Skip to main content

ऑक्टोबर : नात्याला या नकोच नाव


सगळ्याच नात्यांना नाव नसतं. सगळ्याच भावनांत आर्तता नसते. सगळ्याच कथा तुम्हाला तुमच्या स्वतःच्या वाटतीलच असं नाही. पण ऑक्टोबर मला स्वतःचा वाटला. डॅन आणि शिवली. हॉटेल मॅनेजमेंट इंटर्न्स, एकमेकांशी अगदी मोजका संवाद असलेले, सहकारी इतकेच काय ते त्यांचे नाते. डॅन बेफिकीर, अस्ताव्यस्त, कामात लक्ष नसलेला, बेधडक आणि कधी कधी दुखेल असे बोलणे तरी थोडा निष्पाप तर शिवली शांत, कामात सिन्सिअर. दोन ध्रुवावर दोघे आपण असे त्यांचे अत्यंत विरुद्ध स्वभाव. एका अपघातामुळे शिवली कोमा आणि नंतर त्यासदृश परिस्थितीत हॉस्पिटलमध्ये बेडला खिळलेल्या अवस्थेत आहे आणि नंतर डॅन मध्ये या घटनेने जे बदल घडत जातात आणि त्यांचे एक अतूट बंधन निर्माण होते त्याची ही सुगंधी कथा. डॅन अधिकाधिक शिवलीची काळजी करू लागतो, त्याच्या रोजच्या भेटींमुळे त्याच्या इतर सहकाऱ्यांना त्याचे वागणे विचित्र वाटते. असे काही होऊ शकेल आणि तेही डॅनकडून असे कुणालाही विचित्रच वाटेल. पण त्याचे शिवलीकडे वारंवार जाणे, याने त्याचा स्वभाव बदलतो. एरवी बालिश वाटणारा डॅन शिवलीच्या प्रत्येक बाबतीत सीरियस वागू लागतो.
चित्रपटातील डॅन - शिवली यांच्या नात्यावर संदीप खरेची एक कविता आठवली (खूप जणांना तो आवडत नसला तरी मला काही कविता लै आवडतात),

" तुझे नि माझे नाते काय?
तू देणारी, मी घेणारा
तू  घेणारी, मी देणारा
कधी न कळते, रूप बदलते
चक्राचे आवर्तन घडते
आपुल्यामधले फरक कोणते
अन आपल्यातून समान  काय?"



सिनेमा low paced आहे. पण त्यानेच तो आपल्याला सत्यकाळात ओढून नेऊन आपण खरोखरीच तिथे आहोत हा भास निर्माण करतो. जुही चतुर्वेदींचे कथा, पटकथा, संवाद सुंदर आहेत. शांतनु मोईत्रा यांचे बॅकग्राऊंड संगीत जादुई आहे. अविक मुखोपाध्याय यांची सिनेमॅटोग्राफीही कमाल आहे. खूप काव्यात्मक. शुजीत सरकारचे दिग्दर्शन, वरुण धवनला एरवी चित्रपटाचे केंद्रस्थानी असलेला टिपिकल हिरो ही ओळखच पुसायला लावते. बनिता संधुचा हा डेब्यू चित्रपट, पण नुसत्या डोळ्यांच्या हालचालींनी तिचा प्रतिसाद देणे हे अवघडही आहे आणि परिणामकारकही. ती हलू - बोलू शकत नाही पण ऐकू शकते. हे आपल्याला तिच्या बोलक्या डोळ्यांनी कळते. वरुण धवनने असे वेगळ्या धाटणीची फिल्म करून रिस्कच घेतली, पण तो पदोपदी स्वतःला सिद्ध ही करतो हे त्याचे वेगळेपण.
फार काही न बोलता खुप काही सांगतो हा चित्रपट. माझे आणि माझ्या जवळच्यांचे हॉस्पिटलशी जवळचे नाते. खूप गोष्टी पाहिल्यात, अनुभवल्यात तिथे. कदाचित म्हणून मला आवडला असेल. आपला वाटला असेल.

ऑक्टोबर मध्ये शिवली ( पारिजातक ) च्या फुलांचा बहर येण्याचा महिनाडॅन - शिवलीच्या नात्यासारखा  आणि म्हणूनच... नात्याला या नकोच नाव..

