Skip to main content

ऑक्टोबर : नात्याला या नकोच नाव


सगळ्याच नात्यांना नाव नसतं. सगळ्याच भावनांत आर्तता नसते. सगळ्याच कथा तुम्हाला तुमच्या स्वतःच्या वाटतीलच असं नाही. पण ऑक्टोबर मला स्वतःचा वाटला. डॅन आणि शिवली. हॉटेल मॅनेजमेंट इंटर्न्स, एकमेकांशी अगदी मोजका संवाद असलेले, सहकारी इतकेच काय ते त्यांचे नाते. डॅन बेफिकीर, अस्ताव्यस्त, कामात लक्ष नसलेला, बेधडक आणि कधी कधी दुखेल असे बोलणे तरी थोडा निष्पाप तर शिवली शांत, कामात सिन्सिअर. दोन ध्रुवावर दोघे आपण असे त्यांचे अत्यंत विरुद्ध स्वभाव. एका अपघातामुळे शिवली कोमा आणि नंतर त्यासदृश परिस्थितीत हॉस्पिटलमध्ये बेडला खिळलेल्या अवस्थेत आहे आणि नंतर डॅन मध्ये या घटनेने जे बदल घडत जातात आणि त्यांचे एक अतूट बंधन निर्माण होते त्याची ही सुगंधी कथा. डॅन अधिकाधिक शिवलीची काळजी करू लागतो, त्याच्या रोजच्या भेटींमुळे त्याच्या इतर सहकाऱ्यांना त्याचे वागणे विचित्र वाटते. असे काही होऊ शकेल आणि तेही डॅनकडून असे कुणालाही विचित्रच वाटेल. पण त्याचे शिवलीकडे वारंवार जाणे, याने त्याचा स्वभाव बदलतो. एरवी बालिश वाटणारा डॅन शिवलीच्या प्रत्येक बाबतीत सीरियस वागू लागतो.
चित्रपटातील डॅन - शिवली यांच्या नात्यावर संदीप खरेची एक कविता आठवली (खूप जणांना तो आवडत नसला तरी मला काही कविता लै आवडतात),

" तुझे नि माझे नाते काय?
तू देणारी, मी घेणारा
तू  घेणारी, मी देणारा
कधी न कळते, रूप बदलते
चक्राचे आवर्तन घडते
आपुल्यामधले फरक कोणते
अन आपल्यातून समान  काय?"



सिनेमा low paced आहे. पण त्यानेच तो आपल्याला सत्यकाळात ओढून नेऊन आपण खरोखरीच तिथे आहोत हा भास निर्माण करतो. जुही चतुर्वेदींचे कथा, पटकथा, संवाद सुंदर आहेत. शांतनु मोईत्रा यांचे बॅकग्राऊंड संगीत जादुई आहे. अविक मुखोपाध्याय यांची सिनेमॅटोग्राफीही कमाल आहे. खूप काव्यात्मक. शुजीत सरकारचे दिग्दर्शन, वरुण धवनला एरवी चित्रपटाचे केंद्रस्थानी असलेला टिपिकल हिरो ही ओळखच पुसायला लावते. बनिता संधुचा हा डेब्यू चित्रपट, पण नुसत्या डोळ्यांच्या हालचालींनी तिचा प्रतिसाद देणे हे अवघडही आहे आणि परिणामकारकही. ती हलू - बोलू शकत नाही पण ऐकू शकते. हे आपल्याला तिच्या बोलक्या डोळ्यांनी कळते. वरुण धवनने असे वेगळ्या धाटणीची फिल्म करून रिस्कच घेतली, पण तो पदोपदी स्वतःला सिद्ध ही करतो हे त्याचे वेगळेपण.
फार काही न बोलता खुप काही सांगतो हा चित्रपट. माझे आणि माझ्या जवळच्यांचे हॉस्पिटलशी जवळचे नाते. खूप गोष्टी पाहिल्यात, अनुभवल्यात तिथे. कदाचित म्हणून मला आवडला असेल. आपला वाटला असेल.

ऑक्टोबर मध्ये शिवली ( पारिजातक ) च्या फुलांचा बहर येण्याचा महिनाडॅन - शिवलीच्या नात्यासारखा  आणि म्हणूनच... नात्याला या नकोच नाव..

