच कलाकार खूप ताकदीचे आहेत. या चारचौघींचे भिन्न भिन्न प्रश्न आहेत. सगळ्या सक्षम, सुशिक्षित, सुजाण आहेत. आपल्या पायावर स्वाभिमानाने उभ्या आहेत. या सगळ्याच स्त्रिया त्यांच्या त्यांच्या आ