(पॉपकॉर्न मध्ये हात, मोबाईलमध्ये डोकं असलेल्यांनी, ही फिल्म पाहायची तसदी कृपया घेऊ नये. )

रेटिंग - ४/५

- ©रमा जाधव


Comments

Popular posts from this blog

शांतनू मॉइत्रा: बहती हवासा बावरा मन

प्रसिद्ध पार्श्वसंगीतकार, संगीतकार शांतनू मॉइत्राचा जन्म 22 जानेवारी 1968 मध्ये लखनौ इथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण (स्प्रिंगडेल स्कूल) येथे झाले. " इथे गाता गाता माझ्यातल्या संगीताला वाव मिळाला. आत्मविश्वास मिळाला " असे ते सांगतात. त्यांच्याच स्प्रिंगडेल स्कूलचे माजी विद्यार्थी सुश्मित बोस या अर्बन-लोकगीत गायककडून त्यांनी संगीताचे धडे घेतले. इकॉनॉमिक्स मध्ये डिग्री पूर्ण केल्यानंतर ते एका ऍड एजन्सी मध्ये क्लायंट सर्व्हिस एक्सिक्यूटिव्ह म्हणून रुजू झाले, आणि संगीत केवळ छंद बनून राहिला होता.  एकदा अगदी लास्ट मिनिटाला जिंगल बनवायची आहे असे प्रदीप सरकार यांनी शांतनुना सांगितले. त्यांनी ते जिंगल बनवलं. ते होतं " बोले मेरे लिप्स, आय लव्ह अंकल चिप्स ". यानंतर त्यांनी अनेक कंपनींसाठी जिंगल्स बनवले. नंतर त्यांनी त्यावेळी प्रसिद्ध अशा इंडी-पॉप अल्बम्स साठी संगीत दिले. शुभा मूदगल यांनी गायलेली " अब के सावन ऐसे बरसे " आणि '' सपना देखा है मैने "  ही त्यातली काही गाजलेली गीते. 2002 मध्ये मुंबईला शिफ्ट झाल्यानंतर त्यांना सुधीर मिश्रांच्या ...

दशक्रिया

मेलेल्या व्यक्तीचे दहन झाल्यानंतर, पुढील काही दिवस 'दशक्रिया विधी' केले जातात. असे समजतात की याने आत्म्याला शांती मिळते, जन्म-मरणाच्या चक्रातून सुटका होते आणि मोक्ष प्राप्त होतो. तिसऱ्या दिवशी राख नदीत सोडण्यापासून ते तेराव्यापर्यंत या विधी चालतात. पवित्र गंगेच्या तीरावर या विधी करतात. महाराष्ट्रातल्या पैठणला दक्षिण काशी मानतात त्यामुळे इथली गोदावरीही गंगेसारखीच पवित्र (आणि प्रदूषित) आहे. हिच्या घाटावरही हे क्रियाकर्म चालते. ब्राह्मणातील किरवंत या पोटजातीचे लोक हे विधी करतात. आणि तेच त्यांचे उपजीविकेचे साधन असते. यांना ब्राह्मणातील इतर पोटजातीहून कमी लेखले जाते. त्यांना शुभ सभारंभाला न बोलावणे, मंदिरात गंध-पूजेचा मान न देणे अशा प्रकारे अवहेलना करून केवळ मर्तिकालाच त्यांचे स्मरण होते. पण यांच्यातील काही लोकही 'दशक्रिया विधींचं' व्यावसायिकरण करून, मृत व्यक्तीच्या आधीच दुःखी-कष्टी नातेवाईकांना अमूक अमूक विधी न केल्यास आत्म्यास शांती मिळणार नाही अशी भीती घालून समाजातील इतर लोकांचे शोषण करतात. काहीजण निर्ढावून अक्षरशः आपले दुकान मांडून लोकांना गिऱ्हाईक बनवून, इतकेच नव्हे त...

"न्यूड : नग्नतेतील मुक्त कलाविष्कार"

आत्ता 'न्यूड' पाहिला. एखाद्या कथेचं चित्रात रूपांतर व्हावं आणि प्रत्येक ब्रशस्ट्रोक सोबत तयार व्हावी एक एक अप्रतिम फ्रेम आणि त्यांची एक बनावी चित्रमालिका या साऱ्यांनी बनला आहे 'न्यूड'. गावातून मुंबईला आलेली यमुना 'न्यूड मॉडेल' बनते. का? कशी? त्याचे होणारे परिणाम, पात्रांची आणि शेवटी आपलीही बदलत जाणारी विचारसरणी याची गोष्ट आहे न्यूड मध्ये.  चित्रपटाची कथा नग्नतेवर बेतली असली तरी कुठेही भडक होत नाही. अश्लीलतेचा लवलेश नाही. मॉडेल म्हणून तयार होताना आधी यमुनेची होणारी तडफड, तगमग, अगतिकता आपल्याला अस्वस्थ करून सोडते.  चित्रपटात एक मोठा कलाकार (एम.एफ.हुसेन वर बेतलेला)  मलिक (नसिरुद्दीन शाह) नायिकेचं न्यूड काढता काढता तिच्याशी आणि आपल्याशीही गप्पा मारतो. "मी घोड्यांची चित्रं काढली तर कुणाला हरकत नाही, पारव्यांची चित्र काढली कुणी बोलत नाही, मग मी माणसांची चित्रं काढली तर इतका हंगामा कशासाठी?", कलाकार 'रुह' पाहत असतो. तीच चितारत असतो.  चित्रपटाची कथा नग्नतेवर भाष्य करत असली तरी कुठेही भडकपणा नाही. काही प्रसंग अंगावर येतात पण ते त्य...