Skip to main content

शरदचंद्र चटोपाध्याय




शरदचंद्र चटोपाध्याय हे एक मोठे बंगाली साहित्यिक होते. उपेक्षितांचे अंतर्बाह्य चित्रण करणारे,  परंपरेच्या जोखडात अडकलेला समाज, खास करून स्त्री वर्ग यांच्या व्यथांचं कथन बंगाली साहित्यात 'शरद साहित्य' म्हणून एक मानदंड ठरलं. आजही आहे. भारतीय साहित्यात त्यांचे योगदान दूरगामी व परिणामकारक आहे. 


त्यांचा जन्म 15 सप्टेंबर 1876 रोजी झाला.  कॉलेजात असताना त्यांनी 'भागलपूर साहित्यसभेची' स्थापना करून 'छाया' हे हस्तलिखित सुरू केले. रवींद्रनाथांसारखं अभिजात साहित्य जन्माला घालायचं त्यांचं स्वप्न होतं. गरिबीमुळे त्यांना शिक्षण ही अर्धवट सोडून द्यावं लागलं. पण त्यांचं साहित्यावरील प्रेम कधीच कमी झालं नाही.


पैशाच्या चणचणीमुळे त्यांनी नोकरी धरली, त्यांचे संवेदनशील मन समाजातील तळागाळातून सुख-दुःखाचे निरीक्षण करत होते त्यावेळी त्यांची 'बडदीदी' ही अप्रकाशित कादंबरी कोलकात्यात 'भारती' मासिकात क्रमशः छापून आणली गेली आणि बंगाली साहित्यात 'शरदचंद्र' उदयाला आला.


शोषित, मूक, दबलेल्या समाजाचा आरसा म्हणजे त्यांचं साहित्य. कल्पनारम्यतेऐवजी वास्तवतेकडे झुकणारा असा त्यांचा बाज होता. ते एक अतिशय उत्कृष्ट कादंबरीकार आणि लघुकथाकार होते. देवदास, श्रीकांतो, चोरित्रोहिन, गृहहाहा, परिणिता, 'बिराज बहू' अशा त्यांच्या एकाहून एक सरस कादंबऱ्या आणि 'काशिनाथ', 'बिंदूर छेले', 'हरीलक्ष्मी' इत्यादी अप्रतिम कथा यांचा बंगाली साहित्यात समावेश आहे. 


त्यांच्या अनेक कथा-कादंबऱ्यांचे चित्रपटात, नाटकात रूपांतर झाले तर सुमती क्षेत्रमाडे यांनी त्यांच्या जीवनावर आधारित 'जीवनस्वप्नं' ही कादंबरी लिहिली आहे. 


शरद साहित्याचा आशय खोल आणि शैली मनाचा वेध घेणारी होती. प्रस्थापित बंग साहित्यातील तंत्र नाकारून त्यांनी आपले असे साहित्य तंत्र विकसित केले. राजकारणातही ते सक्रिय होते. 'पथेर दाबी' या त्यांच्या कादंबरीवर ब्रिटिश सरकारने बंदी आणली होती. त्यांच्याच इंग्रजी भाषेत आणि इतर अनेक भारतीय भाषेत शरदचंद्रांचे साहित्य अनुवादित झाले आहे. त्यांचा अनेक संस्थांनी, विद्यापीठांनी गौरव केला. पण त्यांनी आपल्या लेखनातून सामान्यजनांचा गौरव केला. इथेच ते वेगळे ठरतात, मोलाचे ठरतात. 