(पॉपकॉर्न मध्ये हात, मोबाईलमध्ये डोकं असलेल्यांनी, ही फिल्म पाहायची तसदी कृपया घेऊ नये. )

रेटिंग - ४/५

- ©रमा जाधव


Comments

Popular posts from this blog

दशक्रिया

मेलेल्या व्यक्तीचे दहन झाल्यानंतर, पुढील काही दिवस 'दशक्रिया विधी' केले जातात. असे समजतात की याने आत्म्याला शांती मिळते, जन्म-मरणाच्या चक्रातून सुटका होते आणि मोक्ष प्राप्त होतो. तिसऱ्या दिवशी राख नदीत सोडण्यापासून ते तेराव्यापर्यंत या विधी चालतात. पवित्र गंगेच्या तीरावर या विधी करतात. महाराष्ट्रातल्या पैठणला दक्षिण काशी मानतात त्यामुळे इथली गोदावरीही गंगेसारखीच पवित्र (आणि प्रदूषित) आहे. हिच्या घाटावरही हे क्रियाकर्म चालते. ब्राह्मणातील किरवंत या पोटजातीचे लोक हे विधी करतात. आणि तेच त्यांचे उपजीविकेचे साधन असते. यांना ब्राह्मणातील इतर पोटजातीहून कमी लेखले जाते. त्यांना शुभ सभारंभाला न बोलावणे, मंदिरात गंध-पूजेचा मान न देणे अशा प्रकारे अवहेलना करून केवळ मर्तिकालाच त्यांचे स्मरण होते. पण यांच्यातील काही लोकही 'दशक्रिया विधींचं' व्यावसायिकरण करून, मृत व्यक्तीच्या आधीच दुःखी-कष्टी नातेवाईकांना अमूक अमूक विधी न केल्यास आत्म्यास शांती मिळणार नाही अशी भीती घालून समाजातील इतर लोकांचे शोषण करतात. काहीजण निर्ढावून अक्षरशः आपले दुकान मांडून लोकांना गिऱ्हाईक बनवून, इतकेच नव्हे त

गीताई आणि आई

"आई आम्हाला ना गीताई शिकवत आहेत त्या नवीन मॅडम. तू मला आणि दादूला म्हणायला लावायचीस बघ. ते आत्ता शाळेत म्हणायला आहे." "अरे वा! अगं पिकू, अजूनही सांगतेच की मी, की करा पाठ, म्हणा, शिकवलेली स्तोत्रं, रामरक्षा, मनाचे श्लोक, अथर्वशीर्ष. पण वेळच नसतो तुम्हाला. आमच्या लहानपणी..असो.. "ए दादू, ये इकडे. बघ बघ. ते बघ आई परत स्वतःशी पुटपुटायला लागली" "काय विषय काय आहे?" - दादू "दादू, पिकू या असे समोर बरं" "आई मला अभ्यास आहे आणि दादूला टेनिस ला जायचंय म्हणतोय. हो ना रे?" "2 मिनिट थांब दादू. या दोघे समोर. खूप दिवस माझ्या मनात होतं हे, आणि त्यामागे काही कारणेही आहेत.  तुम्ही शांतपणे अर्धा तास तरी यासाठी देऊच शकता ना, टीव्ही आणि कॉम्प्युटर बंद करून? मग नंतर जा खेळायला आणि अभ्यासाला. कारण तेही महत्वाचं आहेच." " अगं आम्हाला 0 काही कळत नाही आणि कशाला उगाच म्हणायचं? आम्हाला कंटाळा येतो." "तुम्हाला माहीत आहे, हे सारं आम्ही का म्हणायला सांगतो? यामागे काही धार्मिक कारणं नाहीयेत. तुमचं पाठां

चारचौघी

परवा चारचौघी बघून आले. शो हाऊसफुल्ल होता. टिकीट्स मिळत नव्हती, पण राजसीमुळे मिळाली आणि I am greatfull की तिच्यामुळे इतकी सुंदर कलाकृती बघायला मिळाली. चारचौघी बघून आले आणि डोक्यात चक्रीवादळाने थैमान घातलं. ३१ वर्षानंतर हे नाटक पुन्हा एकदा रंगमंचावर आलं आणि तरीही ते तितकंच रीलेटिव्ह वाटतं, आणि एकंदर आपली समाजव्यवस्था पाहता ते अजून अनेक दशकं ते तितकंच रीलेटीव्ह वाटत राहील. प्रशांत दळवीने, एका पुरुषानी बाईपणाचे कंगोरे इतक्या बारकाईने मांडणं, आणि त्यांच्या मनातील तुफानाचा ठाव घेणं is really commendable. संहितेला योग्य न्याय दिला आहे त्यांनी. काळाच्या कितीतरी पुढचं आहे हे लिखाण असं म्हणावं तर यातील शब्दन शब्द असंख्य बायकांच्या मनाला स्पर्शून गेलेल्या असतो. काळ कुठलाही असो मग. चंद्रकांत कुलकर्णी यांचं कौतुक करावं तितकं कमीच आहे, त्यांनी संहितेला खराखुरा न्याय मिळवून दिला आहे. कास्टिंग अफलातून झालं आहे. यातले सारेच कलाकार खूप ताकदीचे आहेत. या चारचौघींचे भिन्न भिन्न प्रश्न आहेत. सगळ्या सक्षम, सुशिक्षित, सुजाण आहेत. आपल्या पायावर स्वाभिमानाने उभ्या आहेत. या सगळ्याच स्त्रिया त्यांच्या त्यांच्या आ