- रमा

#दिनांकविशेष 


Comments

Popular posts from this blog

दशक्रिया

मेलेल्या व्यक्तीचे दहन झाल्यानंतर, पुढील काही दिवस 'दशक्रिया विधी' केले जातात. असे समजतात की याने आत्म्याला शांती मिळते, जन्म-मरणाच्या चक्रातून सुटका होते आणि मोक्ष प्राप्त होतो. तिसऱ्या दिवशी राख नदीत सोडण्यापासून ते तेराव्यापर्यंत या विधी चालतात. पवित्र गंगेच्या तीरावर या विधी करतात. महाराष्ट्रातल्या पैठणला दक्षिण काशी मानतात त्यामुळे इथली गोदावरीही गंगेसारखीच पवित्र (आणि प्रदूषित) आहे. हिच्या घाटावरही हे क्रियाकर्म चालते. ब्राह्मणातील किरवंत या पोटजातीचे लोक हे विधी करतात. आणि तेच त्यांचे उपजीविकेचे साधन असते. यांना ब्राह्मणातील इतर पोटजातीहून कमी लेखले जाते. त्यांना शुभ सभारंभाला न बोलावणे, मंदिरात गंध-पूजेचा मान न देणे अशा प्रकारे अवहेलना करून केवळ मर्तिकालाच त्यांचे स्मरण होते. पण यांच्यातील काही लोकही 'दशक्रिया विधींचं' व्यावसायिकरण करून, मृत व्यक्तीच्या आधीच दुःखी-कष्टी नातेवाईकांना अमूक अमूक विधी न केल्यास आत्म्यास शांती मिळणार नाही अशी भीती घालून समाजातील इतर लोकांचे शोषण करतात. काहीजण निर्ढावून अक्षरशः आपले दुकान मांडून लोकांना गिऱ्हाईक बनवून, इतकेच नव्हे त

गीताई आणि आई

"आई आम्हाला ना गीताई शिकवत आहेत त्या नवीन मॅडम. तू मला आणि दादूला म्हणायला लावायचीस बघ. ते आत्ता शाळेत म्हणायला आहे." "अरे वा! अगं पिकू, अजूनही सांगतेच की मी, की करा पाठ, म्हणा, शिकवलेली स्तोत्रं, रामरक्षा, मनाचे श्लोक, अथर्वशीर्ष. पण वेळच नसतो तुम्हाला. आमच्या लहानपणी..असो.. "ए दादू, ये इकडे. बघ बघ. ते बघ आई परत स्वतःशी पुटपुटायला लागली" "काय विषय काय आहे?" - दादू "दादू, पिकू या असे समोर बरं" "आई मला अभ्यास आहे आणि दादूला टेनिस ला जायचंय म्हणतोय. हो ना रे?" "2 मिनिट थांब दादू. या दोघे समोर. खूप दिवस माझ्या मनात होतं हे, आणि त्यामागे काही कारणेही आहेत.  तुम्ही शांतपणे अर्धा तास तरी यासाठी देऊच शकता ना, टीव्ही आणि कॉम्प्युटर बंद करून? मग नंतर जा खेळायला आणि अभ्यासाला. कारण तेही महत्वाचं आहेच." " अगं आम्हाला 0 काही कळत नाही आणि कशाला उगाच म्हणायचं? आम्हाला कंटाळा येतो." "तुम्हाला माहीत आहे, हे सारं आम्ही का म्हणायला सांगतो? यामागे काही धार्मिक कारणं नाहीयेत. तुमचं पाठां

चारचौघी

परवा चारचौघी बघून आले. शो हाऊसफुल्ल होता. टिकीट्स मिळत नव्हती, पण राजसीमुळे मिळाली आणि I am greatfull की तिच्यामुळे इतकी सुंदर कलाकृती बघायला मिळाली. चारचौघी बघून आले आणि डोक्यात चक्रीवादळाने थैमान घातलं. ३१ वर्षानंतर हे नाटक पुन्हा एकदा रंगमंचावर आलं आणि तरीही ते तितकंच रीलेटिव्ह वाटतं, आणि एकंदर आपली समाजव्यवस्था पाहता ते अजून अनेक दशकं ते तितकंच रीलेटीव्ह वाटत राहील. प्रशांत दळवीने, एका पुरुषानी बाईपणाचे कंगोरे इतक्या बारकाईने मांडणं, आणि त्यांच्या मनातील तुफानाचा ठाव घेणं is really commendable. संहितेला योग्य न्याय दिला आहे त्यांनी. काळाच्या कितीतरी पुढचं आहे हे लिखाण असं म्हणावं तर यातील शब्दन शब्द असंख्य बायकांच्या मनाला स्पर्शून गेलेल्या असतो. काळ कुठलाही असो मग. चंद्रकांत कुलकर्णी यांचं कौतुक करावं तितकं कमीच आहे, त्यांनी संहितेला खराखुरा न्याय मिळवून दिला आहे. कास्टिंग अफलातून झालं आहे. यातले सारेच कलाकार खूप ताकदीचे आहेत. या चारचौघींचे भिन्न भिन्न प्रश्न आहेत. सगळ्या सक्षम, सुशिक्षित, सुजाण आहेत. आपल्या पायावर स्वाभिमानाने उभ्या आहेत. या सगळ्याच स्त्रिया त्यांच्या त्यांच्या आ